सासरच्या लोकांनी मारून विहिरीत फेकले, विवाहितेच्या नातेवाईकांचा आरोप
मारेकर्यांवर गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा तेव्हाच अंत्यसंस्कार करू, संतप्त नातेवाईकांची भूमिका

बीड/गेवराई (रिपोर्टर): पुण्यातील वैष्णवी हगवणे छळ आणि मृत्यू प्रकरणाने उभा महाराष्ट्र हादरून गेलेला असताना दुसरीकडे गेवराई तालुक्यातल्या एरंडगाव येथे एका विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आला. वटसावीत्री पौर्णिमेच्या पुर्वसंध्येला आमच्या मुलीला सासरच्या लोकांनी मारून टाकले, असा आरोप माहेरच्यांनी केला आहे. जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, अशी भूमिका माहेरच्या लोकांनी घेतली आहे. शवविच्छेदनासाठी विवाहितेचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून संतप्त नातेवाईकांनी सकाळी शवविच्छेदनही रोखले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतल्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन करू दिले.
याबाबत अधिक असे की, गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील विवाहिता वर्षा ओमप्रकाश लाटे ही महिला काल सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होती सकाळी ती शेतामध्ये अन्य एका महिलेसोबत काम करण्यासाठी आली मात्र त्या महिलेला मी घरी जात आहे. असे सांगून वर्षा शेतातून निघून गेली दुपारनंतर वर्षा शेतात आणि घरी नसल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला मात्र ती मिळून येत नव्हती. सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान लाटे यांच्या शेतातील विहिरीजवळ वर्षा हिचा स्कार्फ दिसून आला त्यामुळे ती विहिरीत असावी म्हणून विहिरीत शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तिचा मृतदेह विहिरीत असल्याचे काहींच्या लक्षात आले तोपर्यंत तिचे माहेर असलेल्या ईटकुर येथल नातेवाईक घटनास्थळावर आले जोपर्यंत पोलिस घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह काढला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली शेवटी गेवराई पोलीस त्या ठिकाणी डेरे दाखल झाली पोलिसांच्या उपस्थितीत रात्री वर्षाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वर्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. आज सकाळी नातेवाईकांनी मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या गळ्यावर, अंगावर अणि अन्य ठिकाणी मारहाणीच्या खुणा होत्या. सासरच्या लोकांनी आमच्या मुलीला मारून विहिरीत फेकले, असा आरोप करत नातेवाईकांनी जोपर्यंत मारेकर्यांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका घेतली. नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात जावून पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांचीही भेट घेतली. या वेळी काँवत यांनी नातेवाईकांना ‘दोषींवर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात वर्षाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. मात्र जोपर्यंत वर्षाच्या मारेकर्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका माहेरच्या लोकांनी घेतली आहे.








