केज (रिपोर्टर): भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यवसायिकाचा गेल्या दोन दिवसांपूर्वी खून करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद केज शहरासह तालुकाभर उमटताना दिसून येत असून यातील आरोपींना अटक करण्यासाठी दोन दिवसांपासून लोक रस्त्यावर उतरले आहेत. अद्यापपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले नाही. संतप्त झालेल्या नागरिकांनी आज केज शहर बंद करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडल्याने या भागातील पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. त्याच दरम्यान एक रिकामी अॅम्ब्युलन्स आंदोलनस्थळी आली, त्यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी त्या अॅम्ब्युलन्सची मोडतोड केली. त्यामुळे तणाव अधिकच वाढत गेला. या प्रकरणात एकूण नऊ आरोपी असून 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्याचबरोबर या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, ही प्रमुख मागणी संतप्त आंदोलकांची प्रामुख्याने आहे. केज शहर आणि तालुकाभरात सध्या तणावपूर्ण शांतता असून याच प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत हे दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान बैठक घेत असल्याचे सांगण्यात येते.
केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यवसायिक विलास घुले यांचा खून करण्यात आला. या घटनेला दोन दिवस उलटले तरी सर्व नऊ आरोपींना केज पोलिसांनी अटक केलेली नाही. आरोपींच्या अटकेसाठी कालपासून शहरामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज टाकळी ग्रामस्थ व घुले यांच्या नातेवाईकांनी केज शहर बंदची हाक दिली होती. व्यापार्यांनी आपआपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. शहरातील शिवाजी चौकामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावरर निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सात अरोपींना दुपारपर्यंत ताब्यात घेतले होते. आणखी दोन आरोपी फरार होते. या दोन्ही आरोपींना अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांची होती. दुपारी एक वाजेच्या दरम्यान आंदोलनस्थळी एक रिकामी अॅम्ब्युलन्स आली होती. या अॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याने शहरात अधिकच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सर्व आरोपींच्या अटकेसाठी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात येणार होता. या आंदोलनस्थळी पोलीस महानिरीक्षक भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.
खासदार पुत्रावर गुन्हा दाखल करा
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या पूर्वनियोजीत असल्याचा आरोप गुले यांच्या नातेवाईकांकडून होत असून या खून प्रकरणात खा. बजरंग सोनवणे यांच्या पुत्रावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी या आंदोलनादरम्यान अनेकांनी बोलताना केली. मयताच्या घरातल्या लोकांनी जाहीरपणे खासदार पुत्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.










