
बीड,(रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, सरकारकडून जाहीर करण्यात आलेली केवळ 85 रुपये प्रति गुंठा इतकी मदत शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत द्यावी, बागायती शेतकर्यांवर अन्याय होऊ नये, तसेच सोयाबीनची हमीभावाने खरेदी आणि भावांतर योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.27. सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी आणि सरकारच्या नावाने शिमगा करत लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले आदी सहभागी होते.
सरकारने जाहीर केलेली 85 रुपये गुंठा मदत अत्यल्प आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी.
तसेच बागायती क्षेत्रधारकांना जिरायती क्षेत्राप्रमाणेच मदत देणे अन्यायकारक आहे. बीड जिल्ह्यात सुमारे 2 लाख हेक्टर बागायती क्षेत्र असून, जिल्हा प्रशासनाने केवळ 18 हजार हेक्टर क्षेत्र गृहीत धरले आहे, हा अन्याय तातडीने दूर करण्यात यावा.सोयाबीन पिकावर उत्पादन खर्च वाढला असून मजुरी, गुत्ते पद्धतीने काढणी या खर्चामुळे शेतकरी तोट्यात जात आहे.








