आजचे भारतीय राजकारण विचारांवर नव्हे तर व्यवहारांवर उभे आहे. पद, पैसा आणि सत्ता या त्रिसूत्रीने लोकशाहीच्या मुळावर घाव घातला आहे. पक्षांतर हे आता अपवाद राहिलेले नाही; तेच यशाचे लक्षण मानले जाते. सकाळी एका विचाराच्या व्यासपीठावर उभे असणारे नेते संध्याकाळी दुसर्या विचाराच्या दारात हजर असतात. निष्ठा ही कमजोरी आणि तत्वनिष्ठा ही राजकीय आत्महत्या ठरवली जात आहे. अशा काळात राजकारणात काय मिळते? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो; काय देतो? हा प्रश्न बाजूला पडतो.
याचं विदारक पार्श्वभूमीवर शिवराज पाटील चाकूरकर यांचे जाणे हे अस्वस्थ करणारे आहे. ते केवळ माजी केंद्रीय गृहमंत्री नव्हते, तर राजकारणात निष्ठा जिवंत असू शकते याचे चालते-बोलते उदाहरण होते. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांनी वैयक्तिक संपत्तीचा डोंगर उभा केला नाही. आजच्या राजकीय निकषांनुसार हे अपयश मानले जाऊ शकते; मात्र लोकशाहीच्या दृष्टीने हीच त्यांची सर्वात मोठी शिदोरी होती.

स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात गांधींच्या नावावर सत्तेत गेलेले आणि गांधींच्याच विचारांना सोयीस्करपणे विसरलेले अनेक चेहरे इतिहासात नोंदले गेले. सत्ता टिकवण्यासाठी विचारांशी तडजोड, पदासाठी आत्मसन्मानाचा सौदा आणि संधीसाधूपणाला ‘राजकीय प्रगल्भता’ म्हणण्याची परंपरा रुजली. या प्रवाहात न अडकणारा नेता म्हणून चाकूरकर वेगळे ठरतात. सत्ता गेली तरी त्यांनी वैचारिक निष्ठा सोडली नाही, हे आज दुर्मिळ ठरते.
राजकीय दबाव केवळ बाहेरून नव्हे, तर घरातूनही येतो. कुटुंबातील सदस्य वेगळ्या पक्षात गेले, तिकीटाची आश्वासने दिली गेली आणि ती फोल ठरली; तरीही चाकूरकरांनी आपले वैचारिक माहेर सोडले नाही. आजच्या काळात पदासाठी तासाभरात पक्ष, विचार, नाती आणि इतिहास बदलणारे नेते मोठ्या अभिमानाने वावरतात. अशा वातावरणात चाकूरकरांचे उभे राहणे हे राजकीय धैर्याचे उदाहरण ठरते.
अशा काळात काही माणसे उरली होती, जी तत्वांशी तडजोड करत नव्हती. दुर्दैवाने ती माणसे आता एकेक करून आपल्यातून निघून जात आहेत. शिवराज पाटील चाकूरकर हे त्यापैकीच एक होते. काल त्यांनी जगाचा निरोप घेतला. देशाचे गृहमंत्रीपद भूषवलेला हा नेता जाताना मात्र एक साधे घर आणि स्वच्छ नाव एवढेच मागे ठेवून गेला. आर्थिक गणितात ‘शून्य’ असलेला हा माणूस निष्ठेच्या आकाशाएवढा मोठा होता.
सत्ता टिकवण्यासाठी गांधींच्या विचारांना दगा देणारे अनेक माजी मुख्यमंत्री आपण पाहिले. सत्तेच्या मोहापुढे झुकून विचारांना कुर्निसात घालणारे कित्येक नेते इतिहासात नोंदले गेले. मात्र सत्तेच्या हस्तिनापूराची सेवा करताना भीष्मासारखी प्रतिज्ञा पाळणारा नेता चाकूरकरांमध्ये दिसून आला. आजच्या राजकारण्यांकडे पाहिलेल्या नंतर आजची पीढी किंवा येणारी पिढी त्यांच्याकडून काय आचार विचार घेईल हे सांगणे खरच कठीण, महाराष्ट्रच चालू पंचवार्षिक वर्ष अथवा मागचे दोन वर्ष हे राजकीय व्यभिचाराचे अतिउच्च शिखर मानले जाते या विरोधाभासाने लोकशाही अस्वस्थ होते. आज निवडणुका जनतेच्या विश्वासावर नव्हे, तर पैशाच्या ताकदीवर जिंकल्या जात आहेत. मतदार हळूहळू नागरिक न राहता ‘टार्गेट ग्रुप’ बनत आहे. मत हे मूल्य न राहता वस्तू बनण्याच्या मार्गावर आहे. आणि ज्या दिवशी मतांचा बाजार मांडला जाईल, त्या दिवशी सत्ता जनतेची न राहता भांडवलदारांची होईल, हे ओळखणे कठीण नाही.
अशा काळात चाकूरकरांचे आयुष्य राजकारणाला आरसा दाखवते. निष्ठा म्हणजे मागासलेपण नव्हे; ती लोकशाहीची मणक्याची हाडे आहेत. तत्वांशिवाय सत्ता ही रिकामी कवच ठरते. प्रश्न एवढाच नाही की निष्ठा संपते आहे का, तर प्रश्न असा आहे की निष्ठावान नेते संपल्यावर लोकशाहीचे काय होणार? आजची पिढी चाकूरकरांना ओळखली पाहिजे. कारण त्यांच्या आयुष्यातून काँग्रेस हा केवळ पक्ष नव्हे, तर एक वैचारिक प्रवाह कसा होता हे समजते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे राजकारण हे संपत्ती जमवण्याचे साधन नसून सार्वजनिक सेवेचे माध्यम कसे असू शकते, हे त्यांचे जीवन शिकवते. चाकूरकर हे नाव इतिहासात नोंदले जाईलच; पण चाकूरकर हे तत्व जपले गेले, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अन्यथा निष्ठेचा अंत हा केवळ एका नेत्यापुरता मर्यादित राहणार नाही; तो लोकशाहीच्या आत्म्यालाच गिळंकृत करेल. आणि तेव्हा उशिरा उमगेल – सत्ता मिळवली होती, पण लोकशाही हरवली होती.

कटाक्ष -गणेश सावंत












