सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 10 मे रविवार
गणेश सावंत/9422742810
वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसले आहेत का? अखंड महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर काल भंडारे नावाच्या कलयूगी ’वार’कर्याने उभ्या महाराष्ट्राला देवून टाकलं. विचाराची लढाई ही विचाराने व्हावी हा संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंतच्या सर्वसंतांचा संदेश. मात्र याच संदेशाला पुर्णत: हरताळ फासण्याचे काम नव्हे तर संतांच्या विचाराच्या गळ्यालाच नख लावण्याचे काम तथाकथीत भंडारे नावाच्या महाराजाने केलं, असं आम्ही म्हटलं तर त्यात चुक ते काय? कारण इथे ‘वार’कर्यांचा हिंदू धर्म नव्हे तर वारकरी समूदायांचा धर्म म्हणजेच महाराष्ट्र धर्म होय. परंतू त्याच महाराष्ट्र धर्माला आणि साधू संतांच्या विचाराला इथे जर कोणी पायदळी तुडवीत असेल तर आम्हालाही तुकोबांचा भक्त म्हणून शब्दांची शस्त्र करावी लागतील आणि म्हणावे लागेल, ’वेदांचा अर्थ तो आम्हाशी ठावा, इतरांनी वाहवा भार माथा.’ काय आश्चर्य ज्या संतांनी एकता आणि समतेचा संदेश ज्या पुणे प्रांतात दिला त्याच पुणे प्रांतात संतांच्या नावे तोंड काळे करण्याचा धंदा दंडकअरण्यापासून पुणे प्रांतापर्यंत तथाकथीतांनी सुरू केला आणि
वारकर्याचा धर्म
वारकर्यांनाच सांगताना त्यांच्यावरच वार केले जावू लागले. वारकरी म्हणजे कोण? धर्म म्हणजे काय? हिंदू धर्माची व्याख्या काय? गितेचा सिद्धांत काय? ज्ञानेश्वरी आणि गाथेचा बोध काय? या प्रश्नाचं उत्तर तेव्हा मिळेल जेव्हा हे ग्रंथ डोक्यावर नव्हे, डोक्यात घेतले तर आणि तरच वारकर्याचा धर्म उमजून येईल. गीतेने आम्हाला त्यागाची शिकवण दिली, ज्ञानेश्वरीने आम्हाला जे जे वांछिल ते ते लाहो, प्राणीजात ही प्रार्थना दिली. जगद्गुरू तुकोबांच्या गाथेने विठ्ठल नामस्मरणाबरोबर फाजील धर्ममार्तंड आणि थोतांड बुवाबाजीविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ दिले. सत्य आम्हा म्हणी नव्हे गबाळ्याचे धनी, देतो तिक्ष्ण उत्तरे पुढे व्हावीयासे बरे। म्हणण्याची ताकद आम्हाला त्याच गाथेतून भेटली. याच संतांनी आम्हाला पंढरपुराच्या वाळवंटात खेळ मांडियेला वाळवंटी ठायी। नाचती वैष्णव भाईं रे । क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥1॥ म्हणत प्रत्येकाला माऊली या नावाने बोलण्याची शिकवण दिली. हा वारकर्याचा धर्म आहे. तोंड काळं करणार्यांचा वारकरी धर्म होवूच शकत नाही, तो जातीयवादीच, तो दहशतवादीच. हे आम्ही म्हणत नाहीत तुकोबांची गाथा उचला, त्यामध्ये स्वत:चं मुस्काट टाका, एक एक अभंग वाचा अन् मग आम्हाला सांगा, वारकर्याचा धर्म काय? ज्ञानदेव रचला पाया, तुका झालास कळस। ही वारकरी संप्रदायाची रचना आहे आणि त्याच वैचारिक, वैष्णव, माणसाला माणूस म्हणून पाहणार्या सर्वोच्च विचारांना वारकरी म्हणून कोणी तिलांजली देत असाल तर ती घुसखोरीच.
मराठी जनांचा स्वाभिमान
कोण? मराठी म्हणजे कोण? महाराष्ट्र मुलखात जो कोणी निपजला असेल मग तो कुंच्याही जातीचा असो, धर्माचा असो तो मराठी आणि त्यांचा स्वाभिमान, अस्मिता आणि वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस जगद्गुरू संत तुकाराम आहेत आणि पाया संत ज्ञानेश्वर आहेत. त्यामध्ये जेवढे काही साधू, संत, सूफी या महाराष्ट्र मुलखात आणि अखंड हिंदूस्थानात होवून गेले. त्या सर्वांनी विठ्ठल भक्तीबरोबर माणसाचा खरा धर्म मांडला परंतू कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। म्हणत इथल्या झाड फुलांना, फळ भाज्यांना बोलतं केलं. त्या महाराष्ट्रामध्ये माणूस धर्मच कोणी जर संपुष्टात आणू पाहत असेल आणि धर्मांधतेच्या विचारसरणीने दहशतवाद निर्माण करू पाहत असेल तर अशा तथाकथीत ‘वार’कर्याला वेदांचा अर्थ आम्हाशी ठावा म्हणत ‘ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगी लावूनिया राख, डोळे झाकुनिया करती पाप॥’ चारित्र्य आणि कृती यांच्याशी फारकत घेतलेल्या अशा मंडळींनी जेव्हा तत्वज्ञानाचे आभाळ सृजन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अशांचं पितळ उघडं करावं लागेल आणि मराठी जनांचा स्वाभिमान जपण्यासाठी गाथेच्या आधारातून पेकाटात लाथा माराव्या लागतील. दुर्दैवं याचं वाटतं आजचे तथाकथीत
’वार’करी
ज्या पद्धतीने कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा असलेल्या वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करून भंडारे सारखे आणि लातूरातल्या पिस्तूल्या महाराजासारखे लोक जेव्हा उजळ माथ्याने हिंडू पाहतात तेव्हा तुकोबांच्या आम्हा घरी धन शब्दांची रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू॥ म्हणत भले तरी देवू कासेची लंगोटी या अभंगाची आठवण करून द्यावी लागेल. कारण वारकरी पंथ हा जातीभेदाला मानत नाही, तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, देव तेथेची जानावा असे सांगत ईश्वर भक्ती नव्हे तर माणूसकी आणि समानतेचा संदेश दिला. तो खरा वारकरी विसरूच शकणार नाही आणि तथाकथीत ‘वार’कर्याला तुकोबांच्या संदेशाची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. ज्या तुकोबांनी जोडुनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी॥ म्हणत सोन्या चांदीवर प्रेम करण्यापेक्षा आपल्याला जगवणार्या मातीवर आणि भूमीवर प्रेम करा हे जसे सांगितले तसे आजच्या ह्या ‘वार’कर्याने सोने-चांदी मृतीकेसमान मानलेच नाही, हेही कालच्या घटनेने सिद्ध होते. तुकोबांनी आम्हाला परोपकार ते पुण्य, परपिडा ते पाप याची शिकवण दिली. म्हणजेच गोरगरीबांना, उपेक्षितांना मदत करणे हे खरे पुण्य आहे. गोरगरीब उपेक्षितांना त्रास देणे हे खरे पाप आहे. परंतू आम्ही हे सर्व विसरलोत आणि
धर्मांधतेच्या अफूने
इतके ग्रासलोत की ओढूनी तंबाकू काढीला धूर, बुडेल ते घर तेने पापे। हा तुकोबांचा संदेशही आम्ही विसरून गेलोत. जगद्गुरू संत तुकोबा श्रमाला प्रतिष्ठा देतात, ऐकखावू, परजीवी लोक त्यांना कधीच आवडले नाहीत. दुसर्याच्या श्रमाला जगणार्यांचा तुकोबांनी नेहमीच धिक्कार केला. भाकड कथा सांगून श्रमकर्याच्या जीवावर जगणार्या बुवाबाजीचा समाचार घेताना तुकोबा म्हणतात भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जीणे लाजीरवाणे. तथाकथीत धर्ममार्तंडांनो आपल्या दुकाणा थाटून भिक्षा मागून जगता, लाज कशी वाटत नाही? हा सवाल आमचा नाही जगद्गुरू तुकोबांचा आहे. पुढे तुकोबांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त, शकून अपशकून या अनिष्ट रुढी परंपराविरोधात प्रखड शब्दात आवाज उठविल्याचे मेळवुनि नर नारी शकून सांगती नानापरी, तुका म्हणे ऐसे मैंद तयापाशी नाही गोविंद, सांगो जानती शकून भुत भविष्य वर्तमान, तयाचा आम्हाशी कंटाळा, त्याचे तोंड न पाहावे. ही तुकोबांची शिकवण आहे आणि गेल्या साडे तीनशे चारशे वर्षांपेक्षा अधिक काळच्या वारकरी संप्रदायाला संपुष्टात आणण्याहेतू घरासमोरची तुळस उपटून त्या
तुळशीवृंदावनात गांजाचं झाड
लावण्याचं महापाप सध्या वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करणारे प्रतिगामी लोक करतायत. त्याचं ज्वलंत उदाहरण पिस्तूल्या महाराजाबरोबर भंडारे महाराजांनी दाखवून दिलं असं म्हटलं तर गैर ते काहीच नसेल. होय, जो कोणी स्वत:ला शिवरायांचा पायीक, त्यांचा मावळा, तुकोबांचा, ज्ञानोबांचा भक्त मानत असेल तो कधीही जातीभेद करणार नाही. वारकर्यांचा खरा धर्म सांभाळेल, स्वत:च्या तुळशीवृंदावनात धर्मांधतेच्या गांजाचं झाड उगवूच देणार नाही. महाराष्ट्रात अखंड हिंदूस्थानला नव्हे तर जगाला मानवतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय निधड्या छातीने वर्षांनूवर्षांपासून खडा पहारा देत आहेत. तोच खडा पहारा उलथवून टाकत परप्रांतिय धर्मांधतेचे पुरस्कर्ते घुसखोरी करून राजमाता जिजाऊ मॉसाहेब, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा संपुष्टात आणू पाहतायत. परंतू हे अशक्य आहे. कारण इथल्या प्रत्येक माणसांच्या नसानसामध्ये या सर्व साधू, संत, महापुरुषांच्या विचाराचं रक्त आहे ते फक्त आज सळसळतंय, उद्या उफळून येईल. म्हणूनच माणसाला माणूस म्हणून ओळख देणार्या वारकर्याला छेडू नका!










