बीड (रिपोर्टर): शहरातील स्वराज्यनगर भागातील नाला घाणीने पुर्ण भरला असून यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. घाणीने डासांची पैदास वाढून डेंग्यूसह इतर आजार उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नगरपालिका प्रशासनाने या भागातील स्वच्छतेकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी नागरीकांतून केली जात आहे.
शहरातील विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून बीड शहरामध्ये पाऊस पडत असल्याने या पावसामुळे जास्तच घाण वाढली आहे. स्वच्छता विभागाकडून वेळेवर नाल्या काढल्या जात नसल्याने नाल्या तुंबून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शहरातील स्वराज्य नगर भागातील नाला गेल्या अनेक महिन्यांपासून काढण्यात आला नाही त्यामुळे या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला. त्यामुळे दुर्गंधी परिसरात पसरली. दुर्गंधीमुळे डासांची पैदास वाढली असून डेंग्यूसह इतर आजार नागरीकांना होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेने तात्काळ या नाल्यातील घाण काढावी, अशी मागणी केली जात आहे.