जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला, दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडू लागली. केज तालुक्यातील आडस येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल चोरून नेला. उमापूर येथे एक बँक फोडून त्यातील काही रक्कम लंपास करण्यात आली. बीड शहरातील दोन मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला असून चोरट्यांना तिजोरी फुटली नसल्याने मंदिरातील रक्कम वाचली. एकूणच चोरीच्या घटना पाहता बीड पोलीस नेमकी कुठली भूमिका बजावतात ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
धारुर पोलीस ठाणे हद्दीतील आडस येथे प्रत्येक वर्ष सहा महिन्यांत चोरीच्या घटना घडत आहेत. ही मालिका मागील बर्याच वर्षांपासून सुरू आहे. परंतु विशेष यातील एकाही चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. हे दुकानफोडी असून अनेक वाहने चोरीला गेली आहेत त्याचाही काही सुगावा नाही. दुकानाचे शटर उचकावून फोडण्याची सेम पध्दत आहे. याच पध्दतीने 2 फेब्रुवारी 22 एक कपड्यांचे दुकान फोडण्यात आले. यानंतर 26 मार्च 2023 एक सराफा दुकान फोडण्यात आलेले आहेत. याचा आणखी तपास लागला तोच शनिवारी ( दि. 9 ) रात्री अज्ञात चोरट्यांनी आसरडोह रस्त्यावर धुमाकूळ घालत झिक्रा मेडिकल, माऊली कृपा किराणा, दत्त ग्रो एजन्सी, श्री. कृष्णा ज्वेलर्स या चार दुकानेचे शटर उचकटून फोडली आहेत. आतील रोख रक्कम व काही साहित्य चोरीला गेल्याची चर्चा आहे. परंतु नेमकं काय व किती ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट झाले नाही. यानंतर चोरट्यांनी अंबाजोगाई रस्त्याकडे मोर्चा वळवून मोबाईल टॉवर जवळील इंगोले किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. येथे चोरट्यांचे काही साहित्य मिळून आले. एकाच रात्री व रहदारीच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली तर सतत चोरीच्या घटना घडतात पण पोलीसांना काही सुगावा लागत नाही. यामुळे व्यापारी व येथील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
चौकातील सीसीटीव्ही चार वर्षांपासून बंद
पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले हे केज येथील पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी लोकसहभागातून उपविभाग अंतर्गत म्हत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या अंतर्गत आडस येथेही तीन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु त्यांची बदली झाली अन् याकडे दुर्लक्ष झाले. चार वर्षांपूर्वी केवळ वायर तुटल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. हे दुरुस्त करण्यासाठी येणारा खर्च पोलीसांनी करावा की, ग्रामपंचायतीने करावा म्हणून ते बंद आहेत. परंतु आता गावातील तरुण भीक मांगो आंदोलन करुन यासाठी निधी गोळा करणार असल्याची चर्चा आहे.