गणेश सावंत 9422742810
स्वातंत्र्यपूर्व काळात ‘करेंगे या मरेंगे’ ‘चले जाव’ इन्क्लाब जिंदाबाद या साध्या सुध्या शब्दांना वेद मंत्रांहूनही अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. कारण त्या शब्दामध्ये सत्य होते. धैर्याबरोबर संघर्ष करण्याची उर्मी होती. भविष्य होते. आणि स्वातंत्र्याच्या नव्या पहाटचे एक स्वप्न होते. आजही त्या घोषणा ऐकल्या अथवा दिल्या तर धमन्यांमध्ये रक्त सळसळते. अन् स्वातंत्र्यपूर्व काळातला तो काळाकुट्ट वाचलेला इतिहास डोळ्यासमोरून जातो. तसे या देशाला आणि खास करून महाराष्ट्रातील जनतेला संघर्ष नवा नाही. जेव्हा केव्हा अन्याय अत्याचार परिसिमा गाठतो. तेव्हा तेव्हा आवाज उठवलाच जातो. स्वातंत्र्यानंतरही गेल्या 75 वर्षाच्या कालखंडात या देशात आणि महाराष्ट्रात आवाज उठवलाच गेला. अरे आवाज कुणाचा असं म्हणत वेगवेगळ्या विषयांवर सत्ताधिशांंविरोधात आवाज उठवण्यात आला. मग अहिंसेचे वीर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या महात्मा गांधींचे प्रथम शिष्य जयप्रकाश नारायण असोत अथवा शेतकर्यांसाठी लढा उभारणारे शरद जोशी असोत. यांचे आंदोलन हे सत्यासाठी आणि न्यायासाठीच होते. या आंदोलनाची व्याप्ती स्वातंत्र्य लढ्याएवढीच मानली गेली. पुढे गेल्या 20 वर्षाच्या कालखंडात जे आंदोलने झाली त्यामध्ये अण्णा हजारेंच्या दिल्लीतील आंदोलनाला देशात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त करता आलं. पुढं केंद्र सरकार विरोधात तब्बल सहा महिने शेतकर्यांनी आंदोलन उभा केलं. केंद्रातील मोदी सरकारने या आंदोलनाला आंदोलनजीवी म्हणून हिनवलं. धनधांडग्या मंत्र्यांच्या पोरांनी शेतकर्यांना गाडीखाली चिरडलं. तरी आंदोलन शमलं नाही. शेवटी सरकारला शेतकर्यांच्या विरोधात जाणारे कायदे वापस घ्यावे लागले. मुस्लिमांचं शाहिन बाग असो, अथवा मराठा आरक्षणासाठी राज्यभर निघालेले दहा दहा लाखाचे मराठ्यांचे शांततेतले मोर्चे असोत ते आंदोलने देशाच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी लिहिले जातील. आताही
‘करेंगे या मरेंगे
मनोज जरांगे’
हे शब्द प्रयोग महाराष्ट्रातल्या गावकुसावर आणि शेताच्या बांधा बांधावर ऐकावयास मिळतात. गेल्या तीन महिन्याच्या कालखंडात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे. यासाठी मनोज जरांगे या साध्या सुध्या व्यक्तीने आंदोलन पुकारलं अन् त्या आंदोलनाला महाराष्ट्रातील मराठ्यांनी साद दिली. आजपर्यंत एक छत्राखाली कुंच्याही नेत्याला मराठ्यांना आणता आले नाही. मात्र मनोज जरांगे सारख्या साध्या सुध्या व्यक्तीला ते का जमले बरे. मराठ्यांचं नेतृत्व आजपर्यंतच्या मराठा नेत्यांना एकतर्फी का करता आले नसावे? मराठ्यांच्या मताचे सातत्याने ध्रुवीकरण का होत गेले? मराठा नेतृत्व मराठ्यांच्या मतांबाबत विश्वासू का नव्हतं? अथवा मराठ्यांचे मते एकगठ्ठा का पडत नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न पडत असतांना आज मनोज जरांगेंच्या पाठीशी अवघा समाज का उभा राहतोय? हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर जगाला पडला असेल. मात्र लोक प्रतिनिधींना मराठ्यांकडून सत्ता अपेक्षित असते. इथे मात्र मनोज जरांगेंना साथ हवी आहे ती केवळ मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजासाठी, गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी क्रांतीवीर नाना पाटलांपासून आण्णासाहेब पाटलांपर्यंत अनेकांनी टोकांचा लढा उभारला. मात्र जेव्हा केव्हा मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला. तेव्हा तेव्हा सत्ताकारणाच्या गणीतात आडकलेल्या आणि स्वत:ला नेतृत्व संबोधून घेणार्या आजपर्यंतच्या नेत्यांनी एक तर माणूस संपण्याची वाट पाहिली अन् मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत मराठ्यांच्या मागणीची वाट लावली. परंतू मनोज जरांगे हा साधा सुधा व्यक्तीमत्त्व असणारा
45 किलोचा मनोज दादा
झाला. अन् अवघा महाराष्ट्र या बहाद्दराने एकवटून टाकला. त्या मागचं कारण शोधायचं झालं तर गेल्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये आरक्षणाच्या लढ्यात उतरताना त्यांचे तीन वाक्य हे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ‘करेंगे या मरेंगे’ या साध्या सुध्या शब्दांना वेद मंत्रांहून अधिक महत्त्व जसे देतात तसेच अनन्यसाधारण महत्त्व असलेले ते वाक्य म्हणावे लागतील. पहिलं वाक्य ’मरण पत्कारेल पण मॅनेज होणार नाही’ या वाक्यातून मराठ्यांना जरांगेंनी विश्वास दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या पद्धतीने स्वातंत्र लढा उभारणार्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले तसेच या वाक्यातून आपण घरावर तुळशीपत्र ठेवून आंदोलनात उतरलो आहोत. हे जरांगेंनी छातीठोकपणे दाखवून दिले. त्यांचे पुढचे वाक्य ‘एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल नसता माझी अंत्ययात्रा निघेल’ या वाक्याने मराठ्यांना विश्वासाबरोबर आरक्षणाच्या आशेचा किरण दिसला. आणि एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस आपल्यासाठी जीव द्यायला निघाला. त्याच्या पाठीशी आपण उभे राहायलाच हवे. हे मराठ्यांना मनोमनी वाटले. पुढे एका सभेमधले किंवा पत्रकार परिषदेमधले एक वाक्य आम्हाला आजही आठवते. ते वाक्य म्हणजे ‘आलो तर तुमचा नाही तर समाजाचा…! कुंकू पुसून तयार रहा..!!’ हे बायकोला सांगून आल्याचं जेव्हा मनोज जरांगेंनी समाजासमोर मांडलं तेव्हा समाजाच्या विश्वासाला अधिक बळकटी मिळाली. आम्ही नेहमी म्हणतो आणि लिहितो 40 पौंडाचे मोहन करमचंद गांधी हे अहिंसेचे वीर होत महात्मा गांधी होतात त्या मागे एक मोठा संघर्ष नक्कीच असतो. इथंही मनोज जरांगेंच्या मागं एक संघर्ष आहे आणि त्यासाठीच त्यांच्या साथीला मराठे उभे आहेत, म्हणूनच मराठ्यांच्या आंदोलनाला आज धार आहे. भलेही या आंदोलनाचा शेवट काय असेल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही यावर मत मतांतरे असली तरी लढा मात्र अधिक अधिक जाज्वल्य होताना दिसून येतोय. जरांगे मागे हटत नाहीत हे जेव्हा सरकारच्या लक्षात येते तेव्हा या लढ्यातून
तोडा फोडाचे राजकारण
करायला सुरूवात होते. या देशाचा तो इतिहास आहे. अखंड हिंदूस्थानात आपलंच अधिराज्य असावं असं जेव्हा इंग्रजांना वाटलं तेव्हा त्यांनी फोडा आणि तोडाचे राजकारण केले, जाती जातीत भांडणं लावले. धर्मा धर्मात वितुष्ट लावत आपलं सत्ताकारणाचं बिज लावलंच नाही तर त्याचा वटवृक्ष करत या देशावर 200 वर्षे राज्य केलं. तेच धोरण 2014 नंतर या देशात आणि राज्यात पहायला मिळतयं. लोकांच्या मुलभूत गरजांपेक्षा मंदिर मस्जीदला अधिक महत्त्व दिलं जातयं. हिंदू-मुस्लिम, दलित-संवर्ण अन् आता मराठा-मराठेत्तर अशा झुंजी लावल्या जात्यात. मात्र शाहू-फुले-आंबेडकरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अन् नामदेवांपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांपर्यंतचे प्रबोधन आज महाराष्ट्रामध्ये कामी येतयं. सत्ताकारणाच्या उबेमध्ये झोपू पाहणार्यांना आज कुठलाच समाज त्यांचे मनसुंबे पुर्णत्वास नेहू देत नाहीत. प्रयत्न केला गेला, ओबीसीचे आणि मराठ्यांचे लावून द्यायचे, मराठ्यांच्या मतांचे ध्रुवीकरण करत ओबीसीच्या मतावर पुन्हा सत्ताकारणाचं गणीत जुळवायचं. परंतू आता लोक हुशार झालेत मात्र काहींनी ओबीसी विरूद्ध मराठा वाद कसा लागेल याला अधिक महत्त्व दिले. मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नाही. जरांगेंच्या आंदोलनाला बदनाम करण्याहेतू जरांगेंना कधी बेवडं तर कधी हुक्कीबाज म्हणून हिनवण्यात आलं. मात्र हा बहाद्दर ज्या पद्धतीने लढ्यात आणि तहात हारत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. आजपर्यंत सरकारने दोन वेळेस वेळ मागितला आणि आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला जावा, अशी मराठ्यांकडे विनंती केली. यातून सरकारला मराठ्यांना केवळ झुलवतच ठेवायचे का? असा सवाल जेव्हा मराठे विचारू लागले तेव्हा 24 तारखेचं सरकारला दिलेलं अल्टिमेट संपण्यापूर्वी
उद्या जरांगेंची इशाा सभा
बीड शहरात होत आहे. या इशारा सभेला दहा लाखांच्या आसपास मराठे आणि माता भगिनी उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे, तशी तयारीही झाली आहे. मात्र उद्याच्या इशारा सभेमध्ये जरांगे काय बोलतात, सरकारला कुठला इशारा देतात, मराठ्यांची भावना काय असेल, पुढचा लढा कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष आता लागून राहिला आहे. जेवढी उत्सुकता मराठ्यांना आता तेवढीच इतर समाजाला आणि त्यापेक्षा भीती आहे ती सरकारला. कारण या आंदोलनाला गेल्या 30 तारखेला बीडमध्ये गालबोट लागले आणि थेट पुढार्यांची घरे जाळण्यात आली. ही घटना वगळता मराठ्यांचं आजपर्यंतचं आंदोलन हे शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने असताना सरकार मात्र मराठ्यांना ठिकठिकाणी डिवचट असल्याचा आरोप जरांगेंनी कालच केला. आता या सभेतून मराठ्यांचा सूर काय निघतो आणि त्या सुरावर सरकार कुठली कृती करते अन् त्या कृतीवर मराठयांची प्रतिक्रिया काय असेल? हा येणारा काळ सांगेल, परंतु सामाजिक भान असणार्या आमच्यासारख्यांनी लढा नक्कीच मोठा व्हावा, मात्र त्या लढ्याच्या झळा सर्वसामान्यातील सर्वसामान्यांना बसणार नाही याची काळजी अधिकतेने घेतली जावी, ती आंदोलनकर्त्यांबरोबर सरकारची जबाबदारी असेल. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुबळा नक्कीच आहे, त्याला आरक्षणाची नितांत गरज आहे. यावरही दुमत असण्याचे कारण नाही.