मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर, सत्ताधार्यांसह विरोधकांचा पुर्ण पाठिंबा
मुंबई (रिपोर्टर): मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आज विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सादर करून ते विधेयक आवाजी मतदानाने एकमताने पारीत करण्यात आले. त्यामध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. हे आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी राज्य सरकार शेवटच्या टोकाचे प्रयत्न करणार असल्याचे सांगून हे आरक्षण न्यायालयातही टिकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आरक्षणाबाबत 6 लाख हरकती आल्याचेही त्णयांनी सांगितले. त्याचबरोबर 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे देशातल्या 22 राज्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा वेग आला. ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची होती. मात्र आरक्षणाबाबत आज विशेष अधिवेशन बोलवून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेच्या पटलावर मांडले. ते विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले व मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 10 टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली. या वेळी मुक्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी मी महाराजांसमोर नतमस्तक होत आरक्षण देण्याची शपथ घेतलीह ोती. हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे एका जातीचा वा एका धर्माचा विचार मला करता येणार नाही. सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ब्रिद वाक्य आहे. त्यामुळे एकाची बाजू घेणं माझ्याकडून होणार नाही. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी या वेळी म्हटले. आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे. ना कोणावर अन्याय ना कोणाला धक्का असा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी म्हटले. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्यामुळे त्यांच्या विचारांवर राज्यातील जनतेला काय वाटते किंवा राज्यातील जनतेला कशाची गरज आहे हे पाहण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल तोडून लोकांमध्ये जात आहे. आंदोलने विकासाला परवडत नाहीत, मध्यंतरी काही घटना घडल्या, त्या घडायला नको होत्या. मागील 150 दिवसात आरक्षणावर अहोरात्र काम केले. तीन ते चार लाख लोक आरक्षणाच्या विषयावर डोळ्यात तेल घालत काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले. मागासवर्गीय आयोगाचा अहवालही राज्य सरकारने स्वीकारले आहे, विधेयक मंजूर झाले आहे, आता ते अपाण कोर्टात टिकेल की नाही हे पाहू. आपण सकारात्मक आहोत. बिहार, तामिळनाडू, हरियाणा यासह 20 राज्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिली. आम्ही दिलेलं आरक्षण शंभर टक्के टिकणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
000
उद्या आंदोलनाची दिशा ठरणार; सराटी अंतरवलीत बैठक
विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षणाबाबतचे विधेयक आज एकमताने मंजूर केले. हे आरक्षण टिकेल की नाही याबाबत शंका असल्याचे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, सग्यासोयर्यांचा विषय मिटवा, आज मंजूर केलेले आरक्षण मराठा समाजाला फायदा देणारे नाही, हरकतीचा विषय पुढे करून मराठ्यांना हक्कापासून दूर ठेवू नका, असे म्हणत उद्या सराटी अंतरवली येथे मनोज जरांगे यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.