मुंबई (रिपोर्टर): मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज महाराष्ट्र विधिमंडळाचं एक दिवसीय अधिवेशन पार पडतंय, याचा आम्हाला आनंद आहे. परंतु गोरगरीब मुस्लिम समाजाचा कोणताही पक्ष विचार करत नाही. कोणतंच सरकार आम्हाला आरक्षण देत नाहीये. मराठा समाजाला न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका असताना मुस्लिम समाजावर अन्याय कशासाठी? असा सवाल विचारून मराठ्यांसोबत आम्हालाही आरक्षण हवं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडतंय. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले जाणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी विधिमंडळ आवारात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन केलं. मुस्लिमांवरील अन्याय थांबवा, मराठा समाजासोबत मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण लागू करा, असा फ्लेक्स घेऊन दोघा आमदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरक्षणप्रश्नी आपली भूमिका मांडली.