गेवराई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाबाबत पोलीस प्रशासनाने आता आक्रमकतेने घेत सदरच्या आंदोलनाचे फलक काढण्यास सुरुवात केली आहे. आज गेवराई तालुक्यातील तांदळा येथील मनोज जरांगे यांचे फलके काढून टाकण्यात आले. यावेळी गावकरी आणि पोलिसात काही वेळ वाद झाला. या वेळी उपस्थित मराठा आंदोलकांनी पोलीस हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगत आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे, असे म्जहणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गावागावात आणि तालुकास्तरावर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आपण राज्यभरात भेटीगाठीबाबत दौरा काढणार असल्याचे त्यांनी या आधीच म्हटले आहे. त्यानुसार मराठा समाज ठिकठिकाणी बैठका घेत आहे. तर दुसरीकडे पोलीसही या आंदोलनाच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. आज तांदळा येथील मनोज जरांगे पाटील यांचे छायाचित्र असलेले अनेक बॅनर पोलिसांनी काढून टाकले. या वेळी काही काळ पोलीस आणि गावकर्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. नंतर आंदोलनकर्ते मराठ्यांनी ते बिचारे वरिष्ठांचे आदेशाचे पालन करीत आहेत, त्यांना विरोध करू नका, आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने असल्याचे सांगत ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध केला.