बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौर्यास आजपासून सुरुवात झाली आहे. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली आहे. पण मी इंचभरही मागे हटणार नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल. तुमचा सगळा सुपडा साफ होईल, असे आव्हानच मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात मराठा समाजाने उमेदवारी अर्ज भरावेत, असा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे का? असाही प्रश्न माध्यमांनी जरांगे यांना विचारला. तेव्हा जरांगे म्हणाले की, मराठे काहीही करू शकतात. सरकारने तर आमचे बॅनर आणि फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहेत. आमच्या घरावर पत्रक चिकटवायचे आहेत. तेव्हा आम्हीही सहन करणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं. मनोज जरांगे पुढे म्हणाले, माननीय न्यायालयाने आम्हाला शांततेत रास्ता रोको करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही काहीही करणार नव्हतो. माझ्या उपोषणाचा 15 वा दिवस असताना 22 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने 13 मार्चला पुढील तारीख दिली होती. पण एका रात्रीत गृहमंत्र्यांनी तारीख बदलून 23 फेब्रुवारी करून घेतली. त्यानंतर एका गुप्त बैठकीत ठराव झाला, ‘मनोज जरांगेला 10 टक्के आरक्षण स्वीकारायला लावा, नाहीतर त्याला गुंतवा.’ असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे त्यादिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली गेली.माझी मान जरी कापून नेली, तरी मी एक इंचभर मागे हटणार नाही. पण त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे देवेंद्र फडणवीस यांना दाखवून देऊ. त्यांचा सगळा सुपडा साफ होईल.