गणेश सावंत -9422742810
आता बस्स झालं, या महाराष्ट्राने हिंदू-मुस्लिमांची दंगल पाहिली, दलिद-संवर्णांचा वाद पाहिला, सवर्णांकडून दलितांची अवहेलना पाहितली, आता माहिती तंत्रज्ञानाच्या या युगातली तरुणाई माणसाला माणूस म्हणून पाहण्यासाठी आसुसलीय. तिला तिच्या भविष्याची आस आहे. त्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत कर्तृत्ववान व्हायचय, शाहू-फुले-आंबेडकरांचं दायित्व स्वीकारायचं, त्या तरुणाईला आकाशात भरारी घ्यायचीय. जे क्षेत्र निवडेल त्या क्षेत्रातले छत्रपती व्हायचय, असे स्वप्न ही तरुणाई पहात असताना पुन्हा पुन्हा या महाराष्ट्रात जातीयवाद कोण फोफावतोय? जाती-जातीत भांडणे कोण लावतोय? हिंदू-मुसलमान जमलं नाही, दलित -सवर्ण होत नाहीत, म्हणून आता मराठा विरुद्ध ओबीसी, ब्राह्मणाविरुद्ध ब्राह्मणेत्तर असा वाद पेरला जातोय आणि या पेरलेल्या वादाला खतपाणी समाजातले आपलेच लोक घालतात तेव्हा त्या जातीयवादाच्या बिजाला केव्हा कुठं अंकुर फुटेल आणि ती जातीयवादाची विषवल्ली घराघरावर कशी पसरेल हे जे कुणाचे मनसुबे आहेत ना ते उभ्या महाराष्ट्राला चिराख करून सोडणारे आहेत. त्यामुळे आता खरी गरज आहे ती सावध होण्याची. आज जो तो
सत्याची लढाई
लढत असल्याचे सांगत सत्याचा धर्माशी संबंध जोडून आक्रोश करत आहे. त्यामुळे त्यातले सत्यच नाहीसे होते. हे त्यालाही माहित असते. म्हणून मग धर्माच्या मागेच जातीयवाद सुरू होतो. असे असले तरी सत्याबद्दल वाद होतो तेव्हा प्रत्यक्षात तो वाद सत्याचा नसतोच. तो असतो ‘माझे सत्य’ याचा. आज धर्माच्या नावावर जे काही वाद ऐकले आणि पाहिले जात आहेत ते ‘माझे सत्य’ याचे आहेत, राज्यात आज जी मराठा विरुद्ध ओबीसी उभा करण्याचा कट ज्याच्या मस्तकातून शिजला त्याने एका हातात सत्य घेतलं, दुसर्या हातात जात आणि धर्म घेऊन मनात मात्र सत्तेची सेज ठेवली. इथे प्रत्येक जातीच्या तरुणाईला तु सत्याचा पाईक आहेस असे म्हणून त्याला प्रोत्साहन दिलं जातं आणि हळूच दुसर्या हातातली जात त्याच्या मस्तकी उतरवली जातेय. मग कोणी मराठा म्हणून अभिमान बाळगतो, कोणी माळी म्हणून, कोणी साळी म्हणून, कोणी कोळी म्हणून यात काय साध्य होते? तर केवळ आणि केवळ जातीय द्वेष. आजची परिस्थिती अशीच आहे. लोक पुढे उभे राहिले आणि सत्याला मागे ढकलले. सत्य मागे उभे राहील तेव्हा ते खोटेच असेल. सत्य समग्रपणे स्वीकारावे लागेल. त्याचे थर काढण्याचा प्रयत्न केला तर प्रश्न सुटला तरी आपण गोंधळात पडू. जे लोक कोणत्याही धर्माचे सत्य जाणण्याचा दावा करतात, त्यांच्यासाठी सत्य हे एक शस्त्र आहे, तो एकमेकांना घायाळ करण्यासाठी दगड आहे. ज्या सत्याच्या नावाने एवढा गदारोळ होतो, ते सत्य थोडेसेही समजून घेतले, जगले तर स्वतः शांत व्हाल आणि आपल्या अशांततेने आजूबाजूचे वातावरण दूषित केले असेल तर तेही निर्मळ आणि पवित्र होईल. हे आता समजून घ्यावेच लागेल.
मराठ्यांच्या आक्रोषाला
डीएनए उत्तर नव्हे
मराठा समाजाने आपल्या गेल्या चाळीस वर्षांची मागणी लावून धरली. सरकार दरबारी त्यांनी आक्रोश मांडला, ते रस्त्यावर उतरले. तेव्हा त्यांचा आक्रोश समजून घेणे, त्यांची पिडा जाणून घेणे, हे सत्ताधार्यांचे आद्य कर्तव्य होते. मात्र महाराष्ट्रात जातीयवाद्यांची पिलावळे सत्तेच्या सेजेत निजतात, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच आणि ते समोरही आले. महाराष्ट्रात सर्वात मोठा समाज मराठा हा एकत्रित होतोय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मराठ्यांचे मते आपल्या हातून निसटतायत, हा शुद्ध हेतू अंगी बाळगून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने स्वत:च्या पक्षाचा डीएनए ओबीसीसोबत जोडला तेव्हा उभ्या महाराष्ट्रात माणसाची फाळणी होणार हे निश्चित झाले. मोठ्या जातीत धु्रवीकरण करणे सहज शक्य मात्र छोट्या जाती जमवत त्यांना भावनिक साद घालत तुमचा आणि आमचा एकच डीएनए आहे, एकच रक्त आहे हे सांगत मोठ्या जातीचा धाक आणि भीती दाखवत ज्या पद्धतीने सत्ता अभिलाष्यांनी महाराष्ट्रात दुफळी निर्माण केली. ती घातक म्हणावी लागेल. गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये
राजकीय सैराचार
जेवढा महाराष्ट्रात झाला तेवढा सैराचार एखाद्या शरीर विकून पोटाची आग विझविणार्या वेश्येनेही केला नसेल. तिथे कधी हे लोक जात पहात नाहीत, धर्म पहात नाहीत, जेव्हा सत्ताकारण केले जाते तेव्हा पुढार्यांना जात आडवी येत नाही, धर्म आडवे येत नाही, तिथे केवळ सत्तेच्या सेजेवर निजता कसे येईल आणि त्या सत्तेच्या ललणेच्या कुशीत खुशीची उब कशी घेता येईल एवढेच पाहिले जाते. जर प्रत्येक पक्ष सत्तेसाठी फुटून वैचारिक मतभेद समूळ नष्ट करू शकत असेल आणि स्वत:च्या सैराचाराला निष्ठेचे आवरण देत सत्याचा जय जयकार करत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीतील माणसाने जातीयवादाच्या आवरणाला फेकून माणुसकीच्या जातीयचे आवरण अंगावर का घेऊ नये? परंतु इथे तसे होणार नाही, माणसांना वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये जेव्हा विभागलं जाईल तेव्हाच सैराचार करणार्या पुढार्यांचे भले होईल. होय, आम्ही छातीठोकपणे सांगू, प्रत्येकाला स्वत:च्या जातीचा आणि स्वत:च्या धर्माचा अभिमान असलाच पाहिजे परंतु त्याला दुसर्याच्या जातीबद्दल, धर्माबद्दल आकस असता कामा नये. सत्तेतले पुढारी जेव्हा एकमेकांच्या विरोधात असतात तेव्हा ते कटू शब्द बोलतात, मात्र सत्तेसाठी एकत्रित आले की, ते बंधू होतात. याचे ज्वलंत उदाहरण सध्या महाराष्ट्रात पहायला मिळेल. तात्वीकदृष्ट्या काय कुठल्याच दृष्ट्या अजित पवार भाजपाशी संलग्न असूच शकत नाहीत, हे सांगणारे फडणवीस काल अजित पवारांची स्तूती करता करता पार कोमजून गेले. हे जेव्हा सर्वसामान्यांच्या लक्षात येईल तेव्हा जातीयवाद्याची मळभ दूर होईल. या महाराष्ट्रामध्ये सत्ताधार्यांनी अनेक वेळा
जातीय द्वेष
पेरण्याचा प्रयत्न केला आणि हा जातीय द्वेष पेरण्यासाठी या वेळेस निर्बुद्ध लोकांना हाताशी घेतलं नाही, बेकारांना पैसे देऊन जातीयवाद निर्माण करण्याचे काम केले नाही, तर या वेळेस दस्तुरखुद्द सत्तेतले लोकच जात आणि धर्म हातात घेऊन बाहेर पडले. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचण्याचा धडाका सुरू होता. कधी मस्जिदीच्या बाहेर तर कधी अजून कुठे हनुमान चालीसा ही बळ देते. परंतु त्याच हनुमान चालीसाचा उपयोग जात आणि धर्म यांच्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठी केला, परंतु तितेही हिंदू-मुसलमान आमने-सामने येत नाहीत हे पाहिल्यावर तो विषय अडगळीला गेला आणि पुन्हा महाराष्ट्रात मराठा विरुद्ध डीएनएचा प्रयोग सुरू झाला. या प्रयोगाला यथावकाश यश मिळत चालले आणि नकळत आम्हीच त्या प्रयोगातले नायक होत राहिलो तर अवघड आहे. म्हणूनच या
जातीयवादाचा बाप
शोधताना सजग आणि सतर्क राहणे नितांत गरजेचं आहे. आजची तरुण पिढी ही सुशिक्षीत असली तरी त्या तरुण पिढीच्या मस्तकात जे जातीयवाद्याचे मेमोरी कार्ड टाकण्याचा प्रयत्न होतोय ना तो प्रयत्न खरं तर हाणून पाडला पाहिजे. हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रात तुमचा-आमचा जन्म झाला आहे हे जेव्हा प्रत्येकाला उमजेल तेव्हा जातीय विद्वेष हा काही आता केवळ आगपाखडू भाषणांचा आणि लिखाणाचा विषय राहिलेला नाही. जातीयवादी आणि जमातवादी, शासनाची भीती न बाळगता ज्या प्रकारची भाषणे करतात त्यांचे त्रोटक अहवाल वाचले तरी धक्का बसतो; पण जमातवादी आता त्या पलीकडे गेले आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण जसजसे होत आहे तसतसे समाजचे समाज गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुंड, पुढारी, आर्थिक हितसंबंधी – त्यांची धर्म, जात, कोणतीही असो- नियोजनपूर्वक दंगली आणि कत्तली घडवून आणतात. त्याला पोलिसांचीही साथ मिळते. अशा दंगली सुरू झाल्या, की शेतकर्यांचे, कष्टकर्यांचे, दलितांचे, सर्वसामान्य माणसांचे आणि स्त्रियांचे आवाज कत्तलीच्या कोलाहलात ऐकू येईनासे होतात. हे दंगली घडवून आणणारे खेड्यापाड्यात नसतात, शहरांतून येतात. यांचा मुखवटा आता बदलला आहे; पण माणसांचा हा शत्रू इतिहासात सर्वसामान्यांचे घर उजाड करण्याकरिता अनेकदा आला आहे. कधी लुटारूंच्या स्वरूपात आला, कधी अंधभक्तीच्या स्वरूपात आला, आता याची साथ त्याची साथ म्हणत येतो आहे. या हाताचा बंदोबस्त करण्याची वेळ आजच आहे. जमातवादाच्या विरुद्धचे लढाईचे कुरुक्षेत्र महाराष्ट्र हेच आहे आणि या भस्मासुराला गाडण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना पार पाडायची आहे.