बीड (रिपोर्टर): केंद्रिय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आढावा घेतला. या वेळी राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे व्हिसीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. धनंजय मुंडेंनी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम परळीकडून चालू करा, अशी मागणी करत आहोत, मात्र ते होत नाही. तेव्हा दानवे यांनी तात्काळ याबाबतची माहिती भ्रमणध्वनीवरून रेल्वे बोर्डाच्या अधिकार्यांकडून घेतली आणि मार्च अखेरपर्यंत परळीकडून काम सुरू होईल, असे दानवेंनी म्हटले. या वेळी दानवेंनी काही रेल्वे अधिकार्यांनाही खालच्या पट्टीत झापले.
रावसाहेब दानवे जेव्हा रेल्वे अधिकार्यांसोबत बैठक घेत होते तेव्हा रेल्वे अधिकार्यांकडून पाहिजे तशी माहिती त्यांना उपलब्ध होत नव्हती, तेव्हा दानवे संतापले आणि म्हणाले, मिटींगला आलाय की चप्पलचे पॉलिश करायला आलाय, मिटींगला येतांना अद्यावत माहिती, रेकॉर्ड आणता येत नाही का? असे म्हणत ए रेल के अधिकारी कहॉ कहॉ से उठा के लाए है… असा वैताग करत बैठक पुढे सुरू ठेवली. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे व्हिसीद्वारे सहभागी झाले होते. मुंडे म्हणाले, आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून परळीकडून काम सुरू करा, अशी मागणी करत आहोत, मात्र परळीकडून काम सुरू होत नाही. त्या भागातून काम सुरू झाले नाही तर रेल्वे येण्यासाठी आणखी उशीर होईल, तेहा दानवे यांनी बैठकीतूनच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना भ्रमणध्वनी केला आणि तेथील अडचण विचारली, तेव्हा जमीनीबाबत व औष्णीक केंद्र यांच्याबाबतची अडचण असल्याचे निष्पन्न झाले. ती अडचण मार्च अखेरपर्यंत संपुष्टात येईल आणि नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम परळीकडूनही सुरू होईल, असे दानवेंनी बैठकीत म्हटले.