बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुका आणि मार्च-एप्रिल महिन्यात होत असलेल्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले असून या कालावधीत कोणत्याही स्वरुपाचे मोर्चे, जयंती, निदर्शने, उपोषणे यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या सक्षम अधिकार्याची परवानगी घेतल्याशिवाय करता येणार नाही. हे आदेश 29 मार्च पर्यंत लागू करण्यात आलेले आहेत.
मराठा, ओबीसी, धनगर व इतर समाजांचे विविध मागण्यांसाठी उपोषणे, आंदोलने, सभा सुरू असतात, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपोषणे आंदोलने, सभा या कारणामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये त्यासोबतच 12 मार्चला पवित्र अशा रमजान ईदच्या अनुषंगाने मुस्लिम धर्मियांचे पवित्र रोजे (उपवास) सुरू आहेत. 24 मार्चला होळी आणि 25 मार्चला धुलीवंदन, तिथीप्रमाणे 28 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि 29 मार्चला गुड फ्रायडे असे विविध सणोत्सव आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हे मनाई आदेश जिल्हाधिकार्यांनी काढलेले आहेत. त्यासोबतच कोणत्याही कारणासाठी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यासही मज्जाव घालण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही नागरीकाला शस्त्र, काठी, तलवार, बंदूक, दाहक पदार्थ किंवा धोकादायक उपकरणे बाळगता येणार नाहीत. समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबात्मक नकलाही करता येणार नाही, जाहीरपणे घोषणा देणे, वाद्य वाजविणे, गाणे वाजविणे किंवा कोणतेही कृत्य जे की देशविरोधी असेल हेही करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. हे मनाई हुकूम मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (इ) (3) या कल्माद्वारे काढण्यात आलेले आहे.