सुप्रिया सुळे यांच्या ‘बालिश’ वक्तव्यावर ओबीसी नेत्यांचा पलटवार
नेटकर्यांनीही घेतला चांगलाच समाचार, ‘उत्कृष्ट संसदपटू’वर टीकेचा भडिमार
बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट अवघ्या काही तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. परळी मतदारसंघातील काही महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात ही भेट झाल्याचे स्पष्ट असतानाही, मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदावरून विरोधकांनी अफवा, आरोप आणि टीकेची राळ उडवत संपूर्ण वातावरण ढवळून काढले. मात्र या सार्या प्रकारातून धनंजय मुंडे आणि ओबीसी नेतृत्वावर तिरस्कार करणार्या विरोधकांचा अक्षरशः तिळपापड झाल्याचे चित्र दोन दिवसांत स्पष्टपणे समोर आले आहे.
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद दिल्यास बीडमध्ये येऊन उपोषण करणार, असे अत्यंत बालिश आणि असंवेदनशील वक्तव्य करत असल्याने उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळखल्या जाणार्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. याच पार्श्वभूमीवर काही सोशल मीडिया वीरांनी आत्महत्या, आत्मदहन यांसारख्या अवास्तव आणि जबाबदारीहीन वावड्या पसरवल्याने राजकीय पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी स्वतः पुढे येत केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट ही परळी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर झाल्याचे स्पष्ट केले. यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही दुजोरा दिला. मात्र तरीही विरोधकांनी जाणीवपूर्वक या भेटीला वेगळे वळण देत मुंडेंना पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
या प्रकरणात यावेळी ओबीसी नेते व आंदोलकांनी थेट मैदानात उतरत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या निकटवर्तीयांना पार्थ पवार प्रकरणासह पवार कुटुंबाच्या नावाशी जोडल्या गेलेल्या कथित घोटाळ्यांची आठवण करून देत, पुण्यातील घोटाळे व अत्याचार प्रकरणांवर उपोषण करण्याचे आव्हान दिले.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनीही डॉ. संपदा मुंडे प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी उपोषण व आंदोलन करावे, असा थेट सवाल उपस्थित केला. तर सर्वोच्च न्यायालयातील वकील व ओबीसी आंदोलक ड. मंगेश ससाणे यांनी सुप्रिया सुळे व अन्य विरोधकांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेत, स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या टोकाच्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावे, नाहक ओबीसी नेत्यांना बदनाम करू नये, असे स्पष्ट मत मांडले.
उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविल्या जाणार्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. नेटकर्यांनी लवासा जमीन घोटाळा, मुंढवा जमीन घोटाळा, पुण्यातील गँगवॉर, कोयता गँग, वाढती गुन्हेगारी, दाऊदच्या हस्तकांना मदत केल्याचे आरोप अशा अनेक मुद्द्यांची आठवण करून देत, या विषयांवर उपोषणे आणि आंदोलने करण्याचे खुले आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे डॉ. संपदा मुंडे यांच्यासारख्या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणात आजवर मौन बाळगणार्या सुप्रिया सुळे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या नेत्यांकडून ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, अटकेची चर्चा, आ. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश अशा अनेक घडामोडींनी दिवसभर राजकीय वर्तुळ ढवळून निघाले असतानाही, धनंजय मुंडे यांच्या अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीची चर्चा दुसर्या दिवशीही केंद्रस्थानी राहिली. यामुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन आणि प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.








