बीड (रिपोर्टर): बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील मुळुकवाडी येथील शेतकर्यांनी आज शुक्रवार, दि. 19 रोजी बसस्थानक परिसरात एकत्र येत भाववाढीच्या शेतकरी हक्क मोर्चा साठी वज्रमूठ आवळली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत शेतकरी पुत्र, शेतकरी व शेतकरी मित्रांनी दि. 25 डिसेंबर (गुरुवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे निघणार्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला.
बीड जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकरी कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे तीव्र आर्थिक संकटात सापडला आहे. कापूस खरेदी केंद्रांवर सीसीआयकडून होणारी पिळवणूक तसेच सोयाबीन खरेदी केंद्रांवरील सरसकट अन्याय सुरू असल्याचा आरोप शेतकर्यांनी यावेळी केला. या अन्यायाविरुद्ध शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकर्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मुळुकवाडी येथे शेतकरी जागृती अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस माजी सरपंच कृष्णा पितळे, पांडुरंग कानडे ,बंडु चेअरमन,भास्कर ढास, ऋषिकेश ढास, कृष्णा ढास, सुरज ढास, गहिनीनाथ ढास, विक्रम रंधवे, बाळासाहेब ढास, गोवर्धन ढास, भागवत कदम, दिलीप ढास, शिवाजी ढास , संदिपान ढास, लिंबाजी ढास,उत्तरेश्वर ढास,बाळु कोटुळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








