अंबरनाथ (ठाणे) प्रतिनिधी :
मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येत एकूण 32 नगरसेवकांची मोट बांधली आहे. यामध्ये भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवकांचा समावेश आहे. या संख्याबळाच्या जोरावर भाजप नगरपरिषदेत बहुमतात येणार आहे. भाजपच्या तेजश्री करंजुळे या नगराध्यक्ष म्हणून आधीच विजयी झाल्या आहेत.
दरम्यान, या घडामोडींमुळे शिवसेना शिंदे गट अस्वस्थ झाला असून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप–काँग्रेस युतीला शिंदे गटाने “अभद्र युती” असा टोला लगावला आहे. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपानेच काँग्रेससोबत हातमिळवणी करून शिवसेनेचा घात केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केला आहे. ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे.
यावर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील यांनी सांगितले की, “गेल्या पंचवीस वर्षांपासून भ्रष्टाचार करणाऱ्या शिंदे गटासोबत सत्तेत बसलो असतो, तर ती खरी अभद्र युती ठरली असती.” तसेच अंबरनाथ नगरपरिषदेसाठी महायुतीच्या संदर्भात शिंदे गटाशी अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा दावाही त्यांनी केला.
एकूणच, अंबरनाथ नगरपरिषदेतील भाजप–काँग्रेस युतीमुळे स्थानिक राजकारणात नवा वळणबिंदू निर्माण झाला असून, याचे पडसाद येत्या काळात राज्याच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









