गणेश सावंत –
आज सर्वांनाच अश्चर्य वाटेल, आमच्या या अग्रलेखावर भाष्यही होईल. होय, सत्य स्विकारावं लागेल आणि आम्ही ते स्विकारतोय. भलेही भाजपाच्या राजकीय राग, लोभ, द्वेष, मत्सर या विरोधात आम्ही आक्रमकपणे लिहित आलो. मात्र गेल्या दशकभराच्या कालखंडात महाराष्ट्रातल्या भाजपात आणि राजकारणात आम्ही जे पाहितलं, ज्यावर आम्ही भाष्य केलं, कधी शब्दाची शस्त्रे केली, कधी शब्दांची रक्तजडीत माळ करून घातली, टीका केली आणि अभिनंदनही केले. त्या भाजपात आज देवेंद्र नावाचं रत्न जे चकाकतय ते केवळ त्या रत्नाला भ्रष्टाचाराची काजळी लागलेली नाही. आज आम्ही फडणविसांचं कौतुक एवढ्यासाठीच करतोय, गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्र भाजपाचं त्यांनी नेतृत्व हाती घेतलं आणि तेथून उभ्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणविसांनी गवसणी घातली.
हे देवेंद्र फडणवीस कोण?
‘आणीबाणीच्या काळात वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी इंदिरा गांधींना माझ्या बाबांना अटक केली, त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही’, असे ठामपणे सांगणारा तो मुलगा म्हणजे देवेंद्र फडणवीस. पुढे हाच मुलगा महाराष्ट्राच्या राजकारणाचा निर्णायक चेहरा बनेल तेव्हा याची कल्पना कुणालाच नसेल. परंतु इतिहास कधी गप्प बसत नाही. तो योग्य वेळी उत्तर देतो. संघ आणि जनसंघाच्या संस्कारात वाढलेला हा मुलगा हा प्रामुख्याने घराणेशाहीचा लत्पाद नव्हता तर संघर्ष हा त्याचा नेता होता. वयाच्या सतराव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले, तेव्हा तुम्ही – आम्ही कोलमडलो असतो. पंतु देवेंद्र त्या धक्क्यातून सावरले नव्हे तर त्या धक्क्याला आपली ताकद बनवली. बावीसव्या वर्षी नगरसेवक, सत्तावीसव्या वर्षी महापौर आणि पुढे सलग आमदारकी ही घोडदौड कुणाच्या कृपेने नव्हे स्वत:च्या कर्माने आणि जनतेच्या विश्वासाने घडलेली आहे. भाजपाचं राजकारण हे भावनिक असले तरी भाजपामध्ये राहून फडणविसांचं राजकारण हे भावनिक राजकारणातल्या पुढे म्हणता येईल. घोषणा, आरडाओरड, अस्मितेच्या नावावर राजकारण एकीकडे होत असताना त्याला तेवढ्याच आरडाओरडीने उत्तर देणारे ‘मी पुन्हा येईन’चा नगारा बजावणारे फडणवीस नगार्याबरोबर कामाचे मैदानही गाजवत राहिले. म्हणून राजकारणात जे लोक योगायोगाने मोठे होतात तर काही लोक काळाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून बाहेर पडतात. देवेंद्र फडणवीस हे दुसर्या गटातील
नेते म्हणता येतील.
देवेंद्रांच्या हाती महाराष्ट्र
येईल असे दशकभरापूर्वी कुणालाही वाटत नव्हते. महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजनांपासून ते स्व. गोपीनाथराव मुंडेंपर्यंत भाजपामध्ये मोठमोठे नेते होते. त्या नेत्यांच्या सावलीत देवेंद्र कायम असायचे. परंतु पुढे दुर्दैवाने महाजनांची हत्या झाली, गोपीनाथराव अपघाताने आमच्यातून निघून गेले. भाजपा सैरावैर होईल, असे चिन्ह महाराष्ट्रात निर्माण झाले आणि इथेच 2014 ला देशात परिवर्तनाची लाट आली. भाजपाची देशात एकहाती सत्ता आली आणि त्या सत्तेच्या नुमाईंद्यांनी महाराष्ट्र देवेंद्र फडणविसांच्या हाती देण्याचे ठरवले. पंतप्रधान नरेरंद्र मोदी आणि शहांची ही निर्णायक खेळी आज महाराष्ट्राच्या गल्लीपासून राजधानीपर्यंत यथायोचीत ठरली. 2014 ते 2026 पर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणविसांनी ज्या काही रणनीती रचल्या त्या काही सकारात्मक, काही नकारात्मक त्यातून फडणविसांनी पक्षाच्या पदरी यश दिले आणि इथेच या दहा वर्षाच्या कालखंडात फडणविसांवर थेटपणे आरोप करण्यासाठी विरोधकांच्या हाती एक सुद्धा कोलीत सापडले नाही. हेच फडणविसांचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे यश. म्हणुनच
मुंबई म्हणजे ठाकरे
या समीकरणाला मात करण्याचे ध्येय-धोरण आखण्याची जबाबदारी ही फडणविसांवर आली. मुंबई महापालिकेवरील ठाकरे घराण्याची अनभिषिक्त सत्ता हादरवणे हे साधे काम नव्हते. पण फडणवीसांनी ते करून दाखवले-रणनीतीने, शिस्तीने आणि ठोस नेतृत्वाने. ‘मुंबई म्हणजे ठाकरे’ हे समीकरण मोडीत काढून त्यांनी दाखवून दिले की मुंबई कुणाच्या घराण्याची मक्तेदारी नाही, तर मेहनती, कर्तृत्ववान नेतृत्वाची राजधानी आहे. शिवाजी पार्कवरील भाषणांना प्रत्युत्तर देताना त्यांनी आरडाओरडा केला नाही; त्यांनी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार यांची भाषा केली. मराठी माणसाला रोजगार देण्यासाठी मी उद्योग आणणारच, हे वाक्य केवळ राजकीय प्रत्युत्तर नव्हते, तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दिलेले ठोस आश्वासन होते. त्यामुळेच भावनिक राजकारणाची हवा निघाली आणि
मतदारांनी निर्णय घेतला.
या निवडणुकांनी स्पष्ट केले आहे-फडणवीस हे आज राज्यातील सर्वात शक्तिशाली आणि विश्वासार्ह नेते आहेत. पुणे-पिंपरीत अजित पवारांना शह, नागपुरात काँग्रेसचा सफाया, मुंबई-ठाण्यात एकनाथ शिंदेंसोबत अचूक राजकीय मांडणी-हे सगळे योगायोग नाहीत, तर नेतृत्वाचे कसब आहे. भाजपने केवळ मोदी आणि फडणवीस यांच्या चेहर्यावर मते मागितली आणि जनतेने ती मते विश्वासाने दिली, याचा अर्थ स्पष्ट आहे. आता आव्हान मोठे आहे. मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी फडणवीसांवर जो विश्वास टाकला आहे, त्याचे उतराई होणे ही त्यांची जबाबदारी आहे. ‘वडापावच्या गाड्यांशिवाय काय दिले?’ असा सवाल करणार्या फडणवीसांसमोर आता संधी आहे-मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवताना तिची मराठी ओळख अधिक बळकट करण्याची. हे जेवढे मुद्दे मांडत आहोत त्या मुद्यांना फडणविसांनी यथायोचीत हात घातले.
जसे शरद पवार महाराष्ट्रात घडले
तसे देवेंद्र फडणवीस घडतायत का? काहींच्या म्हणण्यानुसार शरद पवारानंतर मुत्सद्दी नेता हा देवेंद्र फडणवीस आहे. शरद पवार युद्ध जिंकतात, मुत्सद्दीपणा करतात, मात्र तहात नेहमीच हरलेले दिसतात. ते केवळ विरोधकांच्या काफिल्यामध्ये डिस्टर्ब करण्याहेतू पवार अचानक काहीतरी बोलतात. पवार जे बोलतात त्या उलट पवार करतात ही शरद पवारांबाबतची प्रतिक्रिया. मग फडणविसांबाबत आज प्रतिक्रिया काय, फडणवीस मुत्सद्दी आहे, थेट आहेत, सत्ताकारणासाठी जे काही करावे लागते ते करण्यात ते पारांगत आहेत, या उलट स्वत:च्या शरीरावर म्हणा, कपड्यावर म्हणा एकही शिंतोडा येऊ न देणारे म्हणजेच काचेच्या घरात केवळ रात्रीच्या किर्र अंधारात कपडे बदलणारे नेते आहेत. मुळात राजकारण करताना, सत्ताकारण आखताना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ते फडणवीस करतात परंतु या दशकभराच्या कालखंडामध्ये फडणविसांनी जी नीती आखली आणि त्या नीतीतून महाराष्ट्र काबीज केला, हे काम एवढं छोटं नव्हतं. या दहा वर्षाच्या कालखंडात
लोक थेट फडणविसांच्या अंगावर
गेले. आंदोलने झाली, पक्षातल्या नेत्यांनी बंडसदृश्य परिस्थिती निर्माण केली. आता फडणवीस संपुष्टात येतील, अशीही वल्गना होत राहिली. दोन टक्क्यातल्या समाजातून आलेले फडणवीस या सर्वांना अंगावर घेत राहिले. परंतु सरशेवटी फडणवीस कावेबाज ठरले. त्यांनी आपली खुर्ची मजबूत केली. नुसती खुर्ची नाही तर ते आज नेक नेतृत्व म्हणून पुढे आले. राज्यातल्या महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेले घवघवीत यश हे देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाचे फलीत म्हणता येईल. म्हणून आम्ही देवेंद्र फडणविसांचे अभिनंदन करत आहोत!
उद्याच्या अंकात शुन्यातले शरद पवार














