अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. शरद पवारांनंतरजयंत पाटील यांनीही अजित पवारांसोबत झालेल्या बैठकांबाबत भाष्य केले. त्यातून अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यात पडद्यामागे बैठकाही सुरू झाल्या होत्या. सर्व काही ठरले होते. 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणाही होणार होती असं जयंत पाटील यांनी म्हटलं. मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यास ते सरकारमध्ये राहणार होते का या प्रश्नावर जयंत पाटलांनी उत्तर देणे टाळले.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरण चर्चा सुरू होती त्यावेळी अजितदादांच्या मनात सत्तेत राहून एकत्र राहायचे होते का असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आधी दोन्ही पक्ष एकत्र करायचे याबद्दल अजित पवारांचा आग्रह होता. आता त्याचे बरेच तपशील आहेत. त्यामुळे कधीतरी त्याचाही खुलासा मी करेन. परंतु सविस्तर चर्चा आमच्यात झाल्या होत्या. काही चर्चांमध्ये सुप्रिया सुळेंना उपस्थित ठेवण्याचा मी प्रयत्न केला होता. त्यामुळे बर्यापैकी चर्चा पुढे गेली होती. त्याशिवाय प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्यांच्याकडील काही आमदारांना विलीनीकरणाबाबत कल्पना दिली आहे असं अजितदादांनी मला स्पष्टपणे सांगितले होते असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
तसेच अजितदादांचं असं म्हणणे होते की, मी जेव्हा निर्णय सांगतो, त्याची अंमलबजावणी होते. तुम्ही त्याबद्दल काही चिंता करायचे कारण नाही. ते सगळे माझे सहकारी आहेत. मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय करतील असं अजितदादांनी सांगितले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तर सुनेत्रा पवारांबाबत हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांची त्यांना संमती असल्यानंतर शपथविधी हा सोपस्कार होतो. ही प्रक्रिया असून हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांचा पक्ष आजतरी स्वतंत्र आहे. त्यांचे निर्णय प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमाणात छगन भुजबळ घेतायेत. त्यामुळे या तिघांचा जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी होत असेल. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही असंही जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मी, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे आम्ही सुनेत्रा वहिनींना भेटलो आणि त्यानंतर आम्ही निघून आलो. पुढे काय झाले माहिती नाही. 1992-93 पासून अजित पवार आणि मी एकत्र काम करतोय. सत्तेत असेल किंवा विरोधात आम्ही एकत्र काम केले आहे. त्यांच्या स्वभावाचे पैलू आम्हाला बारकाईने माहिती आहे. बर्याच प्रदीर्घ काळातील या आठवणी आहेत. हा अपघात कसा झाला हा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दादांचे एकाएकी जाणे हेच मनाला पटत नाही. असं विमान पडू शकते, ही पहिलीच घटना आहे. मृत्यू येतात पण अशाप्रकारे अपघात होणे ध्यानीमनी नव्हते. एकत्र येण्याच्या सर्व गोष्टी ठरल्यानंतर असा अपघात होणे हे माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. हे कसं होऊ शकते, नियती क्रूर असते हेच दिसून येते असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.









