बीड (रिपोर्टर): बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात आज पहाटे एक मोठी घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत एका 60 वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत बॉडी आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय 60) असं मृत व्यक्तीचं नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागली. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने ही माहिती दिली. जेव्हा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ऊसाच्या सरीमध्ये एका व्यक्तीचा बॉडी पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.
वारकरी संप्रदायाशी जोडलेले
मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित (च.-.) होते आणि वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते टीबी (क्षयरोग) या आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे ते मानसिक तणावात असल्याची चर्चा गावात आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांनी स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे प्राथमिक तपासात समोर आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विश्वनाथ पांचाळ यांच्या पश्चात दोन मुले, सून आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.












