नवी दिल्ली (वृत्तसेवा)- आरक्षणाच्या मागणी महाराष्ट्रात सातत्याने मराठा आंदोलकांनी लावून धरली आहे. मात्र आता आरक्षणाचे वादळ राजधानी दिल्लीत घोंगावणार आहे. जाट आणि मराठा समाज एकत्र येत आरक्षणाचा लढा उभारणार आहेत. त्यासाठी जाट मराठा संयुक्त आरक्षण संघर्ष समिती स्थापन झाली आहे. दिल्लीच्या तालकटोरा इंडोर स्टेडिअमवर सोमवारी अखिल भारतीय जाट महासभेचे महाधिवेशन झाले. ज्याठिकाणी मराठा आणि जाट यांच्यात बैठक झाली. या बैठकीत येणार्या काळात जाट आणि मराठा एकत्रितपणे आरक्षणाची लढाई उभारणार असल्याचे निश्चित झाले. या महाधिवेशनात देशभरातील अनेक जाट नेते उपस्थित होते.
याबाबत मराठा महासंघाचे पदाधिकारी संभाजी दहातोंडे म्हणाले की, देशातील जे आरक्षणापासून वंचित असलेले घटक आहे, महाराष्ट्रात मराठा, हरियाणात जाट समाज आहे. काल दिल्लीत जाट महाधिवेशनात मराठा महासंघ आणि जाट महासभेच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत देशातील जे घटक आरक्षणापासून वंचित आहेत अशांना एकत्र आणून संसदेच्या अधिवेशन काळात किंवा त्याआधी आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून 27 टक्क्यांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी यासाठी आम्ही लढा उभारणार आहोत असं त्यांनी सांगितले. तसेच जाट समाज महासभेचे सचिव, पदाधिकारी यांच्याशी आम्ही चर्चा केली. मराठा, जाटसोबतच आणखी काही घटक एकत्रित घ्यायचे आहे. 5-6 दिवसांनी मुंबईत याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. समाजातील छोटेमोठे घटक एकत्र करून मोट बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे. आरक्षणाची मर्यादा वाढवून आमचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा अशी मागणीही मराठा महासंघाचे प्रतिनिधी संभाजी दहातोंडे यांनी केली.









