कोरटकर, सोलापुरकरवरून भास्कर जाधवांची सरकारवर तोफ, विधान परिषदेमध्ये प्रचंड गोंधळ, फडणवीस म्हणाले, कोरटकर चिल्लर माणूस, त्याच्यावर कारवाई होणार : जितेंद्र आव्हाड अणि डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये महाराजांबाबत लिहणारे नेहरुंचा साधा निषेध तर करा -फडणवीस
मुंबई, (रिपोर्टर)ः- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत वक्तव्य करणार्या अबु आझमी, कोरटकर, सोलापुरकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी दोन्ही सभागृहात आज प्रचंड घोषणाबाजी झाली. विधानसभा अध्यक्षांनी आ.अबु आझमींना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले. परंतु कोरटकर, सोलापुरकर यांच्या बाबत सरकारकडून आणि सरकार पक्षाकडून कुठलेच वक्तव्य केले जात नसल्याने आ.भास्कर जाधव हे सभागृहातून बाहेर पडले आणि सरकार जात धर्म पाहुन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत बेगडे प्रेम दाखवत असल्याचे तोफ डागली. दुपारी 12.30 च्या दरम्यान पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये विरोधी आमदारांनी जमीनीवर बसून कोरटकर, सोलापुरकर विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस त्याठिकाणी उपस्थित होते. कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, त्याच्यावर तर कारवाई होणारच परंतु औरंगजेब नसता तर शिवाजी महाराज नसते असे वक्तव्य करणारे जितेंद्र आव्हाड यांचा तुम्ही साधा निषेध केला का? असा प्रतिसवाल फडणवीसांनी करत डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपतींबाबत पंडित जवाहर लाल नेहरूंनी जे लिहिलं त्याचा साधा निषेध तरी कराल का? असा प्रतिसवालही फडणवीस यांनी विरोधकांना केला.
आज विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तिव्र पडसाद उमटले. सपाचे आ.अबु आझमी यांनी औरंगजेबाबाबत उद्दातीकरण करणारे जे वक्तव्य केले ते त्यांना चांगलेच भोवले. अबु आझमींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सत्ताधार्यांसह विरोधकांनी आज दोन्ही सभागृहामध्ये आक्रमक भुमिका घेतली. भाजपा आ.सुधीर मुनगुंटीवार यांनी अबु आझमीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. सरशेवटी विधानसभा अध्यक्षांनी आ.अबु आझमींना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले. तर त्यांच्या निलंबनाबाबत एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. दुसरीकडे 97 अन्वये प्रशांत कोरटकर, राहुल सोलापुरकर यांच्याबाबत सरकारकडे दोन दिवसापुर्वी प्रस्ताव दिलेला असतांना काल बोलण्यासाठी आम्ही संधी मागितली मात्र आम्हाला ती संधी देण्यात आली नस्याचे आ.भास्कर जाधवांनी म्हंटले. आज सभागृह सुरू होतांना या विषयावर बोलण्यासाठी संधी द्या
असे आम्ही अध्यक्षांना म्हंटलं त्याच वेळी अबु आझमीच्या निलंबनाचा ठराव आला. त्यावेळी कोरटकर, सोलापुरकर यांचा विषय हाती घेण्याचे आम्ही सांगितले. मात्र कोरटकर, सोलापुरकरला सरकार पाठीशी घालण्याचे काम करत आहे आणि जात धर्म पाहुन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवर बेगडं प्रेम दाखवत असल्याची तोफ भास्कर जाधवांनी सरकारवर टाकली. पुन्हा 12.30 वाजता विधान परिषदेमध्ये कोरटकर, सोलापुरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विरोधक आक्रमक झाले. जमीनीवर बसून घोषणाबाजी सुरू केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे त्या ठिकाणी उपस्थित होते. कोरटकर हा चिल्लर माणूस त्याच्यावर तर कारवाई होणारच मात्र आव्हाड आणि डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये लिहिणारे पंडित जवाहर लाल नेहरू यांचा साधा निषेध करणार का? असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना केला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य विधान अन् लिखान सरकार खपवून घेणार नसल्याचेही फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले.











