नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्यावतीने (Indian army) पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेतून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, ऑपरेशन सिंदूर आणि सीमारेषेवरील कारवायांसंदर्भात देशवासीयांना सांगण्यात आले. आमचा लढा पाकिस्तानच्या लष्काराशी नसून दहशतवादी अन् दहशवाद्यांशी असल्याचे लष्करप्रमुख ए.के. भारती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. “आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणूनच आम्ही सर्वात आधी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना (Terrorism) पाठिंबा देणे योग्य मानले. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या लढाईला स्वतःची लढाई बनवली, म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते.”, असे एअर मार्शल ए. के. भारती यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
आपली हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीम देशासाठी अभेद्य भींत बनून उभी होती. या भींतीला धडक देणे शत्रू राष्ट्राला अशक्यच होते, असे भारती यांनी म्हटले. तसेच, ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय वायू दलाने दहशतावाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्याचे काही फोटो व व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेतून दाखवले. भारताच्या एकाही एअर बेसवर शत्रू राष्ट्राकडून हल्ला झाला नाही. भारतीय हवाई दलाचे सर्वच तळ सुरक्षित आहेत. हवाई दलाने कुठल्याही संशयास्पद वस्तूला एअर बेसजवळ पोहोचू दिले नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
पत्रकार परषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी म्हटले की, आपल्या एअर डिफेन्सच्या मोहिमेला एका कॉन्टेक्समध्ये समजून घ्यायला हवं. पहलगाम हल्ला म्हणजे दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला होता. त्यामुळे, आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानुसार, एअर स्ट्राईकची कारवाई केल्याची माहिती राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानकडून ड्रोन आणि हत्यारांचा करण्यात आलेला प्रयत्न अपयशी ठरला. जे उरलेले ड्रोन होते ते आपण पाडून टाकले. मी बीएसएफ जवानांचेही कौतुक करेल. कारण, जागता पहारा देणारे जवान या मोहिमेत मोठ्या हिंमतीने आमच्यासोबत उभे राहिले, त्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा नायनाट करण्यात आला. जब हौसलों बुलंद हों, तो मंजिलें भी कदम चूमती हैं.. अशी शायरी यावेळी घई यांनी बोलून दाखवली.