इ.स. 1970 च्या कालखंडात सामना नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. त्या चित्रपटातला एक संवाद भलताच गाजला होता. तो म्हणजे ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ आता एक उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रश्न पडलेला आहे. मुंबईमध्ये रेल्वेत बॉम्बस्फोट कोणी केले? मालेगावमध्ये बॉम्बस्फोट कोणी केले? हा सवाल एवढ्यासाठीच पडतोय, सोळा-सोळा-सतरा-सतरा वर्षे ज्यांच्याकडे आरोपी म्हणून पाहिलं गेलं, ज्यांच्या उमेदीचे अर्धे आयुष्य जेलमध्ये गेले, ज्यांना जन्मठेप झाली, जे फाशीपर्यंत गेले त्यांना अचानक देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेसाठी पुरेसे साक्षी-पुरावे तपास यंत्रणांना देता आले नाही म्हणून त्यांना निर्दोष सोडले. तर इकडे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पकडण्यात आलेले सात जण निर्दोष सोडण्यात आले. तिथेही न्यायालयासमोर तपास यंत्रणेला योग्य ते पुरावे देता आले नाहीत. बॉम्बस्फोट झाले, माणसं मेली, तपास झाला, यंत्रणांनी आरोपी अटक केले, आरोपपत्र दाखल झाले, सरशेवटी साक्षी-पुराव्या अभावी सर्व आरोपी निर्दोष सुटले.
मग बॉम्बस्फोट
कोणी घडवले?
हा प्रश्न साहजिकच उपस्थित होणार. मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये दोनशेपेक्षा अधिक सर्वसामान्य नागरीक मृत्युमुखी पडले. कोणी बाप गमावला, कोणी नवरा गमावला, कोणी पुत्र गमावला तर कोणी घरातला कर्ता पुरुष गमावला. इकडे मालेगावात ते बॉम्बस्फोट झाले तिथेही सहा जण मृत्युमुखी पडले, अनेक जण जखमी झाले. हे बॉम्बस्फोय पकडलेल्या लोकांनी अथवा निर्दोष सोडलेल्यांनी केले नसतील तर मग बॉम्ब स्वत: तयार झाले, ते स्वत: घटनास्थळी गेले? मृत्युमुखी पडलेल्या माणसांच्या जवळ जाऊन ते म्हणाले, मै बॉम्ब हुँ, मै फटू आणि ते माणसं म्हणाले, ‘हा फट जा’ माझ्या मृत्युला कारणीभूत ठर, अरे काय चाललय हे? तपास यंत्रणा जगाच्या पाठीवर भारताचं नाव कमावतात की गमावतात? एकीकडे जगज्जेते व्हायचे स्वप्न पहायचे आणि दुसरीकडे संरक्षण सह तपास यंत्रणेचे नागवेपण अशा गंभीर गुन्ह्यातून बाहेर पडायचे हे देशाच्या इभ्रतीचे वस्त्रहरण आहे. तिकडे मुंबई बॉम्बस्फोटातले लोक सुटले तेव्हा सरकारचे नक्कीच नाक कापले आणि इकडे मालेगावमध्ये बॉम्बस्फोटातले लोक सुटले तर इकडे तत्कालीन सरकारचे वाभाडे काढले. कसला हा दुटप्पीपणा आणि कसला
भगवा-हिरवा दहशतवाद
आम्ही सातत्याने म्हणतो, दहशतवादाला जात नसते, धर्म नसते, रंग नसतो. दहशतवादाचा खरा चेहरा हा रक्ताळलेला असतो. दहशतवाद हा कुठल्या एका धर्माचा-पंथाचा अविभाज्य अंग कधीच नसतो. मात्र इथं भगवा दहशतवाद आणि हिरवा दहशतवाद यावरून चर्चा केचली जाते. तपास यंत्रणांनी काय झक मारली यावर कोणी भाष्य करत नाही, जे बॉम्बस्फोट घडले, ज्या बॉम्बस्फोटामध्ये लोक मृत्युमुखी पडले त्याचे सत्ताधार्यांना अथवा दहशतवादात धर्म शोधणार्यांना याचे देणेघेणे नसते. हे या देशाचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नसतो, परंतु पकडलेला हर एक मुसलमान हा दहशतवादी असतो, असे म्हणत मुस्लिम लोकांना संशयाच्या रिंगणात उभं करायचं आणि भगवा दहशतवाद म्हटलं की, सनातनी धर्म हा खतरे में असल्याचे बोंबलत सुटायचे. दहशतवाद हा दहशतवादच. मग तो हिंदू असो वा मुसलमान. तिथे माफी नसायलाच हवी, या देशातला पहिला दहशतवादी हा नथ्थूराम गोडसे होता. इथंही नथ्थूरामचे उदात्तीकरण करणार्यांची संख्या अधिक होऊन बसली. हा देश आणि या देशातल्या तरुणाला अशा घटनांमधून अथवा दहशतवादाला हिंदू-इस्लामीक नाव देत आपण कुठल्या दिशेने घेऊन जातोय.
वड्याचं तेल वांग्यावर
आणण्याचा धंदा सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी यांचा नक्कीच तो पक्षीय, वैचारिक मतभेदाचा असावा. देशाच्या सुरक्षेबाबत, भारताच्या संविधानाबाबत अखंड हिंदुस्तानच्या इभ्रतीबाबत यांनी तो करू नये. मुंबई बॉम्बस्फोटातले आरोपी सुटले म्हणून त्यांच्या विरोधात अपील करण्याची घोषणा केली जाते आणि मालेगाव प्रकरणातले आरोपी सुटले म्हणून त्याचा विजयोत्सव साजरा केला जातो. हा तोच देश आहे का जिथे सत्यमेव जयतेचा गजर होतो. हा तोच देश आहे का ज्या देशात छत्रपती शिवरायांचा कडेलोटापासून चौरंगापर्यंत शिक्षेची थेट अंमलबजावणी केली जात होती. परंतु आजच्या काळात लोकांच्या मुलभूत गरजा अथवा रयतेच्या जान आणि मालची राज्यकर्त्यांना काहीच गरज वाटत नाही. केवळ निवडणुकांच्या अनुषंगाने वड्याचं तेल वांग्यावर नेण्याचा गोरख धंदा ‘अल्लाहू अकबर’ आणि ’जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांतून होतय. ही अधिक चिंतेची बाब म्हणावी लागेल. आमचा पुन्हा तोच प्रश्न आहे,
बॉम्बस्फोटातले
आरोपी कोण?
गेल्या काही वर्षांपासून ईडी या संस्थेने देशात हाहाकार माजवून सोडला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी टिपणी केली. त्याच दिवशी मुंबई बॉम्बस्फोयातले आरोपी सुटले. आता अनेकांना वाटेल ईडी टू बॉम्बस्फोट यावर इथं भाष्य काय होणार. सर्वाच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर, ध्येय-धोरणावर, भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तेच प्रश्न मुंबई बॉम्बस्फोट आणि मालेगावातल्या बॉम्बस्फोटाबाबत उपस्थित होतात. जिथे जिथे केंद्राच्या एनआयए या संस्थेने हात घातले तिथे तिथे आरोपी सुटले. असा थेट आरोप आता देशातून होतोय. या दोन्ही बॉम्बस्फोटांमध्ये हे सर्व आरोपी निर्दोष होते तर मग हे बॉम्बस्फोट करणारे आरोपी कुठे आहेत? त्यांचा शोध घेतला जाणार का? मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या आत्म्याला खरे आरोपी शोधून शांती देणार आहेत का? की भगवा दहशतवाद आणि हिरव्या दहशतवादावर पुन्हा निवडणुका लढविल्या जाणार?
आता जनतेला
जागतं राहावे लागेल
होय, बॉम्बस्फोटसारख्या प्रकरणातील आरोपी जर निर्दोष सुटत असतील, तपास यंत्रणांच्या तपासामध्ये प्रचंड त्रुटी निर्माण होत असतील अणि त्या त्रुटींमधून पंधरा-पंधरा वर्षे जेलमध्ये गेलेले मुसलमान असो वा हिंदू यांच्या आयुष्याचे पुढे काय? त्यांचं भूत यातनेत गेलं. वर्तमान विचारता जाईल आणि भविष्य मसनात असेल. मग त्या सुटलेल्या लोकांनी काहीच केलं नव्हतं तर त्यांचे जेलमध्ये गेलेले दिवस पुन्हा त्यांना बहाल करता येतील का? आणि खरा प्रश्न तर हा आहे, बॉम्बस्फोट घडवणारे पंधरा-पंधरा वर्षे आपल्या यंत्रणेला सापडत नाहीत, याचा अर्थ तुम्ही-आम्ही अथवा इथली सुरक्षा आणि तपास यंत्रणा इथकी नपुंसक आहे का? हे प्रश्न पडताना आता जनतेने जागतं राहायला हवं. ‘सत्य आम्हा म्हणी नव्हे गबाळ्याचे धनी, देतो तिक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावी असे बरे’, या भूमिकेत आता लोकांनी चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणावं लागेल तेव्हा या देशाचं आणि तुमच्या घराचं भविष्य आणि भवितव्य सुरक्षित राहिल. कारण सध्या या देशात नेमके काय चालू आहे हे कळायला मार्ग नाही. कारण सध्याची स्थिती अशी आहे ‘खजाने को चोरों से नही रखवालदारों से डर है, इस देश को आतंकियों से नही गद्दारों से डर है’ म्हणून देशवासियांनी जागते रहात शासन आणि प्रशासन व्यवस्थेला सवाल विचारलेच पाहिजेत. तुमच्या जान आणि मालची जबाबदारी ही कायदेशीर सर्वस्वी शासन-प्रशासन व्यवस्थेची असते तेव्हा उठा जागते व्हा, छोट्यातला छोटा विचार या देशाला जागं करू शकेल आणि मारुती कांबळेचं काय झालं? या ‘सामना’ चित्रपटातील संवादापेक्षा बॉम्बस्फोटातले खरे दोषी कोण? हे तुम्ही विचारलं तरच बाहेर येईल नसता ‘चांगले उच्च जातीचे दिसता, म्हणूनच उग्र, जातीचा ज्वलंत अभिमान, छान छान… (अंगावर धावून येत उग्रपणे भुंकणार्या कुत्र्याला उद्देशून श्रीराम लागू बोलत असलेला ‘सामना’ चित्रफटातला हा संवाद प्रत्यक्षात केला तर किती जणांच्या नाकाला घुसाडा येईल.
ReplyReply allForwardAdd reaction









