
मुंबई (रिपोर्टर): आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधीच राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारत आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली. आयोगाला विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देता आले नाही. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांच्याबरोबर आज बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंनी ‘तुम्ही सत्तेतील तीन पक्षांसाठी काम करत नाहीत’, असं सुनावत ‘मतदार यादीमध्ये घोळ असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात याबाबत सांगा, की आम्ही निवडणूक घेण्यास तयार नाही, निवडणूक याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू, मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करा,’ अशी मागणी या वेळी करण्यात आली. राज ठाकरे ज्याप्रमाणे कडाडले त्याप्रमाणे जयंत पाटलांनी निवडणूक आयोगाला काही पुरावे दाखवले, उद्धव ठाकरेंनी तर सत्य स्विकारा आणि निवडणूक रद्द करा, असे म्हणत निवडणूक आयोग हा काही राजा हरिश्चंद्र नाही, असे म्हटले.
राज्य निवडणूक आयुक्तांसोबत आज विरोधकांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. निवडणूक आयोग हे सत्तेतील तीन पक्षांसाठी काम करत असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला. राज ठाकरेंनी आक्रमक होत सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. तुम्ही महाराष्ट्रात सत्तेत असणार्या तीन पक्षांसाठॅ काम करत नाही. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा. आम्हाला मतदार याद्या द्या, आम्हीही शहानिशा करून. काँग्रेस बाळासाहेब थोरात 8 टर्म 80-90 हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य आहे, असा सवालही त्यांनी केला.
आम्ही नेमकं कुणाशी बोलायचं : उद्धव ठाकरे
मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोग म्हणतं ही आमची जबाबदारी नाही मग, आम्ही कोणाशी बोलताचे, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. तुम्ही जबाबदारी घेत नाही, व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही, असे सुनावत सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा, असे मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मतदार याद्यांमध्येच त्रुटी असतील तर निवडणुका कशाल घेता, डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका, असा टोलाही त्यांनी लगावला.
आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर आयोग उत्तर देत नाही : जयंत पाटील
आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर निवडणूक आयोग उत्तर देत नाही, अशी खंत व्यक्त करत यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मतदार यादींमध्ये त्रुटींचे पुरावे निवडणूक आयोगासमोर ठेवले. अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरमधील मतदार आहे. त्याचा कोणता ठावठिकाणा नाही. मतदार यादी सकाळी नाव असते आणि बातम्यांवर आले तर ते संध्याकाळी डिलीट कसं होतं, आम्ही सगळे पुरावे दिले, ते तुम्हाला पटत आहेत ना ? या प्रश्नांवर आम्ही मतदार यादी तपासतो, असे निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी सांगितले.
देवांग दवे कोण आहे, याची माहिती घ्या – वडेट्टीवार
एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना झाली, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर मतदार याद्यांमध्ये मल्ल्याळममध्ये नावे आहेत, अशी तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली. तर यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देवांग दवे कोण आहे, याची माहिती घ्या. हा माणूस भाजपचा आहे, हा निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो, असा आरोप करत मतदार यादीत प्रचंड घोळ असेल तर निवडणूक पारदर्शक कशी होणार ?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.








