मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया वेग घेत असून, यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली. राज्यातील २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींसाठी निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमधून एकूण ६ हजार २८८ सदस्यांची निवड होणार आहे. विशेष म्हणजे २४६ नगर परिषदांमध्ये दहा नव्या नगर परिषदांचा यावर्षी प्रथमच समावेश झाला आहे. याशिवाय ४२ नगर पंचायतींपैकी २७ नगर पंचायतींचा कार्यकाळ संपल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
यावेळी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदारांच्या दुबार नावांचा. यावर पहिल्यांदाच आयोगाने तांत्रिक साधनांचा वापर करत नवी पद्धत लागू केली आहे. ज्या मतदारांची नावं दुबार आढळली आहेत, त्यांच्या नावे मतदार यादीत दोन स्टार्स () ची नोंद केली जाणार आहे.** अशा मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना कोणत्या केंद्रावर मतदान करायचं आहे हे विचारण्यात येईल आणि त्यानुसार एकाच केंद्रावर त्यांना मतदानाची परवानगी असेल.
जर संबंधित मतदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही, तर त्यांच्या नावासमोर सर्वच मतदार केंद्रांवर ‘डबल स्टार मतदार’ अशी नोंद राहील. अशा मतदाराने मतदान केंद्रावर हजर झाल्यास, त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल की त्याने दुसऱ्या कोणत्याही केंद्रावर मतदान केलेले नाही किंवा करणार नाही. प्रतिज्ञापत्रानंतरच त्याला संबंधित केंद्रावर मतदानाचा हक्क मिळणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
दुबार नावांच्या प्रश्नावर प्रथमच असा प्रणालीबद्ध उपाय अवलंबला जात असल्याने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त वाढण्यास मदत होणार असल्याचा आयोगाचा विश्वास आहे.







