गणेश सावंत
होय, आम्ही या धर्माचे आहोत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान असे प्रत्येकाला वाटायला हवे. परंतु मी ज्या धर्मात जन्मलो त्याचा अभिमान आणि गर्व मी नक्कीच बाळगीन, अन्य धर्माबाबत द्वेष कधीच कणार नाही. ही भूमिका ज्या धर्म अभिमानी माणसाची असेल तो माणूस या पृथ्वीतलावरचा सर्वश्रेष्ठ माणूस म्हणता येईल. काल-परवा पासून आम्ही देशातल्या काही भागांमध्ये जे काही पाहितलं त्यातून धर्म अभिमानी माणूस हरवतोय का? 25 डिसेंबर आला रे आला की सांत क्लॉज विरुद्ध वासुदेव ही लढाई सोशल मिडियावर पहायला मिळाली. बोथट धर्म अभिमान्यांनी सांताक्लॉज आमचा नाही, वासुदेव आमचा, म्हणत काही ख्रिश्चनांना मारहाण केली. नाताळचा सण साजरा करताय, म्हणून विरोध दर्शवला. ही कुंच्याही धर्माची संस्कृती नाहीच. मुळात स्वधर्माचा अभिमान जेवढा असायला हवा तेवढाच अन्य धर्माबाबत आदरही असायला हवा. तेव्हाच स्वधर्म पराकोटीचा मोठा होतो, हे आम्ही म्हणत नाही, या देशात जन्मलेले प्रत्येक साधू-संत-सुफी, समाजसुधारक आणि क्रांतीकार्यांचं ते म्हणणं आहे. नव्हे नव्हे तर गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, कुरआन, बायबल यांचंही तेच म्हणणं आहे. परंतु धर्माच्या अफुने गंजिटे झालेले आज सामाजिक द्वेष
पसवताना हिंदू धर्माच्या
संस्कृतीच्या आड
ज्या पद्धतीने तुलना करून आम्ही किती सर्वश्रेष्ठ हे दाखव्याचा प्रयत्न करतात तेव्हा अश्या नत्द्रष्ट्रांची किव आल्याशिवाय राहत नाही. सांताक्लॉज आणि वासुदेव यांची मुळात बराबरीच होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत वासुदेव, गोंधळी, नंदीबैलवाले, पांगुळ, भुत्ते, भराडी, चित्रकथी, गोंधळी, वाघ्यामुरळी, मसनजोगी, पोतराज, बहुरुपी, इत्यादींना इथे आगळंवेगळं स्थान आहे. धर्मविधीच्या प्रसंगी देवदोत्त उत्सवात भिक्षा मागतानाही उपसाक पारंपारिक गाणी गातात. लोकसंस्कृती संपन्न करण्यामध्ये या पारंपारिक लोक गायकांचा महत्वाचा वाटा आहे. लोकांचे प्रबोधन करण्यापासून ते राष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी हेरगिरी करेपर्यंत या सर्व कलावंतांचे भरभरून योगदान आहे. त्यामुळे हे सर्व लोक आणि त्यांची कला संस्कृती या देशासाठी अनन्यसाधारण म्हणावी लागेल.
सांताक्लॉज कोण?
हेतरी तथाकथीत धर्म अभिमान्यांना माहित आहे का? उगीच या लोकशाहीच्या देशात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि दीड ते दोन टक्के धर्म असलेल्यांना टार्गेट करत स्वधर्माच्या टिमक्या वाजवणार्यांना वासुदेवपासून बहुरुप्यांपर्यंत असलेल्या समाजाची आजची स्थिती काय? हे तरी माहित आहे का? सांताक्लॉजमध्ये सेंट निकोलस. हे चौथ्या शतकातील एक दयाळू ख्रिश्चन संत होते जे की ग्रिक शहर मायेरा (आधुनिक तुर्की) या भागात गरजू आणि लहान मुलांना ते गुप्तपणे भेटवस्तू देत असत. तेथून पुढे त्यांची ओळख सांताक्लॉज अशी झाली आणि पुढे पांढरी दाढी आणि लाल टोपीतली ही व्यक्ती सुपरिचीत झाली. आमचा मूळ मुद्दा हाच आहे, एखाद्याच्या धार्मिक श्रध्देच्या ठिकाणासमोर जाणं आणि त्या ठिकाणी आमचा धर्म किती चांगला हे सांगणं. मुळात हास्यास्पद, त्या धर्माला खुजं करण्याची ती वृत्ती आणि तीच वृत्ती आजकाल काही जण जोपासताना दिसतात. जिथे श्रीकृष्णाच्या गितेत, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आरि तुकोबांच्या गाथेत धर्म काय असतो, यावर यथोचीत भाष्य केले. ते जर या तथाकथीत धर्म अभिमान्यांच्या डोसक्यात उतरत नसेल तर अश्या लोकांचे धर्म अभिमान बेगडे म्हणावे लागेल. ‘सांता आमचा नाही वासुदेव आमचा’ म्हणणार्यांना आणि त्यावरून वाद निर्माण करू पाहणार्यांना आमचा एक सवाल आहे, संस्कृती
जपणार्या त्या
लोक कलावंतांची
आजची स्थिती काय?
याचा कधी अभ्यास केलाय, याचा कधी विचार केलाय? म्हणे, आमचा वासुदेव लुप्त होत चाललाय, अरे हे लोक कलावंत ज्या वेळेस मागते होते आणि आजही आहेत. त्यांना आणि त्यांच्या मुला बाळांना विकासाच्या प्रवाहात कधी येऊ द्यायचे आहे की नाही? वासुदेव, गोंधळी, वाघ्यामुरळी, मसनजोगी, पोतराज, बहुरुपी, पांगुळ, नंदीबैलवाले, भराडी, चित्रकथी या लोकांचा संसार जाऊन पहा जरा, यांच्या पालावर, राहुट्यावर कोणी गेलय कधी? त्यांची मुलंबाळं काय करतात? अरे भाखळ धर्म अभिमान्यांनो या सर्व सांस्कृतिक पुजकांचे संसार, विंचवाचं बिर्हाड पाठीवर ज्या प्रकारे असतं ना, त्या प्रकारे गाढव, घोडं, खच्चर यांच्या पाठीवर आपला संसार टाकून हे लोक दरकोस दरमुक्काम करत भिक्षा, दान नव्हे नव्हे तर आम्ही थेटपणे भीक मागत असतात. स्वातंत्र्याच्या शंभरीतही या लोकांना सांस्कृतिकतेच्या नावाखाली भिखमागेच ठेवायचे आहे का? यांच्या लेकरांना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का? परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाण्याचा त्यांचा हक्क नव्हे का? की त्यांनी शतकोनिशतके पालातच राहावे, अशिक्षीतच रहावे, हा तुमचा धर्म सांगतो का? एखाद्या धर्माचा द्वेष करण्यासाठी त्या धर्माचा सण आला की, तुमचा धर्म अभिमान उफळून येतो. प्रत्यक्षात खरचं
तुम्ही धर्मअभिमानी?
आहात का? हा आमचा सवाल आहे. नाताळ आला की, सांताला विरोध करता, वासुदेवची आठवण येते. पिंगळा आठवला जातो, वाघ्यामुरळी, मसनजोगी, पोतराज, बहुरुपी अरेरे… जुनं सगळं संपुष्टात येत चाललय रे म्हणत छाती पिटता आणि स्वत:ची लेकरं सेंट अॅन्स यासह अन्य मिशनर्यांच्या इंग्रजी शाळेमध्ये घालता, नाही नाही आमचा त्याला विरोध नाही. तथाकथीत धर्म अभिमान्यांच्या दुटप्पीपणाला आमचा विरोध आहे. एकीकडे स्वत:ची लेकरं या व्हाईट कॉलरवाल्यांनी आणि त्यांच्या होयबांनी मोठे करण्यासाठी धर्म, कर्मकांड हे सोडून मोठे करायचे आणि धर्म अभिमान मात्र गोरगरिबांच्या, बहुजनांच्या लेकरांसाठी ठेवायचा. मुळात आमचे सांस्कृतिक जपण करणारे जे हे धिरोदत्त आहेत यांच्यासाठी खरंतर सरकारने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे निर्णय घ्यायला हवेत, यांच्या लेकरांना व्हाईट कॉलरच्या लेकरांसोबत शिक्षण कसे घेता येईल याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. धर्माच्या नावावर इतर धर्मांना शिव्या घालत स्वधर्माचे वाभाडे काढणे बंद करा.














