कटाक्ष/गणेश सावंत
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी काल लातूरमध्ये जे वक्तव्य केलं ते वक्तव्य पाहता रविंद्र चव्हाणांवर झालेल्या संस्काराची आणि भाजपाच्या संस्कारी दाव्याची एकप्रकारे हत्या म्हणावी लागेल. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विलासरावांचे नाव लवकरच पुसले जाईल. असे रविंद्र चव्हाणांनी केलेले ते वक्तव्य चव्हाणांची नितीमत्ता आणि भाजपाची निती दाखवून देते. खरंतर आपल्याकडे असे संस्कार आहेत, मृत्यूनंतर त्या व्यक्तीबाबत चांगले बोलायचे नसेल तर वाईट तरी बोलू नये. परंतु रविंद्र चव्हाणांनी ज्या विलासरावांबाबत वक्तव्य केले त्या विलासरावांच्या कर्तृत्वकर्माच्या आलेखाची जी रेख आहे त्या रेखीची उंचीची सावली रविंद्र चव्हाणांना झेपणारीनाही. आम्हा मराठवाडाकरांकडे स्वातंत्र्यानंतर क्षुद्रतेनेच पाहिले गेले. जसे व्यवस्थेचे दुर्लक्ष तसे
साक्षात यमाचे लक्ष
आमच्याकडे दुर्दैवाने जास्त प्रमाणात राहिल्याचे या दोन दशकांच्या कालखंडात प्रामुख्याने पहायला मिळाले. दिल्ली तक्तावर लक्ष केंद्रित करणो प्रमोद महाजन असोत अथवा या मराठमुलुखाची आणि महाराष्ट्राची बुलंद तोफ गोपीनाथराव असोत किंवा विलासरावांसारखे शांत-संयमी मुख्यमंत्रीपद सांभाळणारे मराठवाड्याचे भूषण असोत हे तिघेही अकाली आमच्यातून निघून गेले. नव्हे नव्हे तर साक्षात यमाने आमच्याकडून ते हिसकावून नेले. या तिन्ही नेत्यांच्या कर्तृत्व कर्माच्या उंचीबाबत आम्ही बोलणेही म्हणजे शिखराला गवसनी घालणे. तरीही आमदारकीच्या व्यासात आणि मतदारसंघाच्या डबक्यात राहिलेले रविंद्र चव्हाण जेव्हा असे वक्तव्य करतात तेव्हा
भाजपाचा हाच का हिंदू धर्म ?
स्व. विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेले वक्तव्य केवळ बेजबाबदार नाही, तर ते त्यांच्या संस्कारशून्य राजकारणाचं विदारक दर्शन घडवणारे आहे. या वक्तव्यातून रवींद्र चव्हाण यांची वैचारिक दिवाळखोरी तर उघडी पडलीच, पण भाजप ज्या तथाकथित हिंदुत्वाचा गळा फाडून करते, त्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटाही अक्षरशः गळून पडला आहे. हिंदू संस्कृतीत दिवंगत व्यक्तीला पूजनीय मानले जाते. मृत्यू झाल्यानंतरही त्या व्यक्तीच्या स्मृती जपल्या जातात, श्रद्ध, तर्पण, स्मरणदिन यांसारखे विधी दरवर्षी श्रद्धेने केले जातात. हीच तर आपली संस्कृती, हेच तर आपले हिंदुत्व! पण याच हिंदुत्वाची शाल पांघरून राजकीय दुकानदारी करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष लातूरमध्ये उभे राहून स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कायमची पुसून टाकण्याची भाषा करतात ही मानसिकता नेमकी कुणाची ?हा प्रश्न केवळ राजकारणाचा नाही, तर संस्कारांचा आहे. संध्याकाळची वेळ होती, रवींद्र चव्हाण शुद्धीत होते की नव्हते, हा प्रश्न वेगळा. पण जर शुद्धीत असतील, तर त्यांनी एकदा ९८२११२५००० हा स्व. विलासराव देशमुखांचा मोबाईल नंबर डायल करून पाहावा. हो, तो नंबर आजही सुरू आहे. आजही असंख्य कार्यकर्ते, नागरिक त्या नंबरवर फोन करून साहेबांचे शब्द ऐकतात, त्यांची आठवण जपतात. देशमुख परिवाराने तो नंबर सुरू ठेवला, कारण दिवंगत व्यक्तींच्या स्मृती जतन करणे हाच आमचा संस्कार आहे तो भाजपला कधीच कळणार नाही. काँग्रेसने कधीही मृतांच्या स्मृती पुसण्याचं राजकारण केलं नाही आणि आम्ही जेव्हा केव्हा संस्कार, संस्कृती भरकटणारे नेते अभिनेते आणि सर्वसामान्य भेटतात तेव्हा त्यांच्यावर
कटाक्ष टाकतो
वाचकांना आठवत असेल, एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टमधून बाल बाल बचावले तेव्हा महाराष्ट्रात स्वतःला पुरोगामी म्हणणारे आणि भाजपा विरोधातल्या ट्रोलधाडींनी फडणविसांच्या मरणाबाबत खिल्ली उडवत सोशल मिडियावर आपली संस्कृती दाखवली होती. तेव्हाही आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची आठवण करून दिली होती. महाराष्ट्र हा कर्तव्य कर्माला महत्व देतो आणि तो आठवणीतही ठेवतो विलासाख देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख सक्दाचा एक व्हिडिओ केला त्यामध्ये ते म्हणतात,लिहिलेलं नाव पुसलं जातं, परंतु लोकांच्या मनात कोरलेलं नाव कधीच पुसलं जात नाही आणि ते खरंय. हे रविंद्र चव्हाणांनी ओळखावं.












