स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटना आक्रमक
वडवणी/धाराशीव (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील डोंगरेवाडी येथील ऊसतोड कामगाराचा धाराशीवच्या भाऊसाहेब बिराजदार कारखाना परिसरामध्ये त्याच्या अंगावर ट्रॅक्टर उलटून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी कारखाना प्रशासनाने त्याला कुठलीच मदत दिली नाही. घटना घडून सहा दिवस उलटल्यानंतरही त्याच्या कुटुंबियांना कुठलीही सहानुभूती दाखवली नाही. यामुळे संतापलेल्या डोंगरवाडीकरांसह स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटनेने आज कारखान्यावर हल्लाबोल करत कारखान्याचे गाळप बंद पाडले. जोपर्यंत मयत डोंगरेंच्या तीन मुलींच्या नावे प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना दोन लाखांची मदत दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन परत घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे हे आपल्या पत्नीसह ऊसतोडणीला गेलेले होते. 3 जानेवारीच्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणेश डोंगरे, बाबा नागरगोजे, भरत डोंगरे हे तिघे कारखाना परिसरात सावलीला थांबले होते. त्यावेळी एक ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या अंगावर कोसळली. गणेश डोंगरे हे जागीच मृत्युमुखी पडले तर बाबा नागरगोजे, भरत डोंगरे हे जखमी झाले.ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी कारखाना प्रशासनाने अपघातग्रस्तांना कुठलीच मदत केली नाही. मयत डोंगरे कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. घटना घडल्याच्या सहा दिवसानंतरही कारखाना प्रशासनाने डोंगरे कुटुंबाची विचारपूस केली नाही. त्यामुळे संतापलेल्या डोंगरवाडी येथील गावकर्यांसह स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटनेने आज थेट धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात असलेल्या भाऊसाहेब बिराजदार या कारखान्यावर धडक मारली. कारखाना प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कारखान्याच्या गव्हाणीमध्ये नागरिकांनी ठिय्या मांडला. कारखान्याचे गाळप पूर्णत: बंद पाडले. या आंदोलनात गणेश डोंगरे यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे, त्यांच्या तीन लहान मुली, भाऊ, आई सहभागी झालेल्या असून आंदोलकांनी कारखाना प्रशासनासमोर गणेश डोंगरेंच्या तिन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना दोन लाखांची मदत द्यावी, अशी मागणी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.









