गणेश सावंत/9422742810
गेल्या पंधरवाड्यात बीडच्या राजकारणात जे काही घडत आहे ते केवळ योगा योग म्हणून पाहणे म्हणजे राजकारणाच्या वास्तवाकडे डोळे झाकण्यासारखे ठरेल. सत्तेच्या राजकारणात शब्दांपेक्षा अधिक बोलती ठरतात त्या भेटी. बीडमध्ये भेटींबरोबर आणखी एक गोष्ट अधिक बोलकी ठरताना दिसून येत आहे. ती म्हणजे हेलिकॉप्टर प्रवास आणि प्रमुख नेत्याचे सूचक विधाने. या अनुषंगाने बीडच्या राजकारणाकडे आणि बीडच्या राजकीय इतिहासाकडे डोकावून पाहितलं तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बीडच्या राजकारणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. इथलं राजकारण असो या समाजकारण ते महाराष्ट्राला दिशादर्शक ठरत आलेलं आहे. मग समाजकारणातलं आंदोलन असो या राजकारणातलं बंड ते सातत्याने चर्चेत राहून महाराष्ट्राच्या राजकारणाची एक तर घडी बसवतं नसता घडी विस्कटून टाकतं. हा इतिहास नाकारता येणार नाही. या सर्व घडामोडींमध्ये कोणाला सोन्याचा चमचा मिळतो तर कोण चिमटीत अडकतो. हे त्रिवार सत्य नाकारता येणारं नाही. प्रामुख्याने सध्या चर्चेत आहे ते
हेलिकॉप्टर पॉलिटिक्स
खरं तर या शब्दांमुळे अथवा या शिर्षकामुळे काहीजण समजून चुकले असतील,काहीजण गोंधळात पडले असतील तर काहीजण हमाम में सब नंगे म्हणत प्रतिक्रियाही देवून टाकत असतील. गेल्या पंधरवाड्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणूका झाल्या. बीडमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार हा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आला. मात्र उपाध्यक्ष आणि विषय समित्यांसाठी त्यांच्याकडे एकमुखी बहूमत नाही. मग अशा स्थितीत भारतीय जनता पार्टी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोघांपैकी एकाची मदत घेणे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीला क्रमप्राप्त आहे. या कालावधीतच महानगरपालिकेच्या निवडणूका लागल्या, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी कुठे एकत्र लढू लागल्या. अजित पवार स्पष्टपणे म्हणाले, राजकारणामध्ये शत्रूत्व आणि मित्रत्व कायम राहात नसतं. याच कालावधीमध्ये अजितदादांचा बीड दौरा झाला. त्या दौर्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे हे हेलिकॉप्टरमध्ये बसून अजितदादांसोबत मुंबईला गेले. दुसर्या दिवशी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी राज्याबरोबर बीडमध्ये एकत्रित येण्याचे संकेत मिळाले. मात्र स्थानिक राजकारणातील रुसवे फुगवे, कुणाला
चिमटीत आणणारे
ठरणार हे येणारे दिवस सांगतीलच. दोन्ही राष्ट्रवादीबाबत बोलायचे झाले तर आ.संदीप क्षीरसागर अथवा भाजपाचे योगेश क्षीरसागर या क्षीरसागर कुटुंबातील व्यक्तींना सोडून क्षीरसागर मुक्तीचा नारा देत क्षीरसागर जवळच्याच काहींनी दंड थोपटले, निवडणूका लढल्या, जिंकले, हरले. आता क्षीरसागर मुक्तीचे नारे देत ज्यांनी विजयाचे झेंडे फडकवले आणि ज्यांना पाडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जंग जंग पछाडले, त्यांना पुन्हा सत्ताकारणासाठी एकत्रित येण्याचे वरिष्ठ नेतृत्वाच्या सांगण्यावरून संकेत मिळू लागले. मग अशावेळी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांची अक्षरश: धूळधाण उडवून टाकायची. प्रचार करताना कंबरेचं सोडून अक्षरश: डोक्याला बांधायचं अन् सरशेवटी बीडच्या राजकारणात ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’चा अध्याय रेखाटायचा. त्यामुळे इकडे आमदारही चिमटीत आहेत आणि तिकडे आमदारांना सोडून कडेलोट विरोध करणारे तेही चिमटीत आहेत. या सर्व गोष्टी बीडच्या हेलिकॉप्टर पॉलिटिक्सचे अंग बनत आहेत. हे झालं दोन्ही राष्ट्रवादींबाबत. परंतु राष्ट्रवादी आणि भाजपा हे युतीत असले ती बीडमध्ये निवडणुकात ते आमने-सामने दिसले. परळी वगळता राष्ट्रवादी आणि भाजप बीड जिल्ह्यात कुठेच एकत्रित नाही हसले. ही बाब गेल्या पंधरवाड्यातली असतानाच राष्ट्रवादीची बुलंद तोफ धनंजय मुंडे भाजपात जाणार अशा बातम्या आणखी एका चर्चेला वळण देणार्या ठरल्या तर दुसरीकडे
बहिणीची भावाला परळीची राखी
देऊन टाकल्याचेही स्पष्ट झाले. राज्याच्या पर्यावरणमंत्री तथा धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमामध्ये ‘मी धनंजय मुंडेंना परळी देऊन टाकली’ असे वक्तव्ये केले. हे वाक्य केवळ वैयक्तिक भावना व्यक्त करणारे नसून आगामी राजकीय समिकरणाचा इशारा देणारे मानले जात आहे. तर दुसरीकडे काल गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत कार्यक्रमासाठी भक्त म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. या गडावर गेल्या पंचेवीस वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापुजा होत असते. काल धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री यांचा एकत्रित संवाद तर झाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख आपल्या भाषणातून धनुभाऊ म्हणून केला. यापुढे जात हे दोघे हेलिकॉप्टरने एकत्रित पुढे गेले. तेव्हा राजकारणामध्ये असे प्रवास सहज नक्कीच नसतात. विशेषत: जेव्हा सत्ता, विरोध, युती आणि फाटाफुटीच्या चर्चा रंगतात तेव्हा प्रत्येक हालचाल ही काहीतरी अर्थ काढणारी ठरते. त्यामुळे हा प्रवास केवळ शासकीय कामकाजाचा भाग होता की, राजकीय बदलाचे संकेत? हा प्रश्न उपस्थित होणे स्वभाविक आहे. बीडचे राजकारण नेहमीच
राज्याच्या राजकारणावर परिणामकारक
ठरत आलेले आहे. मग मुंडे विरुद्ध फडणवीस असो, मुंडे विरुद्ध मुंडे असो, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष असो, भाजप-राष्ट्रवादी समिकरण असो या सर्वांचा केंद्रबिंदू बीडच राहिलेला आहे. आज पुन्हा एकदा तेच बीड राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार का? आता याकडे उभ्या राज्याचे लक्ष नक्कीच लागून आहे. परंतु आम्हाला एक वेगळा प्रश्न पडतो. या सार्या राजकीय उलथापालथीत बीड जिल्ह्यातील प्रश्न, शेतकरी, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि विकास कुठे आहे? हे आम्ही शोधतोय. हेलिकॉप्टरमध्ये बसून राजकीय खेळी खेळल्या जात असतील तरीही जमीनीवरचा सामान्य माणूस अजूनही प्रश्नांच्या ओझ्याखाली दबलेला आहे. हे आमचे स्पष्ट मत आहे. राजकारणात बदल अटळ असतात, परंतु हे बदल सत्तेसाठी नसावेत, जनतेसाठी असावेत. याचं उत्तरही येणारा काळ देईलच. परंतु तोपर्यंत या बीडच्या आकाशामध्ये घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर्स केवळ प्रवासाची साधनं न रहाता सत्ताकारणाच्या शक्यतेचे प्रतिक बनत आहेत हे मात्र नक्की.









