गणेश सावंत/9422742810
अखंड हिंदुस्थानचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे महाराष्ट्रात उभारण्याची परंपरा ही श्रद्धेची आणि अभिमानाची बाब आहे. गावोगावी उभे राहणारे शिवरायांचे पुतळे हे केवळ दगडाचे शिल्प नसून स्वाभिमानाचे प्रतिक आहे. मात्र अलीकडच्या काळात या पुतळ्याभोवती निर्माण होणारे वाद पाहिले की एक प्रश्न अस्वस्थ करतोय. आपण शिवाजी महाराजांचा सन्मान करत आहोत की त्यांच्या विचारापासून दुर जात आहोत. पुतळे उभे राहावेत परंतू त्याच वेळी शिवरायांचा विचार उभा राहायला हवा आणि तोच विचार इथे उभा राहत नसल्याचे दिसून येते. स्वराज्य उभा करताना महाराजांनी आधी माणसं जमा केली, नंतर स्वराज्य उभं केलं आणि हे रयतेचं राज्य आहे असं म्हणत ते लोकांच्या हवाली केलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संघर्षातून उभे राहिलेलं नेतृत्व नव्हे नव्हे तर पारतंत्र्याच्या साखळदंडांना अक्षरश: उद्ध्वस्त करणारं एक अजब रसायन पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे महाराज म्हणजे लोकांना जोडणारी शक्ती. महाराजांनी हे स्वराज्य तलवारीच्या जोरावर उभं केलं नाही तर लोकांच्या विश्वासावर स्वराज्य उभं केलं. स्वराज्य हे निव्वळ राजसत्ता नव्हती. स्वराज्य म्हणजे जनतेचा सन्मान, न्याय प्रशासन आणि सर्वांना सुरक्षित वाटेल अशी व्यवस्था, ते रयतेचं राज्य ही त्यांची संकल्पना आजही अधुनिक लोकशाहीसाठी मार्गदर्शक ठरते. मग
अचानक पुतळे अन् त्यावरून वाद
या महाराष्ट्रात का होत आहेत? महाराजांची ती रयत नेमकी कुठे आहे. ज्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं, आपल्या 56 वर्षांच्या कालखंडात जे जगज्जेते नव्हे नव्हे तर आकाशाला भिडणारं काम राजांच्या हातून झालं तरीही रायगडावरचा राज्याभिषेक सोडता छत्रपतींनी स्वत:साठी काय केलं? होय इथं नाली खोदली, संडास बांधलं तरी आजचे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री अन् पंतप्रधान सुद्धा स्वत:चं नाव तिथं द्यायला उभे असतात. ‘भाईयो और बहनो’ म्हणत ‘हमने इतने शौचालय बनाये!’ म्हणत व्यासपिठावरून बोंब मारली जाते. त्या शौच्चालयावर आमूक आमूक योजना दाखवली जाते, श्रेय घेतलं जातं. माझ्या राजाने कित्येक किल्ले बांधले, कित्येक किल्ले जिंकले, स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं. मात्र या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरच्या एकातरी किल्ल्याला छत्रपतींनी स्वत:चं नाव दिलं का? राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब, छत्रपती संभाजी महाराज यांचे तरी नाव त्या किल्ल्याला आहे का? मग छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्या विचाराशी तुम्ही आम्ही इमान राखतो का? माणसे एकत्रीत करणे हे जर महाराजांचे ध्येय धोरण असेल तर मग पुतळ्यावरून वाद का? एकमेकात द्वेष का?
महाराज कुठल्या एका जातीचे
नक्कीच पुरस्कर्ते नव्हते. आठरापगड जातींना सोबत घेवून महाराजांनी इथे राजसत्ता नव्हे तर स्वराज्य उभे केले. स्वराज्य म्हणजे जनतेचा सन्मान, न्याय प्रशासन आणि सर्वांना सुरक्षित वाटेल अशी व्यवस्था. रयतेचे राज्य ही त्यांची संकल्पना आजही लोकशाही म्हणून तुम्ही आम्ही वापरतो. हे दुसर्यांदा आम्ही सांगतोय. इतिहासातले उदाहरणे पाहा, शिवरायांच्या व्यापक आणि सकारात्मक दृष्टीकोनाचे ते साक्ष देतात. अफजलखानाच्या वधानंतर शत्रूच्या मृतदेहाचा अपमान होवू दिला नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा अंत्यसंस्कार करण्यात आला. तिथेच महाराजांनी मानवतेला धर्मापेक्षा मोठे मानले. हा प्रसंग केवळ इतिहास नाही तो सहिष्णूतेचा धडा आहे. सुरत मोहिमेदरम्यान महाराजांनी आपल्या सैन्यांना स्पष्ट आदेश दिले होते, स्त्रिया, निरापराध नागरीक, धार्मिक स्थळांना कोणतीही हानी पोहचवू नका, युद्ध जिंकताना माणूसकी हरवू नये ही भुमिका आजच्या समाजासाठी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना त्यांच्या मुल्यांची आठवण ठेवणे नितांत गरज आहे. पुतळ्यावरून वाद निर्माण होणे ही परिस्थिती बदलण्याची गरज दाखवतो. पुतळा हा प्रेरणेचा केंद्रबिंदू असावा संघर्षाचा नव्हे. जिथे शिवरायांचा पुतळा उभा राहतो तिथे स्वच्छता, शिक्षण, सामाजिक ऐक्य आणि लोकहिताचे उपक्रम सुरू व्हावेत. हिच खरी शिवभक्ती ठरेल. पुतळ्याभोवती राजकीय सिमारेषा नव्हे तर समाजाला जोडणारी भावना निर्माण झाली पाहिजे आणि तिच भावना आजकाल इथे निर्माण होतांना दिसून येत नाही. होय
शिवरायांच्या भुमिकेची
आणि विचाराची ताकद
काय, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या मातीत निपजलेला प्रत्येक व्यक्ती जेव्हा राजमाता जिजाऊ मॉसाहेब, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आत्मसात करतो तेव्हा तो न्याय, निती आणि माणूस म्हणून वागण्याचा प्रयत्न करतो. ईश्वर भक्ती, श्रद्धा ही कशी असावी, धर्म कुठपर्यंत असावा याची जान त्याला होते. तो कधीही अंधश्रद्धाळू होत नाही. याचं ज्वलंत उदाहरण आज मितीला आम्ही देण्याचा प्रयत्न करू.
आम्ही एक निरीक्षण केलंय
‘अत्यंत दुर्दैवाने इथे मांडावे वाटते तो जो हरामखोर कॅप्टन खरात आहे आणि त्याचे जे सेक्स स्कॅण्डल सध्या देशभरात चर्चेत आहे त्या स्कॅण्डलमध्ये अडकणारे नेमके कोण? यावर थोडी नजर टाका, आत्मचिंतीत व्हा, जे त्या ठिकाणी अंधश्रद्धेचे भक्त म्हणून पोहोचले ते नेमके कोण? यावरही चिंतन मनन करा, होय आम्ही अत्यंत जबाबदारीने म्हणतो, त्यामधला एकही भक्त हा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारावर चालणारा नक्कीच नाही. ज्यांनी छत्रपती शिवरायांपासून शाहू फुले आंबेडकर यांचे विचार मस्तकात ठेवले ते कधीच खरातांच्या पायी पडले नाहीत.’ हे उदाहरण या अग्रलेखामध्ये एवढ्यासाठीच द्यायचंय, छत्रपतींचे विचार हे माणसाला माणूस म्हणून जोडणारे होते.
माणूस तोडणारे ‘पुतळे’
मग कशाला हवेत. आजची तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराजांकडे केवळ इतिहास म्हणून नव्हे तर नेतृत्वाच्या शाळेसारखे पाहू शकते. संकटात निर्णय घेणे, प्रशासन पारदर्शक ठेवणे, स्त्रीयांचा सन्मान राखणे आणि दुर्बलांच्या बाजुने ठामपणे उभा राहणे हे सर्व गुण आधुनिक समाजासाठी तितकेच आवश्यक आहेत. शिवरायांचे स्मारक म्हणजे भुतकाळाची पुजा नव्हे तर भविष्य घडविण्याची प्रेरणा आहे. जर प्रत्येक गावात पुतळा उभारताना एक ग्रंथालय सुरू केले, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणसाठी मदत केली किंवा सामाजिक सलोखा वाढवण्याचा संकल्प केला तर शिवाजी महाराजांचा वारसा आधीच जिवंत राहिल. कारण महाराजांचे खरे स्मारक दगडात नसते ते लोकांच्या कृतीत दिसते. आज गरज आहे हा वाद शंभर टक्के बंद झाला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका गटाचे नव्हते, ते संपुर्ण समाजाचे होते. त्यामुळे त्यांच्या नावाने मतभेद नव्हे तर एकात्मकता निर्माण व्हायला हवी. पुतळे उभे राहोत परंतू त्याचबरोबर स्वराज्याची मुल्येही उभे रहायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा सन्मान त्यांचे विचार दैनंददिन जीवनात उतरविणे, न्याय, समता, धैर्य आणि सर्वात पोटाशी लावण्याची भुमिका हिच छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. पुतळे प्रेरणा देतात परंतू विचार समाज घडवतात आणि जेव्हा विचार जागे होतात तेव्हाच खरे स्वराज्य निर्माण होते. येथे केवळ राजकारणासाठी महाराजांच्या नावाचं आणि पुतळ्याचं जर संगोपन होत असेल तर या महाराष्ट्रातल्या आजच्या तरुण पिढीने विवेकबुद्धीने पुतळ्याबरोबर महाराजांच्या विचाराकडेही पाहितलंच पाहिजे.
सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 5 एप्रिल रविवार चा अग्रलेख












