अग्रलेख- ‘खरा वीर वैर पराधिन्तेचा महाराष्ट्र आधार या भारताचा’
दिल्ली तक्ताचे नुमाइंदे
धड इथे, आत्मे तिथे
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
दिल्ली तक्ताचा महाराष्ट्रबाबतचा दुजाभाव आजचा नाही. इतिहासाच्या पानात महाराष्ट्र खुजा कसा राहील यासाठी सातत्याने दिल्ली तक्ताने कुरापती केलेल्याच आहेत. महाराष्ट्र हा नामशेष व्हावा आणि त्यावर आपला अमल व्हावा, आपली सत्ता राहावी यासाठी अनेक पातशाह्या जंग जंग पछाडल्या. मात्र या पातशाह्यांच्या छाताडावर सह्याद्री थयाथया नाचला अन् निधड्या छाताडाने अशा सत्तालालसी दिल्ली तक्ताचे मनसुबे उधळून लावले. मग ते सोळावे शतक असो वा आजचा एकविसावे शतक असो. दिल्ली तक्त विरुद्ध महाराष्ट्र हे चित्र कायम पहावयास मिळत आले आहे. पातशहाविरुद्ध लढा देताना छत्रपती शिवाजी महाराजांना एकीचे बळ कामी आले खरे, परंतु आता स्वहित जपण्यासाठी आणि जहागीरी मिळविण्यासाठी थेट राष्ट्रालाच भरचौकात नागवे केले जाते म्हणून दिल्ली तक्ताचे फावते. हे आता उघड होत चालले. परंतु महाराष्ट्राचा इतिहास आहे, जेव्हा केव्हा हिमालयाला गरज भासली तेव्हा तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, तो महाराष्ट्राचा स्वभाव आहे. म्हणून तर ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैर पराभिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा’असे स्वाभिमानी गीत गायिले गेले. तो महाराष्ट्राचा अधिकारच म्हणावा लागेल. महाराष्ट्राने स्वत:चे भले केले की नाही यापेक्षा दुसर्याचे वाटोळे कधीच केले नाही. हे सर्वश्रूत आहे. मात्र अशा स्थितीत आजचे दिल्लीस्थित दिल्लीश्वर महाराष्ट्राला पाण्यात पहात सौराष्ट्राला लोण्याचा गोळा देऊ पहात असले तरी शौर्य ते शौर्य असतं ते चोरून नेता येत नाही. मनगटात आणि निधड्या छातीत असावं लागतं. दुर्दैव याचं वाटतं, जे मनगट शिवशिवायला हवे, ज्या निधड्या छात्यांचा कोट महाराष्ट्रातील माणसासाठी व्हायला हवा ते शिवशिवणारे मनगटे आणि निधड्या छात्या दिल्लीश्वराच्या पुढे नतमस्तक होतात. महाराष्ट्राच्या अस्मितेबरोबर महाराष्ट्राच्या हाताला काम देणार्या
वेदान्ताच्या वेदना
महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेसह बेरोजगारांना प्रचंड देत आहेत. खाणउद्योगात लौकिक असलेला वेदांत समूह आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सुट्या भागांची, तसेच उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची बलाढ्य ङ्गॉक्सकॉन कंपनी यांनी संयुक्तपणे गुजरातेत सेमीकंडक्टर निर्मितीचा महाप्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला आहे. तब्बल दोन लाखाहून अधिक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारा, किमान तीस हजार कोटी रुपयांचा ‘जीएसटी’ देऊ करणारा हा प्रकल्प गुजरातसाठीच नव्हे तर देशाच्याच अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असेल. सेमीकंडक्टरसारखी मायक्रोचिप इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्राण असते. मोबाइल ङ्गोनमध्ये ती असतेच, परंतु टीव्ही, संगणक, मोटारी किंवा अन्य कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तिची प्राणप्रतिष्ठा करावीच लागते. सेमीकंडक्टरचे उत्पादन भारतात अगदीच नगण्य होते, त्यातून गेली दोन वर्षे तर सेमी कंडक्टरचा जगभर जणू दुष्काळ पडला आहे. अनेक उद्योगव्यवसायांना त्यामुळे हैराणीला तोंड द्यावे लागते.भारतासारखा देश याबाबत परावलंबी आहे. चीन, तैवान या सेमीकंडक्टर निर्मितीत अग्रेसर देशांकडे कायम डोळे लावून बसलेला. हे परावलंबित्त्व कमी करण्यासाठी देशातच सेमीकंडक्टरचे उत्पादन करणे हा एकमेव मार्ग होता. वेदान्ता फॉक्सकॉनच्या महाप्रकल्पामुळे तो मार्ग आता खुला झाला. या प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावर स्वागत व्हावे, याचे कारणे, दोन वर्षातच त्याची फळे मिळतील. हा प्रकल्प ऐनवेळा महाराष्ट्राच्या हातातून निसटला. हे म्हणण्यापेक्षा शिंक्यावरचा लोण्याचा गोळा खाली पडण्याअगोदरच सौराष्ट्राने पळवून नेला हे म्हणणे यथोयोचीत म्हणावे लागेल. काय आहे या प्रकल्पात, आणि का राजकीय शिमगा केला जातोय या प्रकल्पामुळे. हा प्रकल्प ज्या राज्यात जाईल त्या राज्यातील एक ते दीड लाख तरुणांना रोजगार मिळेल आणि वर्षाकाठी 30 हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांचा जीएसटी त्या राज्याला मिळेल. हेच वैभव महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायचं नाही हे दिल्लीश्वराने मनोमनी आखलं अन् त्या दिल्ली तक्ताने आपल्या
नुमाइंद्यांना
या प्रकल्पासाठी कामाला लावले. महाविकास आघाडी सरकारमध्ये हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार म्हणून चर्चा सुरू झाली. राज्य सरकार आणि वेदान्ताचे अग्रवाल यांच्यामध्ये बैठका झाल्या. अग्रवाल यांच्या काही मागण्या मान्यही झाल्या. मात्र या बैठका आणि चर्चासत्राच्या दरम्यान राज्यात दिल्ली तक्ताने धुमाकूळ घालत महाविकास आघाडी सरकारचं तक्त पलटवून त्या तक्तावर फुटीरांना विराजमान केले. फुटीरांसोबत आपले इमानी नुमाइंदे आहेतच. आता प्रश्न एवढाच पडतो, दिल्ली तक्त या नुमाइंद्यांचं आहे. देशातल्या अनेक राज्यात या नुमाइंद्यांच्या विचाराचं सरकार आहे. अशा परिस्थितीत दीड लाख बेरोजगारांना नोकरी देणारा आणि 30 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा जीएसटी देणारा हा प्रकल्प नुमाइंद्यांच्या हातून महाराष्ट्राच्या बाहेर जातोच कसा? कधीकाळी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा कनवळा घेणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा प्रकल्प सौराष्ट्र गुजरातेत जाताना मराठी माणसाचा विचार मनात आला नाही का? महाराष्ट्राच्या वैभवाचे आणि महाराष्ट्राच्या सौभाग्याचे विचार डोक्यात घुसले नाहीत का? जे भाजपाचे उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचं राजकारण करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर भाष्य करतात, ‘घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद’ म्हणत छत्रपतींच्या विचारांवर आम्ही चालतो, असे छातीठोकपणे सांगतात. मग त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राशी गद्दारी आणि सौराष्ट्राशी इमानी आज फडणवीस का करतायत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये हा प्रकल्प महाराष्ट्रातून सौराष्ट्रात जातोच कसा? तर याचं उत्तर यांचे
देह इथे आणि
आत्मा तिथे
असे म्हणावे लागेल. एखादा प्रकल्प लाखो हजारो, करोडो रुपयांचा जेव्हा उभं राहतो तेव्हा उभा करणारा आर्थिक सुबत्तेबरोबर भविष्यातल्या नफ्याचा विचार करतो. महाराष्ट्राने ज्या सवलती वेदान्ताला दिल्या त्यापेक्षा अधिक तुलनेत सौराष्ट्राने वेदान्ताला सवलती दिल्याचे आज सांगितले जाते. हे खरेही असेल, महाराष्ट्राचा पाडाव करण्याइरादे आणि सौराष्ट्राचा बोलबाला करण्यासाठी दिल्ली तक्त इतक्या खाली पडेल यात आश्चर्य ते काहीच नाही. परंतु दु:ख आणि खेद एवढेच, व्यासपीठावरून छत्रपतींचं नाव घ्यायचं, शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घ्यायचं, राजकारणामध्ये स्वहितासाठी पद-पैसा आणि प्रसिद्धीसाठी गद्दारी करायची आणि तीच वृत्ती राष्ट्राच्या बेगड्या प्रेमात दाखवायची. हा प्रकल्प गेला म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला असे आम्ही म्हणणार नाही. कारण या मातीत निपजलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मनगट तेवढच शिवशिवतं जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी 26 किल्ले तहात परत देऊन पुन्हा त्यापेक्षा कितीतरी पटीने जिंकले, आपल्या ताब्यात घेतले. इथेही तसंच आहे. महाराष्ट्राचा माणूस एका प्रकल्पामुळे उघडं पडणार नाही परंतु दिल्ली तक्ताच्या चाली आणि त्या चालींवर मोहरे म्हणून चालणारे महाराष्ट्रातले मराठी मनाचे हुजरे जेव्हा देह इथं ठेवतात आणि आत्मा दिल्ली तक्ताच्या पायाशी ठेवून लाचारी पत्कारतात तेव्हा मात्र दु:खं, वेदना महाराष्ट्राच्या मातीला नक्कीच होतात. इथे गद्दारी तेव्हा आणि आज अनेक वेळा उघडकीस आली. गद्दारीची हद्दही तात्काळ संपुष्टात आली. आज तो आमचा विषय नाही. आज विषय आहे तो महाराष्ट्राच्या मातीत निपजलेलं असताना दुबळे मनाने दिल्ली तक्ताची लाचारी का स्वीकारतात? महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याइरादे खरे तर
एकीचे बळ
अपेक्षीत आहे. महाराष्ट्राचं राजकरण हे अखंड भारत देशाच्या राजकारणाला आपल्या कव्हेत घेणारा आहे. देशाचा राजकीय मुड काय असायला हवा, हे महाराष्ट्र सांगते. हिमालयापाठोपाठ सह्याद्रीलाही देशात आणि जगात तेवढेच महत्व आहे. अशा परिस्थितीमध्ये या राज्यात अनेक पक्ष-संघटना असू शकतात. वेगवेगळ्या विचारधारा असू शकतात परंतु महाराष्ट्र एक आहे ना. अशा वेळी महाराष्ट्र हिताचे निर्णय घेताना कुणी कुणच्या पक्षात असले तरी ते सह्याद्रीचे मावळे असायला हवेत. जेव्हा वेदान्ता आणि प्रकल्प सौराष्ट्रात जातोय तेव्हा दिल्ली तक्ताच्या नुमाइंद्यांनी हा प्रकल्प अडकून धरण्याइरादे विरोधकांना सोबत घ्यायला हवे. विरोधकांनी आक्रमक होत हा प्रकल्प महाराष्ट्रात का होत नाही हे दाखवायला हवे. मात्र कुणी झारीतले शुक्राचार्य होतात, कुणी रांझेगावचे पाटलं होतायत तर कुणी स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसण्यासाठी स्वत:ची खुर्ची सांभाळतायत. अरे थू तुमच्या जिंदगानीवर महाराष्ट्रावर आलेलं संकट आता तलवारीच्या पात्याने दूर करायचं नसतं आता हे संकट डोक्याने आणि एकीच्या बळाने दूर करायचं असतं. परंतु स्वत:च्या खुर्चीसाठी इथे दूधखुळे जेव्हा एकमेकांचेच वस्त्रहरण करतात आणि एकमेकांचे नागवेपण अखंड भारताला दाखवतात तेव्हा त्यांच्याकडून राष्ट्रभक्तीची, छत्रपतींच्या विचाराची अभिलाषा तरी कशी ठेवायची? हा प्रकल्प गेलाय, आता आणखी प्रकल्प आणू ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा हास्यास्पद आहे. हा प्रकल्पच का गेला? हा विचार व्हायला हवा आणि हा विचार आता राजकारण्यांनी करण्यापेक्षा महाराष्ट्रातील तरुणांनीच करायला हवा.