निर्लज्ज व्यवस्थेला आप्पारावचा मृतदेह घर मागतोय..!
आदिवासी राष्ट्रपतींच्या देशात पारधी समाजाचा देह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत
जे काल करता आलं असतं ते आज करण्यासाठी कलेक्टर कचेरीत बैठक
ग्रामसेवकापासून जिल्हाधिकार्यांपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल करा
वंचीत, आप सह सामाजिक संघटना जिल्हाधिकार्यांच्या दारात
बीड (रिपोर्टर) अखंड भारताच्या प्रथम नागरीक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजप आदिवासी समाजाला न्याय देण्याचा डांगोरा पिटवत असताना बीडमध्ये आपल्या न्याय-हक्काच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी असलेल्या पारधी समाजातील आप्पाराव पवार यांचा कलेक्टर कचेरीसमोर उपोषणाला बसल्यानंतर मृत्यू झाला. गेल्या 36 तासांपासून आप्पारावचा मृतदेह प्रशासन व्यवस्थेच्या भिजत घोंगडं आणि निर्लज्ज बाबुगिरींच्या कामचुकारपणामुळे अंत्यविधीच्या प्रतिक्षेत आहे. आप्पारावने जिव दिल्यानंतर बीडच्या जिल्हा प्रशासनाने त्या कुटुंबीयाला जागा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या 12 वर्षात या प्रशासनाला हे प्रकरण सोडवता आलं नाही. काल परवापर्यंत अशीच बैठक घेतली असती आणि निर्णय दिला असता तर आप्पारावचा जीव वाचला असता परंतु निर्लज्ज प्रशासनाला माणसाच्या जिवाची परवा नाही म्हणूनच या प्रकरणातील दोषी असलेल्या ग्रामसेवकापासून जिल्हाधिकार्यांपर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी बहुजन वंचीत आघाडी, आप, यासह अन्य सामाजिक कार्य करणार्या संघटनांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि घोषणाबाजी सुरू ठेवले आहे. याचे पडसाद जिल्हाभरात उमटताना दिसून येत आहे.
कामचुकार प्रशासन व्यवस्थेतील स्मशानात काल उपोषणकर्ते आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला. सदरची घटना ही प्रशासन व्यवस्थेला आणि शासन व्यवस्थेला अंतर्मु करावयास लावणारी आहे. एकीकडे देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या आदिवासी आहेत आणि भाजप यांनीच आदिवासी समाजाला न्याय दिला, असा डांगोरा भाजपाकडून पिटवला जातो मात्र गावपातळीवर डोंगर-दर्यात, जंगलात राहणार्या आदीवासींचं जिणं मरणयातना देणारं हे सत्य बीडमध्ये उघड झालं. गेल्या कित्येक वर्षांपासून घराच्या मागणीसाठी बीडच्या प्रशासन दरबारात न्याय मागणार्या पवार कुटुंबातील कर्त्या पुरुषाला अखेर देह ठेवावा लागला. मात्र कामचुकार अधिकारी, कर्मचार्यांना त्या मृतदेहाचे सुतकही पडले नाही. जेव्हा व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला जावू लागला तेव्हा आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बैठक बोलावून पवार कुटुंबियाला जागा खरेदी करून देण्याचे ठरवण्यात येत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते. हीच हालचाल गेल्या दोन दिवसांपूर्वी केली असती तर पवार यांचा कुडकुडत मृत्यू झाला नसता. गेल्या 24 तासांपासून आप्पारावचा मृतदेह अंत्यविधीच्या प्र्रतिक्षेत आहे. दुसरीकडे दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत वंचीत, आप आणि अन्य सामाजिक संघटना आग्रही आहेत.
बैठकीत काय सुरू आहे…
आप्पाराव पवार यांच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकार्यांनी महत्वपुर्ण बैठक बोलावली. दुपारी दीड वाजेपर्यंत ही बैठक तीन तासांची झाली होती. सुत्रांच्या माहितीनुसार गोरे वस्ती, बांगर नाला येथील दोन प्लॉट किंवा मुळुकवाडी (ता. बीड) येथील एक एकर जागा प्रशासन खरेदी करून संबंधित पारधी कुटुंबाला देण्याच्या तयारीत आहे. अद्यापपर्यंत यावर निर्णय झाला नव्हता.