बीड (रिपोर्टर) घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून कुटुंबासह उपोषणाला बसलेल्या वासनवाडी येथील आप्पाराव पवार यांचा उपोषणस्थळीच मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. केवळ आणि केवळ जिल्हाधिकारी यांनीच उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत तालखेड येथे रास्ता रोको करण्यात आला. जबाबदार अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
प्रशासनाने घरकुल दिल्यानंतर त्याचा दुसरा हप्ता गाव पुढार्यांसह अधिकार्यांनी रोखत तेथून हाकलून दिल्यानंतर वासनवाडी येथील पवार कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. मात्र या उपोषणाची दखल एकाही अधिकार्याने घेतली नाही. घरकुल घरकुल करून पवार यांनी जीव सोडला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. मात्र पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्या अधिकार्यांना तात्काळ निलंबीत करावे व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पवार कुटुंबियांना पन्नास लाखांची आर्थिक मदत शासनाने करावी या मागणीसाठी तालखे फाटा येथे जीवन राठोड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. या वेळी अपाल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.