दूधही पोळले आहे, आता ताक फुंकून प्यायचं आहे, पक्ष काय निर्णय घेईल हे माहित नाही, परंतु मला परळीमधून आणि राजेंद्र मस्केंना बीडमधून विजयी करा, असं म्हणत पंकजा मुंडेंनी थेट भाजपा अध्यक्ष बावनकुळे यांच्या समोर स्वत:ची आणि राजेंद्र मस्केंची उमेदवारी घोषीत करून टाकली. या घोषणेतून आणि पक्ष काय निर्णय घेईल या वक्तव्यातून पंकजांचे कटाक्ष दिसून आले. भाजप आणि पंकजा यांच्यात सौख्य आहेच? हे सांगणे आता तरी बेरजेचे ठरणार नाही. कारण चौथ्यांदा पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीसांच्या व्यासपीठावर गेल्या नाहीत. उलट फडणवीस येण्याअगोदर स्व. विनायक मेटेंच्या समाधीस्थळी जात अभिवादन करून त्या अन्य कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या. यातच फडणवीस आणि पंकजा एका म्यानात राहूच शकत नाहीत हे आता अधिकतेने स्पष्ट होते. पंकजांना महाराष्ट्राचं नेतृत्व अमान्य असल्याचेही यातून दिसून येते. कारण त्या सातत्याने आपले नेते हे अमित शहा असल्याचे सांगतात. पंकजांची ही भूमिका भाजपाला परवडणारी आहे का? अन् पंकजांना तरी ती परवडू शकणार आहे का? याचा उहापोह करतानाच पंकजांनी 2024 च्या निवडणुकां डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि ओबीसीचे गचकरण खाजवण्याचा प्रयत्न केला. त्यातून प्रथमच पंकजांवर भाजपातूनच विखे पाटलांनी पलटवार करत भावनिक मुद्दा करू नका, असे स्पष्टतेने सांगितले.
पंकजा गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या पटलावर सातत्याने चर्चेत आहे. स्व. गोपीनाथ मुंडेंची लेक म्हणून पंकजांच्या पाठीशी जी ताकद उभी आहे ती मुंडेंच्या पुण्याईची आणि ओबीसींच्या प्रेमाची. स्व. मुंडे हे ज्या पक्षात होते तो पक्ष महाराष्ट्रामध्ये केवळ सेठजी-भटजीचा पक्ष असायचा मात्र जेव्हा मुंडेंनी ओबीसीची झालर भाजपाला लावली अन् तिथेच भाजप महाराष्ट्रात सत्तेत आला. स्व. मुंडेंची ताकद वाढते तेव्हा भाजपेयींनी त्यांनाही त्रास दिला. मुंडे हे खमके आणि लोकातले असल्याने ते महाराष्ट्र नेतृत्व सोडा दिल्ली तक्तालाही हलवू शकत होते. परंतु ती परिस्थिती आज आहे का? दिल्ली तक्त प्रबळ आहे, भाजपात सोडा देशात लोकशाहीला महत्व नाही, तिथे हुकुम चालतो तो मोदी-शहांचा आणि त्यांच्या लाडल्यांचा. महाराष्ट्रात मोदी-शहांचा लाडला देवेंद्र फडणवीस आहेत. हे सुर्य प्रकाशाइतके सत्य नाकारता येणार नाही आणि इथेच पंकजांच्या भविष्याला कटाक्षात आणले गेले. गेल्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये पंकजांचा जसाच त्यांच्या होम पिचवर पराभव झाला तेव्हापासून पंकजा अक्षरश: बिथरल्या. हा शब्द आम्ही जाणीवपुर्वक टाकतो, कारण पहिल्या वर्षातच त्या परळी सोडा जिल्ह्यातही डेरेदाखल झाल्या नाहीत. पराभव इतका वर्मी लागला की त्यांनी स्वपक्षासह विरोधकांवर कटाक्ष टाकण्यापेक्षा मतदारांवरही त्या कटाक्ष टाकायला मागे-पुढे पहात नव्हत्या. मात्र पुन्हा त्यांना उपरती आली आणि त्यांनी मतदार हे मायबाप आहेत यापेक्षा आपण कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांची माता आहोत हे व्यासपीठावरून सांगितले. हे सांगताना आणि जणांचा पाठींबा मिळवताना स्वपक्षात मात्र त्यांची पदोपदी कुचंबणा होत राहीली. गेल्या चार वर्षांच्या कालखंडात पंकजांचं पुनर्वसन होईल मग विधान परिषद असो अथवा राज्यसभा असो अनेक संधी आल्या, तिथे पक्षाने दुर्लक्ष केले, उलट केंद्रिय मंत्रिमंडळाचा विस्तार होताना त्यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांना मंत्रिपद न देता समाजातल्याच कराड यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं. केंद्र आणि राज्य दोन्ही आपल्या हातात नाही, आपल्या हातात आहे तो समाज. स्व. मुंडेंची पुण्याई हे लक्षात घेऊन पंकजांनी गेल्या तीन-चार वर्षांच्या कालखंडात ताठर भूमिका घ्यायला सुरुवात केली. पक्षाविरोधात भाष्य करण्यापेक्षा कटाक्ष करण्यावर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री असलेल्या पंकजांना कधी एमआयएमची ऑफर तर कधी केसीआरची ऑफर येत राहिली. गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये पंकजांनी कटाक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात राजकीय सौख्य नसल्याचे वेळोवेळी दाखवून दिले. गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये बीडमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस किमान चार वेळेस बीडमध्ये डेरेदाखल झाले, मात्र एकाही कार्यक्रमाला मुंडे भगिनी उपस्थित राहिल्या नाहीत. काल स्व. विनायक मेटेंच्या जयंतीचा कार्यक्रम होता. तेव्हा पंकजा यांनी फडणवीस आणि मी एका व्यासपीठावर असणे याला महत्व नाही, स्व. मेटेंच्या पत्नीने, त्यांच्या परिवाराने फोन केला आहे, मी तेथे जाणार आहे, असे मह्टले. काल मेटेंच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त देवेंद्र फडणवीस बीडमध्ये होते, तर तिकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत बैलगाडी शर्यतीत भाजपाचे राज्याध्यक्ष बावनकुळे, पंकजा मुंडे आणि बीड भाजप त्या ठिकाणी उपस्थित होतं. तेथे पंकजांनी बावनकुळेंसमोर पक्ष काय निर्णय घेईल, म्हणत स्वत:ची आणि राजेंद्र मस्केंची विधानसभेची उमेदवारी घोषीत केली, मात्र इकडल्या व्यासीपठावर जिथे की फडणवीसांची उपस्थिती होती त्या ठिकाणी त्या गेल्या नाहीत. याउलट राज्यात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याइरादे पंकजांनी मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, हार घेणार नाही, असे म्हटले. विशेषत: मराठा आरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यामध्ये अथवा मोर्चामध्ये पंकजा कधीच सहभागी झाल्या नाहीत. आज मात्र पंकजांनी हा विषय समोर मांडला त्यामुळे भाजपानेही आता त्यावर पलटवार केला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असलेले विखे पाटील यांनी असे भावनिक मुद्दे करू नका, म्हणत पंकजांना चपराक लावली तर मराठा समाजाच्या समयन्वकांनीही पंकजांचे हे बेगडे प्रेम असल्याचे म्हटले. काल बीडमध्ये पंकजांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं भाषण वेगळं असल्याचं पाहायला मिळाले. तत्पूर्वी गेल्या महिनाभरापूर्वीच पंकजा मुंडे यांनी आपण अमित शहा यांची भेट घेऊन सर्व काही सांगणार असल्याचे म्हटले. मात्र त्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या शहांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आणि इथेच फडणवीस हे राज्य भाजपात बलशाली असल्याचे दिसले. अशा वेळी येणार्या काळात पंकजा काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष असले तरी पंकजांच्या फेट्यातल्या डोक्यात नेमके काय? हे येणारा काळ सांगेल.