दलितांना संविधान बदलण्याची तर मुस्लिमांना सीएएची भीती दाखविली जाते, जिल्ह्याच्या विकासासाठी पाठिशी उभा राहा -पंकजा मुंडे
पाटोदा (रिपोर्टर): ज्याच्या पोटामध्ये तुमच्याबाबत पिडा आहे तो तुमचा विकास करू शकतो, माझं रेकॉर्ड तपासा, मी आमदार झाले, मंत्री झाले त्यावेळी जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकर्यांना विमा दिला, करोडो रुपयांचा निधी आणला, बीड जिल्ह्याचा विकास केला, आताही करेल. मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून बाहेरून मोठमोठे नेते येतात, ते फक्त निवडणुकीपुरते. जिल्ह्याची मते हाडपण्यासाठी, जातीपातीच्या भिंती उभा करण्यासाठी ते आलेले असतात, त्यांनी कधी बीडचा विकास केला का? विकासाची कामे त्यांच्या जिल्ह्यात मते मात्र आपली हाडपली जातात. असे म्हणत युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी विरोधी उमेदवारासह त्यांच्या नेत्यांवर हल्लाबोल केला तर आ. सुरेश धस यांनी हात जोडून, पाय पडून विनंती करतो म्हणत, पंकजाताईंना मतदान करा’, माझ्या विनंतीचा मान ठेवा’ असे आवाहन केले.
पाटोदा येथे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. आज दुपारी बारा वाजता जाहीर सभेला सुरुवात झाली. त्यावेळी व्यासपीठावर आ. सुरेश धस, आप्पा राख, अबू सेठ, जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुरेश धस म्हणाले, की, ‘ देशात भाजपाची सत्ता आल्यापासून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे हाती घेतल्यापासून सर्वसामान्य नागरिकांचा मोठा विकास झाला, मनरेगाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या योजनांना गती आली, त्यामार्फत शेतकर्यांचा फायदा होत गेला. रमाई योजनेमार्फत लोकांना घरे मिळाली. घरे देताना तो कुठल्या जातीचा आहे, तो गरीब आहे, त्याने आपल्याला मतदान केले का? हे पाहिले नाही. कष्टकरी, कामगारांसाठी मोदी सातत्याने काम करत आले आहेत, समोरचे लोक मात्र केवळ फुकट मतदान घेत आहेत. मग ते घेण्यासाठी कधी संविधान बदलण्याची भीती दाखवत आहेत, मुस्लिमांना सीएए कायद्याची भीती दाखविली जात आहे, संविधान बदलण्याची अवकात कोणातही नाही. शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेता आणि लबाडी करता, असेही धसांनी विरोधकांना सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आज घराघरातल्या वृद्धांचे आयुष्य वाढल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हात जोडून, पाय पडून विनंती करतो, मोदींकडून देशात चांगले काम होत आहे, त्यासाठी पंकजाताईंना मतदान करा, तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या, हात जोडून, पाय पडून लोकशाहीत नम्रपणे मतदान मागितलं जातं, अरेरावी करून मीच सर्वेसर्वा म्हणत राजकारण करता येत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसापेक्षा देश मोठा असल्याचे सांगितले. लोकशाहीमध्ये दादागिरीने काही मिळत नाही. आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे, विकास हे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाची प्रतिष्ठापणा करताना उपवास केले, आपला राजा किती तत्वनिष्ठ आहे हे पाहिले पाहिजे, मला मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान. पंतप्रधान मोदींनी दिलेला उमेदवार तुम्हाला पसंत पडला का? माझ्यात काही खोट आहे का? अवगुण आहेत का? असा सवाल उपस्थितांना करत पंकजा म्हणाल्या, बोला…बोला……त्या वेळी उपस्थितांनीही त्णयांना उमेदवार चांगला असल्याची साद दिली. राजकारण नॅशनल-इंटरनॅशन लेव्हलवर गेलं पाहिजे, विकासावर गेलं पाहिजे. माझं रेकॉर्ड तपासा, मी आमदार झाले, मंत्री झाले, बीड जिल्ह्यात अनेक विकासाची कामे केली, जिल्ह्यात सर्वात जास्त शौचालय बांधली, शेतकर्यांना सर्वात जास् तविमा दिला, रस्त्याचे जाळे उभे केले, ज्याच्या पोटामध्ये पिडा असते, तोच आपल्या माणसाचे दु:ख समजू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी-कष्टकर्यांना न्याय दिला, सर्वसामान्यांना घर-पाण्याची व्यवस्था केली, मात्र विरोधकांचे नेते बीडमध्ये निवडणुकीपुरते येतात, मते लुबाडून जातात, जातीपातीच्या भिंती उभा करतात, आता विरोधक स्वत:लाच हरवण्यासाठी निवडणुकीत उभा असल्याचे सांगून संविधान कोणाला बदलता येत नसल्याचे त्यांनी म्हटले. मी कधी कोणाला अथवा कुठल्या समाजाला अंतर दिलेले नसल्याचे सांगून या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.










