शिरूर, अंमळनेर पाठोपाठ दिंद्रुड, सिरसाळ्यातही जरांगेंवर गुन्हा
बीड (रिपोर्टर): राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टार्गेट केल्यानंतर आता राज्याचा गृहविभाग चांगलाच हरकतमध्ये आल्याचे दिसून येते. 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात 25 फेब्रुवारीपर्यंत 12 पोलीस ठार्यात 19 गुन्ह्यांसह 519 पेक्षा जास्त मराठ्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतरही रास्ता रोको करणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरुच असून शिरूर, अंमळनेरनंतर आता मनोज जरांगे यांच्यावर सिरसाळा आणि दिंद्रुड पोलिसात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आंदोलक मराठ्यांवरही मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिरूर, अंमळनेर पोलिसात जरांगे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर आता काल दिंद्रुड पोलिस ठाण्यात जरांगेंविरोधात दोन गुन्हे तर सिरसाळा पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाने जिल्हाभरात शांततेत रास्ता रोको आंदोलन केले. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत गंभीर आरोप केले. त्यानंतर गृहविभागाचे पोलीस चांगलेच हरकतमध्ये आल्याचे दिसून येते. आता ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रास्ता रोको झाले आहेत आणि तेथे गुन्हे दाखल झालेले नाहीत त्या ठिकाणीही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काल दिंद्रुड, सिरसाळा, धारूर या तीन पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये माजलगाव-धारूर रोडवरील छत्रपती चौक तेलगाव, या ठिकाणी रास्ता रोको करणार्या 17 आंदोलकांसह इतरमध्ये दहा ते पंधरा आंदोलकांचा समावेश आहे. त्याचबरोबर खामगाव-पंढरपूर रोडवरील चोरांबा या ठिकाणी रास्ता रोको करणार्या 15 ते 20 जणांचा समावेश आहे. एकूण तीन पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असून त्यामध्ये तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे नाव आहे.