गणेश सावंत-
कुठल्याही मागणीसाठी आंदोलन करणे हा इथल्या प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे. ते आंदोलन कसे असावे, त्याचे स्वरुप काय असावे, त्या आंदोलनाची सुरुवात, मध्यान आणि शेवट कसा असायला हवा, आंदोलनाचे फलित होते का? आंदोलनामध्ये यश मिळते का? जे यश मिळाले आहे ते यश मागण्यापुरते मर्यादीत आहे का? की अर्धवट मागण्या पुर्ण होऊन अन्य मागण्या आश्वासित आहेत का? अन् सरशेवटी या आंदोलनाचे श्रेय कोणाच्या पदरी! इथपर्यंत आंदोलनाची व्यूहरचना आणि दशा आणि दिशा आखली जाते. गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन होत राहिलं. कधी टोकाचे, कधी संयमाचे ते आंदोलन असल्याने चर्चेत राहिलेल्या मराठा आंदोलनाचा आणि आंदोलकांचा जरब कायम सरकारवर राहिला. या आंदोलनाच्या दरम्यान दोन वेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. मात्र ते न्याय दरबारी टिकू शकले नाही. लाखोंचे मोर्चे निघल्यानंतरही मराठ्यांच्या हाकेला न्याय देवतेने प्रतिसाद दिला नाही. न्याय देवता तेव्हाच प्रतिसाद देते जेव्हा पीडिताच्या हाकेला शासन व्यवस्था करेक्ट साद घालते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातल्या शासन व्यवस्थेने बहुदा तशी साद घातली नसावी. म्हणून न्याय देवतेने पिडित मराठ्यांची आरोळी काननिराळी टाकली असावी. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठवाड्यातून मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला अन् इथच
मराठे एकवटले
कोण आहेत मनोज जरांगे? कुठून आलेत मनोज जरांगे? हे प्रश्न गेल्या सहा महिन्यांपूर्वी उभ्या महाराष्ट्राला आणि उभ्या देशाला नक्कीच पडले असतील. त्यांनी जी मागणी हाती घेतली होती ती मराठा आरक्षणाची होती. त्या मागणीतून आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दुबळ्या झालेल्या मराठ्यांना बळ मिळणार होतं. म्हणून एकीकडे मनोज जरांगे हे उपोषण करून अहिंसेच्या मार्गाने आपली सत्य मागणी शासन-प्रशासन व्यवस्थेसमोर मांडत असताना दुसरीकडे मराठे हे त्यांच्या साथीला राज्यभरात निर्जल उपोषण करत होते. अंतरवली सराटीत पोलिसांकडून लाठीचार्ज झालं. महिला-मुलांसह अबालवृद्धांचे डोके फुटले आणि इथेच मराठे चवताळले. तोपर्यंत आंदोलन हे न्यायिक आणि दिशादर्शक होते. मराठ्यांवर अन्याय होतोय, मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, असे मराठ्यांसह मराठेत्तरांनाही वाटायचे. मराठा आंदोलनाबाबत आणि मनोज जरांगे यांच्याबाबत तेवढीच सहानुभूती महाराष्ट्राच्या डोंगरदर्यातून आणि वाडी-वस्ती तांड्यातून उफळून येत होती. इथेच
मराठ्यातल्या दोन जाती
आमने-सामने येणार असे वाटायचे. त्या जाती कुठल्या? तर मराठ्यातले प्रस्थापीत आणि मराठ्यातले विस्थापीत. प्रस्थापीत मराठ्यांना एकवटलेला मराठा हा आपल्या खर्चीला सुरुंग लावू शकतो ही भीती कायम असल्याने या आंदोलनाकडे सत्तेल्या आणि सत्तेबाहेरच्या मराठ्या नेत्यांनी उत्स्फूर्तपणे कधी पाठिंबा दिलाच असेल हे सांगणे कठीण. ज्याप्रमाणे प्रस्थापीत मराठ्यांना आपल्याच बांधवांची भीती होती त्याप्रमाणे राज्यात आणि केंद्रात एकअंगी सत्ताकारण करू पाहणार्या भाजपालाही ती भीती असणारच म्हणून प्रस्थापीत मराठ्यांना ढाल करून भाजपासारख्या एकअंगी सत्ताकारण करणार्या नेतृत्वाने हे आंदोलन मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर दिलं. मनोज जरांगे यांचे आंदोलन तोपर्यंत गावागावात पसरले. परंतु जेव्हा हे आंदोलन आणि आंदोलक आटोक्यात येत नाही तेव्हा राज्यातलं त्रिमूर्ती सरकार काहीसं हादरलं. परंतु यातून मताचा टक्का साधण्यासांठी
फडणविसांचा डीएनए
फार्म्यूला भाजपासाठी कामी आला. मराठे एकवटतात, तेव्हा त्या एकवटलेल्या मराठ्यांचा दहशतीसाठी कसा वापर करता येईल याचा पुरेपूर फायदा भाजपाने घेतला आणि मराठ्यांच्या मतांचे धु्रवीकरण व ओबीसींच्या मतांचे एकीकरण करण्या हेतू फडणविसांनी आपली चाल खेळली. एकीकडे आक्रमक झालेला मराठा आणि त्यात आंदोलनाला बीड जिल्ह्यात जाळपोळीतून लागलेले गालबोट हे ओबीसी-विरुद्ध मराठा करण्यात राजकारण्यांना बर्यापैकी यश आले. म्हणून फडणविसांनी थेट ओबीसी हा भाजपाचा डीएनए आहे हे उघडपणे सांगितले. जेवढ्या प्रमाणात मराठा आंदोलक हिंसक आणि सर्वसामान्यांना त्रासदायक होईल तेवढ्या प्रमाणात राज्य सरकारने या आंदोलनाला आणि आंदोलकाला विशेष सूट सहा महिन्याच्या कालखंडामध्ये दिली. या सहा महिन्यांच्या कालखंडात अंतरवली सराटीत झालेला पोलिसांचा लाठीचार्ज, गावात गावातले उपोषण, पुढार्यांना गावबंदी, बीडमध्ये लोकप्रतिनिधींचे जाळलेले घरे, मुंबई पायीदिंडी, या आंदोलनातले प्रमुख घटनाक्रम म्हणावे लागतील. या घटनाक्रमामधून भाजपाला जे जे ेघेता येईल त्या त्या वेळी त्यांनी घेतले. या आंदोलनात कोणाला काही मिळाले की नाही यावर भाष्य करताना मनोज जरांगे यांनी सर्वच पुढारी, नेते घरात बसवले. हे तेवढेच खरे. परंतु अशा सापटीतूनही फडणविसांनी ओबीसींचा डीएनए भाजप हे सातत्याने जाहीरपणे सांगून भाजप ओबीसींच्या पाठिशी आहे, हे जे दाखवून देत ओबीसी मताला भाजपाच्या पारड्यात टाकले. तिथेच भाजपाचे फावले. म्हणजेच मराठा आरक्षण आंदोलन हे भाजपाने सोयीनुसार आपल्या फायद्यासाठी यशस्वीपणे राबवले. यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यांना तसे तेव्हा करता आले जेव्हा
जरांगे अस्थिर
झाले. या पूर्ण आंदोलनामध्ये एकच नेतृत्व ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे, त्यामागे आणखी टीम असेल, समाज असेल, आंदोलन मोठे होत गेले, मराठा जरांगेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहत गेला. मागण्या मान्य होत राहिल्या. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मुख्यमंत्री जरांगेंच्या काफिल्यात येऊन भेटू लागले. अशा वेळी आंदोलनाचे नेतृत्व करणार्या व्यक्तींनी स्थिर राहणे नितांत गरजेचे असते, कारण व्यवस्था आंदोलनाला आणि आंदोलनकर्त्यांना अस्थिर करण्याची संधी सापडत असते. अखंड मराठा जरांगेंच्या पाठिशी उभा राहत गेला,आणि तिथेच जरांगे अस्थिर होत गेले. सुरुवातीला ते एकेरी भाषेत बोलायचे तेव्हा तो ग्रामीण बाज आहे, हे लोक समजून घ्यायचे परंतु त्यानंतर व्यासपीठावरून झालेली अश्लाघ्य शिवीगाळ इथपर्यंतही जरांगेंना सांभाळून घेण्यात आले. मात्र परवा ज्या पद्धतीने जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांवर भडकले तिथेच ते कट‘शहा’च्या राजकारणात अडकले. एकीकडे
बामणी कावा
हा शब्द प्रयोग करून स्वत:च्या जातीसाठी लढणार्या जरांगेंनी अन्य जातींचा जो जाहीर तिरस्कार केला तो विचार नक्कीच छत्रपतींच्या प्रतिमेशेजारी राहून कोणी केला तर तो कुंच्याही समाजाच्या पचनी पहणारा नसेल. बामणी कावा हा शब्द एकट्या जरांगेंनी वापरलेला नाही. महात्मा फुलेंपासून प्रत्येक बहुजनातल्या लेखक अथवा चळवळीतल्या वक्त्याने वापरला असावा आणि तो शब्द थेट सोळाव्या शतकापासून प्रचलित आहे. छत्रपतींना जो त्रास झालेला तो जगजाहीर आहे. परंतु आज जी व्यवस्था आहे आणि आपण ज्या व्यवस्थेत, ज्या छत्रपतींच्या विचारांवर बोलतो-चालतो त्या छत्रपतींच्या व्यासपीठावरून एकेरी भाषेमध्ये शिवीगाळ करणं अथवा एखाद्या जातीला द्वेषपुर्णतेतून पाहणे योग्य नाही अशा काहीश्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटू लागल्या आणि तिथेच
फडणविसांचा कावा
सरकारच्या आणि खासकरून फडणविसांच्या कामी आला. कारण जरांगे हे अचानक आंदोलनाची दिशा बदलायचे, एकेरी भाषेत बोलायचे. त्यामुळे जरांगे किती तुघलकी आहेत हे दाखवण्याचा प्रयास सरकारकडून करण्यात आला. सरशेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘सहन करतो तोपर्यंत करतो, सहनशिलतेच्या बाहेर गेलं की ‘करेक्ट’ कार्यक्रम करतोच’ हे बोलून दाखविले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात जरांगे यांच्यावर प्रत्येकाने भाष्य केले. फडणविसांना कव्हर देताना जरांगे खलनायक दाखवण्याचा प्रयास झाला. मात्र यातून अजित पवारांना किती फायदा झाला, एकनाथ शिंदेंना किती फायदा झाला याची गोळाबेरीज करता येत नसली तरी भाजपाला आणि फडणविसांना नक्कीच फायदा झाला हे मराठा आंदोलकांनीही ओळखलं, मराठ्यांनीही ओळखलं त्यामुळे सर्वात मोठं याच्यात नुकसान झालं असेल तर ते मराठा नेतृत्वाचा. त्यामुळे येणार्या निवडणुकीत जे काय होईल, किंवा गेल्या सहा महिन्यांच्या कालखंडात सत्ताधार्यांसह पुढार्यांनी मराठ्यांसाठी जे काही केलं असेल त्याचा हिशोब होणे बाकी आहे.