अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल’ अशा घोषणा देत विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात आंदोलन केले. हे सरकार अर्थसंकल्पामध्ये घोषणांचा पाऊस पाडत आहे. हा अर्थसंकल्प राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टी आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा असल्याचे सांगत विरोधकांनी सकाळीच विधान भवनाच्या पार्यांवर हातात फलके घेऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राज्याचा अंंतरीम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी-शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करून सोडणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. राज्याची अर्थिकस्थिती बिघडवणारा आणि उधळपट्टीसह भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे म्हणत कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. हे ट्रिपल इंजिन सरकार शेतकर्यांवर अन्याय करणारा आहे. अशा सरकारचा धिक्कार असो. राज्याला कर्जबाजारी करणार्या सरकारचा कामगारांच्या तोंडाला पाने पुसणार्या सरकारचा, जनतेवर कर्जाचा डोंगर लादणार्या सरकारचा, जुनी पेन्शनबद्दल खोटी आश्वासने देणार्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा या वेळी विरोधकांनी केल्या. विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, सतेज बंटी पाटील, अभिजीत वंजारी, नितीन राऊत, विकास ठाकरे, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर, प्रतिभा धानोरकर, सचीन आहेर, रमेश कोळगावकर, विलास पोतणीस, सुनिल शिंदे, राजन साळवी, रोहीत पवार, सुनील भुसारा यांच्यासह अन्य विरोधी आमदारांनी अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल, सत्ताधारी आमदार तुपाशी, जनता उपाशी, पिक विमा कंपन्या जोमात, शेतकरी कोमात, अशा आशयाचे फलके हातात घेून सरकारविरुद्ध आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.