बीड (रिपोर्टर)- यावर्षी 2022-23 वर्षासाठी खरीप कृषी पतपुरवठा आराखडा सोळाशे कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून त्याला नुकतीच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मंजुरी दिलेली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षीचा आराखडा 20 टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे.
गेल्यावर्षी सन 2021-22 साठी दोन हजार कोटी रुपयांचा कृषी पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला होता. भाजप सरकारच्या कार्यकाळात शिवाजी महाराज कृषी माफी योजना आणि ठाकरे सरकारच्या काळातील महात्मा फुले कृषी माफी योजना या दोन योजनांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांकडील बँकेचे कर्ज माफ झाले होते. त्यामुळे माफ झालेले शेतकरी पुन्हा बँकेकडे कर्ज मागण्यासाठी येतील आणि त्यांना कर्ज देण्यासाठी राज्य सरकारचे आदेश असल्याने गेल्यावर्षी दोन हजार कोटी खरीप पिक कर्जाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यातील जवळपास 85 ते 90 टक्के कर्जवाटपाचे उद्दिेष्ट दत्तक बँकांनी पुर्ण केले होते. यावर्षी अनेक शेतकरी पाहिजे तसे उत्पन्न न आल्यामुळे बँकेकडून घेतलेले पीक कर्ज अद्यापपर्यंत न भरल्याने यावर्षीच्या कृषी पतपुरवठा आराखड्याला 20 टक्क्यांनी कात्री लावत सोळाशे कोटी रुपयांचा कृषी पतपुरवठा आराखडा जिल्हा अग्रेणी बँकेने तयार केला असून त्याला नुकतीच जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिलेली आहे. यावर्षी ऊस, कापूस, सोयाबीन व इतर पिकांसाीं एक हेक्टरी किती पीक कर्ज द्यायचे यात वाढ करण्यात आलेली आहे मात्र ही वाढ किती ? हे मात्र समजू शकलेले नाही.