बीड रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीड तालुका दौर्यावर असताना काल नाळवंडी नाका परिसरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिक उपस्थित होते मात्र या स्वागताच्या कार्यक्रमावर पेठ बीड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि विनापरवाना स्वागत कार्यक्रम घेतल्याचे कारण पुढे करत मराठा आंदोलक मनोज जरांगे व स्वप्निल गलधर यांच्यासह तब्बल दीडशे ते दोनशे जणांवर कलम 188, 135 बीपी ऍक्ट, 37 (3) (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेड बीड पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मराठा समाजाचा संताप व्यक्त होत असून सदरची कारवाई केवळ राजकीय दबावातून केली जात असल्याचे आरोप होत आहेत
याबाबत अधिक असे की. मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील हे काल बीड तालुक्याच्या दौर्यावर होते. गावागावातील मराठा समाजाशी त्यांनी काल संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्या काही कुटुंबीयांची त्यांनी भेटही घेतली. काल सकाळी बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जरांगे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव नाळवंडी नाका परिसरामध्ये उपस्थित होते. समाज बांधवांनी त्यांचं स्वागत जल्लोषात केले. मात्र रात्री उशिरा जरांगे यांचे स्वागत करणार्या कार्यकर्त्यांवर आणि मराठा समाज बांधवांवर पेठ बीड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला बीड शहरामध्ये जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे. त्या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करून क्रेनच्या सहाय्याने हार घालून कार्यक्रम घेतला म्हणून पोलीस कॉन्स्टेबल डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून आयोजक अशोक जाधव, दयानंद गायकवाड, मनोज गोडसे, गंगाधर काळकुटे, हनुमान मुळीक, स्वप्निल गलधर व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 47 /24 कलम 188, 135 बीपी ऍक्ट, 37 (3) (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, स्वागताच्या कार्यक्रमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे, बीड पोलीस राजकीय दबावातून आणि सूड भावनेने मराठा समाजाच्या तरुणावर गुन्हा दाखल करत असल्याचा आरोप होत आहे.