बीड (रिपोर्टर): यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. राज्यात 11 टक्केच पाण्याचा साठा आहे. जायकवाडीवर अनेक शहरं अवलंबून असून या धरणात 24 टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा धरणात तर 9 टक्के पाणी राहिले आहे. इतर छोट्या-मोठ्या धरणात तुरळक पाणी शिल्लक असल्याने आगामी काळात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.
मराठवाड्यासह राज्यभरातील धरणात पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. पाण्यासाठी नागरीकांचे प्रचंड प्रमाणात हाल होणार आहेत. जायकवाडी धरणात 24 टक्के तर उजणी धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील काही धरणांमध्ये पाच ते सात टकक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. केज तालुक्यातील मांजरा धरणात नऊ टक्के पाणी राहिले. या धरणातून लातूरसह बीडच्या काही भागात पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदाचा भीषण दुष्काळ पाहता नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होणार असल्याचे दिसून येत आहे.