गणेश सावंत -9422742810
अरे! उठा उठा, श्रीमंतांनो! अधिकार्यांनो ! पंडितांनो!
सुशिक्षीतांनो! साधूजणांनो! हाक आली क्रांतीची
गावागावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे!!
मुँह मे राम बगल मे छुरी असलेल्या व्यक्तीचा खरा चेहरा कधी ओळखता येतो? त्याचे बाह्य मन आणि अंतर मन कसे पहायचे? या प्रश्नांचे उत्तर अत्यंत सोपे आहे. आव्हान काळातील वर्तनातून व्यक्तीचा खरा स्वभाव दिसून येतो, असे म्हणतात. सध्याची परिस्थिती ही निवडणुकांची आहे. ते एक आव्हानच. त्या निवडणुकांना जो कोणी सामोरे जातो त्या सर्वांचे अंतरंग, त्यांचा स्वभाव आदींचे खरे दर्शन घडते. असे म्हणता येत असले तरी त्यांच्या मन मंदिरात एक असते आणि वर्तन मात्र दुसरेच केले जाते. त्यामुळे चुकून का होईना, निवडणुकासाठी उभा राहिलेल्यांमधून अनावधानाने असे काही कृत्य, असे काही बोलणे, असे काही वागणे आणि असे काही वर्तन घडू जाते, की ते त्याच्या प्रकृतीचा स्वभाव जगाला सांगून जातो. निवडणूक काळामध्ये होणारे आरोप-प्रत्यारोप असे काही असतात, की त्या आरोप-प्रत्यारोपात तथ्य आहे की नाही? हे शोधण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांचे महत्वाचे मुद्दे आहेत का, हाही प्रश्न उपस्थित होतो. कोण कोणाचे शिक्षणावर भाष्य करते, कोण कोणाला इंग्रजीत भाषण करण्याचे आव्हान देते, कोणाच्या घरातले वाभाडे बाहेर काढले जातात, कोण किती पाण्यात हे सांगितले जाते तर कुठे कुठे सर्रासपणे कमरेचे सोडून थेट डोक्याला बांधले जाते. यातून समाजहित नक्कीच नसते. आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जो प्रचाराचा धुराडा उठवला जातोय, त्या धुराड्यात सर्वसामान्यांचे प्रश्न कुठयत? जेव्हा सर्वसामान्यांच्या
मुलभूत हक्कांची पायमल्ली
होते तेव्हा राजकारण्यांकडे आणि सत्ताकारणाचं गणित मांडणार्यांकडे कर्तव्य-कर्माबरोबर कतृत्वाचा आभाव पहायला मिळतो आणि तोच आभाव 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकारण्यांकडे पहायला मिळत आहे. सत्ताकारणाचं गणित मांडण्यासाठी कोण कुणच्या पक्षात जाईल? कोण कोणाला दगा देईल? हे सांगणे कठीण होऊन बसले. गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो तमाशा उभ्या देशाने पाहिला तो तमाशा नव्हे तर खुल्लम खुल्ला व्याभीचार होता. ‘हमाम मे सब नंगे’ म्हटल्यागत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षातला एकही नेता विचाराशी इमान राखणारा पहायला मिळाला नाही. 2019 च्या निवडणुकांमध्ये ज्या विचारांवर मतदारांनी मतदान केले, ज्या भूमिकेला मतदारांनी आपलेसे केले, तो विचार आणि ती भूमिका एकप्रकारे नेत्यांनी कुणाच्या तरी दावणीला बांधली, नाहीतर कुणाच्या तरी सेजेवर निजवले, त्यामुळे मतदारांच्या मतदानाला किंमत आहे का? त्यांच्या मुलभूत अधिकाराबाबत कोणी गांभीर्याने पहातय का? सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेच्या पटलावर आणि लोकसभेच्या मंदिरात कुणी मांडतय का? हे प्रश्न पडले. आज पुन्हा 2024 ची लोकसभा निवडणूक लागली, लोकांच्या मुलभूत प्रश्नांपेक्षा जातीला अधिक महत्व दिलं गेलं. धर्मावर भाष्य होत गेले, कुठल्या धर्मातले लोक किती लेकरं पैदा करतात, हेही सांगितले. बरे हे सांगणारे आपल्या मायबापाचे सहावे अपत्य! कुठला धर्म किंवा कुठली जात किती अपत्य जन्माला घालतो, हा काही देशाचा अजेंडा असू शकत नाही. मात्र या निवडणुकीमध्ये तो एक अजेंडा मानला गेला. बेरोजगारीवर भाष्य नाही, सिंचनावर बोलणे नाही, शेतकर्यांच्या आत्महत्येवर आणि महागाईवर ब्र शब्द नाही. महाग होत चाललेल्या शिक्षणाशी यांना देणंघेणं नाही. आरोग्य सेवेवर बोलायला कोणी तयार नाही. मात्र जात आणि धर्म राजकारण्यांना केवळ निवडणुकांमध्ये महत्वाचा वाटतो. म्हणून राजकारण्यांच्या या वागण्यामुळे मतदारराजा उदास वाटतो. म्हणून तर
मताचा टक्का घसरतो
होय, देशामध्ये दोन टप्प्यात मतदान झाले, कुठे 52 टक्के, कुठे 58 टक्के तर कुठे 60 टक्के, म्हणजे 40 ते 50 टक्के देशवासी मतदानालाच येत नाहीत. ज्या मतदानाकडे सर्वश्रेष्ठ दान म्हणून पाहिले जातं, ज्याच्याकडे लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पाहण्यात येते त्याच मतदानाकडे दुर्लक्ष होतय. राजकारणी लोकांच्या मताचा अनादार करत आले आहेत. ज्या भूमिकेला अथवा ज्या विचाराला मतदान दिले जाते, ती भूमिका आणि तो विचार निवडून आल्यानंतर सर्रासपणे विकला जातो. म्हणजेच मतदाराला बोली लावून बाजारात विकण्याचा तो प्रकार असतो आणि हीच चीड आज मतदारांमध्ये पहायला मिळते, म्हणून लोक मतदानाला जात नसावेत. जिथे रस्ते, नाली, पाणी, रोटी-कपडा-मकान, सिंचन-शिक्षण-आरोग्य हे विषय चर्चेला यायला हवेत, तिथे जात-पात-दर्म गोत्र, मासे, पाहिले जातात आणि त्या आधारावर गावागावात प्रचार केला जातो. यातून सत्ताकारण करणारे लोकांच्या मुलभूत गरजा तर पुर्ण करत नाहीत मात्र गावगाड्यात एकोप्याने राहणार्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल क्लेष निर्माण करतात, एकतर सत्ताकारणाच्या शेजेवर निजणार्या या पुढार्यांकडून
मतदारांचा मानसिक बलात्कार
सातत्याने केला जातो. अशा वेळी मतदार मतदानासारख्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो अन् आपल्या मताचं शील वाचवतो. परंतु आम्ही म्हणू, मतदारांच्या मानसिकतेवर बलात्कार करणार्या सत्ताकारण लोभी नराधमांना नागवं करण्याची खरी वेळ ही निवडणूक आहे. बहाद्दर मतदारांनी गावगाडा हाकणार्या विचारशील माणसांनी निवडणुकीच्या काळामध्ये जो रोटी-कपडा-मकान, रस्ते-नाली, पाणी, वीज, शिक्षण, सिंचन, आर्थिक धोरण, शेतीमालाला भाव, आरोग्य यावर जो भाष्य करेल, यावर जो बोलेल त्यावरच आम्ही मतदान करणार, अशा पद्धतीचा निर्धार करायला हवा. मतदानाला न जाणे, हा निर्णय म्हणजे सत्ताकारणाच्या वासनेला अधिक बळ देणे होय. मग तो कुणच्याही पक्षाचा असो अथवा कुणच्याही जातीचा असो. ‘जो मानव के हित की बात करेंगा वही देश पे राज करेंगा’ या धोरणात मतदारराजाने पुढार्यांना सरळ करायला हवे. मात्र जो अधिकार आपला आहे, आपण या देशाचे मालक आहोत, हेच जेव्हा सर्वसामान्य जनतेला माहित नसतं ना तेव्हा त्यांच्या खर्या अधिकाराकडे दुर्लक्ष होतं आणि जात-धर्माच्या अफुची गावागावात शेती केली जाते.
फेका ती जात आणि धर्म
मानवता हेच आपुले कर्म
होय, आम्ही छातीठोकपणे सांगतोय, छत्रपती शिवरायांनी सर्वास पोटास लावणे आहे, हा मुलमंत्र जपत सर्व जात-पात-धर्म-पंथाच्या लोकांना केवळ मावळा म्हणून पाहितलं. जो महाराष्ट्रात अथवा महाराष्ट्राच्या बाहेर राहतो, जिथं स्वराज्य तिथच सुराज्य हेही महाराजांनी सांगितलं. जात आणि धर्म आपल्या घरात असावा, स्वत:च्या धर्माचा नक्कीच गर्व बाळगावा मात्र अन्य धर्माचा अपमान करू नये, हे जर आम्हाला महाराजांनी सांगितलं आमच्या साधू-संतांनीही एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत म्हणत माणूस धर्माला अधिक महत्व दिलं. मग आज गावागावात जात-पात-धर्म-पंथावर का भाष्य होतय? सत्ताकारणाच्या लालसेत असलेल्या पुढार्यांच्या काव्यात येऊ नका, सद्सद्विवेक बुद्धीने जे धर्मांध आहेत, देशामध्ये धर्मामध्ये वाद लावत आहेत, अशांबद्दल तिरस्कार निर्माण व्हायलाच हवा. जे लोक सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजांकडे पाहतात, शिक्षण, आरोग्य शिक्षण या महत्वाच्या प्रश्नावर भाष्य करतात अशा लोकांना कर्या अर्ताने विजयी करणं हे आद्य कर्तव्य. परंतु पन्नास ते साठ टक्के भारतीय मतदान करत नसतील तर पुन्हा पुन्हा मतदारांच्या मतांवर बलात्कार होईल. त्यांच्या इच्छा-अपेक्षा, आकांक्षा सत्ताकारणाच्या शेजेवर निजवल्या जातील. त्यांचे कपडे काढले जातील. हे होऊ द्यायचं नसेल आणि पुन्हा पुन्हा या देशावर अखंड भारत आणि अखंड भारताची सार्वभौम लोकशाही टिकवायची असेल तर उठा….जागे व्हा… जेव्हा केव्हा मतदानाचा टप्पा असेल तेव्हा तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी नव्हेन व्हे तर प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला अधिकार गाजवावा. कारण तुम्ही या देशाचे मालक आहात.