कुठं काय बोलावं आणि काय बोलू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी संविधानिक पदावर असणार्या व्यक्तीने योग्य तेच बोललं पाहिजे. बोलण्यातून आपली वैचारीक उंची कळत असते. वाही बोलणारांना तितकी किंमत नसते. राजकारणात सर्रासपणे खोटं बोलून पुढे जाण्याचं काम जोमात सुरु आहे. मतासाठी एकमेकांचे उणे, दुणे काढले जातात. मात्र जाती, पातीच्या राजकारणाचा शिरकाव राजकारणात झाल्याने राजकारण नासत चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील एका प्रचार सभेत म्हटले आहे की, काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर देशातील सर्व संपत्ती ते मुस्लिमांकडे वळवतील तसेच तुमच्या हक्काची कमाई जास्त मुले असणारांना वाटतील, हे विधान जगातील सर्वात मोठया लोकशाही असणार्या भारताच्या पंतप्रधांनाचे आहे. या विधानाबाबत काय बोलावे हेच कळत नाही? एखाद्या सडकछाप पुढार्याने असलं विधान केलं असतं तर त्याची कुणी दखल घेतली नसते, पण पंतप्रधानांनी असं बोलावं? या विधानाच्या बाबतीत कुणीच समर्थन करु शकत नाही, हे विधान कोणालाच न पटणारं आहे. विकासाची निवडणुक जाती, धर्मावर येवून पोहचली. हिंदू,मुस्लिम, जात,पात, धर्म, जास्तीचे मुलं असे विषय निवडणुकीत वापरले जात असल्याने आपली वाटचाल कुणीकडे आहे? कुठल्याही गोष्टीची तर्कावर चर्चा व्ंहायला हवी. त्यात खरं किती आणि खोटं किती याचं विश्लेषण झालं पाहिजे. एखाद्याला बदनाम करण्यासाठी काहीही बोलता कामा नये!
काँग्रेसने काय केलं? हा देश धर्मनिरपेक्ष आहे. आपली घटना सर्वांना समान हक्क देत आहे. देशात कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. देशात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ते पुर्वीपासून आहेत. स्वातंत्र्यामध्ये सर्वांचं योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस पक्ष सत्तेत राहिला. या पक्षाची विचारधार ही सर्वसमावेशक होती. त्यामुळे काँग्रेसकडे लोकांचा कल जास्त होता. काँग्रेसमध्ये विविध विचाराचे गट होते. कॉग्रेंसमधून फुटून काहींनी वेगवेगळी भुमिका घेतलेली आहे. काँग्रेसचा हक्काचा मतदार म्हणुन मुस्लिमाकडे पाहितले जाते. वर्षानुवर्ष मुस्लिम समाज काँग्रेसला मतदान करत आला. त्या बदल्यात काँग्रेसने असं काही विशेष दिलं नाही. दिलं असतं तर आज मुस्लिम समाज मागास राहिला नसता. कुठल्या तरी एखाद्या नेत्याला मंत्रीपद दिलं म्हणजे मुस्लिमांचा विकास झाला असं होत नाही. काँग्रेसची भुमिका स्वार्थीच होती. मतदानापुरतीच होती. मात्र भाजपा सारख्या व इतर विरोधी पक्षांनी त्याचे नेहमीच भांडवल केलं. जेव्हा भाजपा सत्तेत नव्हती. तेव्हा भाजपाने काँग्रेस व मुस्लिमांवर वाट्टेल ते आरोप केले. मुस्लिमांना कोणत्या ना कोणत्या कारणावरुन बदनाम केलं गेलं. दहशतवादाचा मुद्दा, परकीय मुद्दा असेल, किंवा काही धार्मिक बाबी असतील त्यावर प्रचंड राजकारण केलं गेलं. काँग्रेस मुस्लिमांचे लांगून चालन करत असल्याचा हा एक प्रमुख आरोप असायचा. कॉग्रेंसने मुस्लिमांचे लांगून चालन केले असते आज गरीबीत मुस्लिम समाज खितपत पडला नसता. काँग्रेसने मुस्लिमांचे नेतृत्व उभा राहू दिले नाही. विकासाची बात तर लांबच आहे. जास्त मुलाचं राजकारण! देशाची लोकसंख्या जागात सर्वाधिक आहे. लोकसंख्या वाढीला वेगवेगळे कारणं आहे. काही कर्मट आणि जातीय लोकांनी लोकसंख्या वाढीला मुस्लिमांना तितकचं दोषी ठरवलं आहे. त्यांचीच लोकसंख्या वाढली आहे अशी काहींची बाष्कळ आणि अभ्यास नसलेली मते असतात. लोकसंख्या वाढीचा ज्यांना अभ्यास आहे. ती मंडळी मात्र योग्य तेच मत व्यक्त करत असतात. गत वेळी जी जनगणना झाली. त्यात अनेक बाबी आढळून आल्या. लोकसंख्या फक्त मुस्लिमांचीच वाढली असं नाही. हिंदूची सुध्दा वाढलेली आहे. ज्या ठिकाणी शिक्षीतपणा जास्त आहे. अशा ठिकाणी सगळ्याच धर्माची लोकसंख्या कमी झालेली आहे. ज्या ठिकाणी शिक्षणाचा टक्का कमी आहे. तेथे सर्वच जाती, धर्माची लोकसंख्या वाढलेली आहे. केरळ हे शिक्षीत राज्य, त्या राज्यात मुस्लिमांची लोकसंख्या कमी झालेली आढळून आली. उत्तरप्रदेश, बिहार सारख्या मागास राज्यात मात्र हिंदू आणि मुस्लिम या दोघांचीही संख्या वाढलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. या कार्यकाळात अजुन ही देशाचा तितका विकास झाला नाही. जितका व्हायला हवा होता. भटका समाज आजही गावावर स्थिर नाही, त्यांना घरदार नाही. देशात उत्पन्न कमी असलेला समाज जास्त आहे. ज्या, ज्या ठिकाणी दारिद्रय जास्त आहे. त्या त्या ठिकाणी लोकसंख्येचा आलेख जास्त आहे, मग तो कोणत्या ही जाती, धर्माचा का असेना? त्यासाठी विकास हा मुद्दा महत्वाचा आहे. विकास आणि शिक्षीतपणा वाढला की, लोकसंख्येला आपोआप आळा बसू शकतो. मताच्या गठ्ठ्यासाठी उगीच एखाद्या जाती,धर्माला टार्गेट करण्याचं काम करता कामा नये. काय केलं ते सांगा? ही निवडणुक भाजपासाठी तितकी सोपी नाही. भाजपाने 400 पार ची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी कुठल्या धुंदीत केली हे त्यांनाच माहित? दहा वर्षी पुर्वी मोदी यांनी जे काही आश्वासने दिली होती. त्यातील किती आश्वासने त्यांनी पुर्ण केले? पुर्ण केले असते तर आज त्यांना जाती, धर्माचा आधार घ्यावा लागला नसता. रोजगाराचं काय झालं? वर्षाला दोन कोटी रोजगार दिले का? गॅसचा दर पुर्वी काय होता आज काय आहे? गॅसचे दर का वाढले? याचं स्पष्टीकरण ते का देत नाहीत? 2024 पर्यत देशातील घरकूलाचं टार्गेट पुर्ण करु असं आश्वासन होतं. त्याचं काय झालं? चुकीच्या जीएसटीमुळे सर्वसामान्य परेशान आहेत. शेतकर्यांना खतासह इतर शेतीच्या औजारांना 18 टक्कयापर्यंत जीएसटी भरावा लागतो. चार महिन्याला केंद्र सरकार शेतकर्यांना दोन हजार रुपये देत आहे, पण त्या बदल्यात, जीएसटीच्या माध्यमातून किती पैसे वसूल केले जातात याचा विचार केला जात नाही. ज्या, ज्या वेळी शेतकर्यांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन केले, ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. शेतकर्यांना दोषी ठरवून त्याला नक्षलवादी म्हणण्या पर्यंत भाजपावाल्यांची मजल गेली. शेती मालाला भाव नाही. शेतकरी परेशान आहे. त्याला दिलासा दिला जात नाही. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा वादा होता त्याचं काय झालं हे सगळे प्रमुख मुद्दे असतांना या सगळ्या मुद्याला बाजुला ठेवून हिंदू, मुस्लिमांची राजनिती करुन प्रचारात जातीय मुद्दा उकरुन काढला जातो, म्हणजे दहा वर्षाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच जातीय मुद्दयांना हवा दिली जात आहे. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जास्तीचे मुले असणार्याकडे संपत्ती वळवली जाईल असा बालीश प्रश्न पंतप्रधांनांनी उपस्थित केला. त्यावर खा. संजय राऊत यांनी चांगलं उत्तर दिलं आहे. दहा वर्षात कमी मुलं असणार्यांना मोदी यांनी संपत्तीचं वाटप का नाही केलं? 2014 साली मोदी यांचं सबका साथ, सब का विकास हे घोष वाक्य होतं. त्या वाक्याचा तर त्यांना पुर्णंत: विसरच पडला. लोक हुशार झालेत. लोकांना चांगलं माहित आहे. कोण कुठल्या मुद्दयांना विनाकारण हवा भरत आहे. भाजपाची जी हवा 2014 साली होती. आज ती राहिली नाही. त्यामुळे भाजपावाले बिथरल्यासारखे झाले. दहा वर्षात खुप काही करण्यासारखं होतं. फक्त बोलून आणि निवडणुकीत खोटे आश्वासने देवून विकास होत नसतो. प्रत्यक्षात विकास करुन दाखवावा लागतो. एकवेळ विकास कमी झाला हरकत नाही पण दोन समाजातील मने दुभंगण्याचं काम जेव्हा सत्ताधारीच करत असतील तर त्यावेळी लोक आपल्या मताची काय किंमत आहे हे मतदानयंत्रातून दाखवून देत असतात. परिवर्तन हे फिरत्या चक्रासारखं असतं. लोकांच्या विश्वासाला सत्ताधारी पात्र ठरले नाही तर लोक सत्तेला पालथं करत असतात. 2014 च्या निवडणुकीत भाजपाला फक्त एकाच जाती, धर्माचे मते पडली नव्हती, विकासासाठी सर्वच जाती धर्माच्या लोकांनी मते टाकली होती, याचा विसर कदाचीत भाजपाला पडला असावा. या निवडणुकीत भाजपाला मते मिळवण्यासाठी व आपली आबु्र झाकण्यासाठी जाती, धर्माचा आधार घ्यावा लागतो ही मोठीं शोकांतिका म्हणावी लागेल.