गणेश सावंत –
पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे. ‘वारी’ म्हणजेपंढरीचीच! तिरुपती, काशी या तीर्थक्षेत्रांच्या भेटींना वारी म्हटले जात नाही. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे.आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडीसमवेत गात, नाचत, गर्जत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद, जीवन धन्य करणारा अनुभव आहे.
पंढरपुरात कमरेवर हात ठेऊन विटेवर उभा असलेल्या आपल्या विठ्ठलासह रुख्मिणी माईला भेटण्याची ओढ घेऊन उभ्या महाराष्ट्राचा वारकरी माऊली महाराज आणि संत तुकोबांच्या पालखी सोबत पंढरपूरच्या दिशेने निघाले. आज या संतांच्या पालख्या दिवेघाटातून मार्गस्थ झाल्या त्या वेळचे हे नयनरम्य छायाचित्र

आषाढी एकादशीसाठी मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्यांनी पंढरीची वाट धरली आहे. लाडक्या विठुरायाच्या भेटीत वारकरी मजल-दरमजल करत पाऊले टाकत आहेत.

देवाच्या आळंदीत माऊली महाराजांच्या मंदिराचा कळस हलला अन् संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दोन दिवसांपूर्वी आळंदीतून प्रस्थान झाले .पालखीने आज अवघड असा दिवेघाट पार केला. दिवे घाट पार करताना घाटाने जणू हिरवा शालू नेसल्यासारखं दिसत होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाट पार करतानाची विहंगम दृश्य विविध कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आषाढी कार्तिकाचा सोहळा । चला जाऊ,पाहू डोळा ॥
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग चरण अवघ्या मराठी भाविक मनाचे मनोगत आहे. पंढरीची वारी करावी असे वाटणे हेच मराठीपण आहे, मराठी मनाची हीच नेमकी व यथार्थ ओळख आहे. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे, तसेच पारमार्थिक ऐश्वर्य आहे.
पंढरीच्या या वारीला प्राचीन इतिहास व परंपरा आहे. पंढरीच्या वारीचा उल्लेख असलेले चौथ्या-पाचव्या शतकातील ताम्रपट उपलब्ध आहेत. वारीचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे. त्यानंतर होयसळ सम्राटांच्या काळातील शके 1159 (इ.स.1237)चा श्ािलालेख आपणास वारीची प्राचीनता सांगतो.ताम्रपट, शिलालेख यानंतर संत ज्ञानदेवकृत अभंगातून कागदोपत्री ठोस आधार मिळतो. संत ज्ञानदेवांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती. या सर्व ठोस पुराव्यांवरून पंढरीची वारी गेली हजार-बाराशे वर्षे अखंड, अव्याहतपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते. आज ही तेवढाच उत्साह वारकऱ्यात दिसतो तेव्हा विठ्ठल नामाचा महिमा सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध होत

‘माझी जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ॥’
असा संत ज्ञानदेवांचा एक अभंग प्रसिध्द आहे. पंढरीच्या वारीची आवड ही आपल्या जिवीची आवड आहे असे सांगून, ‘भेटेन माहेरा आपुलिया।’ म्हणत ज्ञानदेव पंढरीला आपले ‘माहेर’ संबोधतात. ‘माहेर’ या विशेषणातच पंढरीचे अवघे माहात्म्य सामावलेले आहे.
पंढरी सोडून देशातील अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्राला कोणाही संत-महात्म्यांनी ‘माहेर’ म्हटलेले नाही, हेच पंढरीचे वैशिष्ठ आहे. पंढरी माहेर आणि भक्तवत्सल पंढरीनाथ-विठोबा ही संतांची ‘विठूमाउली’! तशी वारकऱ्यांची, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांच्या, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, दिंन दुबळ्याची राजाची रंकाची महिलांची मुलांची आबालवृदांची ती विठुमऊलीच

म्हणूनच राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक आणि फोटोग्रार्फर्स आज दिवेघाटात माऊलींच्या पालखीची वाट पाहात होते. पांडुरंग हरी विठ्ठुल श्री ज्ञानदेव तुकाराम… असा जयघोष करत अवघा दिवे घाट आज दुमदुमला होता.

पंढरीची वारी एकटयाने नव्हे, तर सामूहिकपणे करण्याची वारी आहे. इथे वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक भक्तीला विशेष महत्त्व आहे. आणि हि वारी कशी करायची? तर अभंग गात गात, खेळीमेळीने, आनंदाने नाचत.
सोपे वर्म आम्हां सांगीतले संती ।
टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा ।
हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी ही पायी वाटचाल करतात. भजन गात, गर्जत, नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंडया म्हणजे चैतन्याचा प्रवाह. या दिंडयांचेर् दशनही चित्त प्रसन्न करणारे. खुद्द संत ज्ञानदेवांनाही वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन करण्याचा मोह अनावर झालेला दिसतो. ज्ञानदेव म्हणतात,
कुंचे पताकांचे भार । आले वैष्णव डिंगर ।
भेणे पळती यम किंकर । नामे अंबर गर्जतसे ॥
अजि म्या देखिली पंढरी । नाचताती वारकरी ।
भार पताकांचे करी । भीमातीरी आनंद ॥
संत ज्ञानदेवांप्रमाणेच संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखोबा, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, संत बहिणाबाई यांचे पंढरीच्या वारीचे – वारकरी दिंडीचे वर्णन करणारे अनेक अभंग उपलब्ध आहेत. असे संत साहित्याचे उपासक व अभ्यासक विद्याधर ताठे सांगतात आजच्या तरुणाईला वारी समजावी म्हणून रिपोर्टरचा हा छायाचित्रासह विठ्ठल नामाचा गजर

आज 22 जून रोजी पालखी सासवडचा दिवेघाट पार करुन उद्या सासवडला पोहोचेल, 23 जूनचा पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार असून 24 जून सासवड ते जेजुरी असा पालखीचा प्रवास असणार आहे. जेजुरी नगरीत पालखीवर भंडाऱ्याची उधळण होणार आहे.संत तुकाराम महाराजांची पालखी देहुतून तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरीच्या दिशेने निघाल्या असून इतरही मानाच्या पालख्या रवाना झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या पालख्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दिवे घाटात दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखीच्या रथासोबत पाऊले पंढरीची वाट चालत होती.मुखी पांडुरंगाचा जयघोष, हाती टाळ, मृदुंग, डोक्यावर तुळस आणि विठ्ठलभक्तीचा आनंद लुटत वारकरी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. दिवे घाटीतील पालखीची दृश्य मनमोहक आणि डोळे दिपवणारी आहेत.

संतांच्या शब्दात सांगायचे झाले तर याची देही याची डोळा, पहिला मी सोहळा अस इथं प्रत्येक वाचकाला वाटेल











