बीड (रिपोर्टर) विनायक मेटे यांच्या अपघातानंतर दोन तासांत काय घडलं? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. बीडमध्ये माध्यमाने ज्योती मेटे यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर काय घडलं याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
ज्योती मेटे बोलताना म्हणाल्या की, साहेबांशी बोलणं परवा झालं. त्यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट रोजी बैठक असल्याचं सांगितलं. मी त्यांना रात्री प्रवास करु नका असं सांगितलं. त्यांनी मी हेदेखील सांगितलं होतं की, पुण्यात मुक्काम करा आणि पहाटे निघा. ते आमचं शेवटचं बोलणं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शेवटची भेट आमची गुरुवारी झाली. मी नाशिकहून मुंबईला गेले आणि त्यांना मुंबईहून बीडला यायचं होतं. त्यावेळी आम्ही नवी मुंबईपर्यंत एकत्र गेलो. त्यानंतर तिथून मी परत आले.
मी तिथे गेल्याबरोबर त्यांची पल्स पाहिली. तिथे डॉक्टरही होते. मी त्यांना सांगितलं, मी त्यांची पत्नी आहे आणि डॉक्टरही आहे. त्यांनी मला परवानगी दिली. मी पल्स चेक केली, त्यानंतर मानेची पल्स चेक केली. ईसीजी समोर फ्लॅट दिसत होता. त्यावेळी मी माझ्या भावाला सांगितलं, हे थोडा वेळात गेलेले नाहीत. अपघातानंतरच्या वेळाची चौकशी होणं गरजेचं आहे., असं त्या म्हणाल्या.
लग्न झाल्यापासून मी साहेबांचं काम पाहतेय. समाज, मग तो कोणताही असो. खासकरुन मराठा समाज त्यांच्या अजेंड्यावर होताच. थोडक्यात सांगायचं तर त्यांचा समाजकार्याचा पिंड होता आणि त्या समाजकारणानंच त्यांचा बळी घेतला., असं त्या म्हणाल्या. त्यांच्या जाण्यानं आम्ही आणि अख्खा शिवसंग्राम परिवार पोरका झाला आहे. मी माझ्या परिनं शिवसंग्राम परिवाराला हमी देईन की, माझ्या परिनं मी त्यांची काळजी घेईन, असंही त्या म्हणाल्या.