आम्ही मढें झाकले
रोज सरणावर गेले
गणेश सावंत/9422742810
शिर्षक वाचून गोंधळात पडण्याची गरज नाही. इथे त्या जगाच्या पोशिंद्याची व्यथा पुन्हा पुन्हा मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जो देश कृषीप्रधान म्हणून जगाच्या पाठीवर नावाजला जातो, जो देश कधीकाळी सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जात होता त्या देशात आज शेतकर्यांची नेमकी स्थिती काय? या प्रश्नाचं एखाद अबोध बालकही उत्तर देईल. कारण कुठल्याही शेतकर्याच्या घराकडे, दाराकडे आणि शेताकडे पाहिल्यानंतर अठराविश्व दारिद्रयाशिवाय त्याच्या पदरी काहीच दिसणार नाही. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही शेतकर्यांचे हे हाल नेमके कोणी केले? याचं उत्तरही आम्ही म्हणू तसे तो अबोध बालक देईल आणि आजच्या व्यवस्थेकडे, सरकारकडे बोट दाखवेल, मग ते भाजपाचं सरकार असो अथवा काँग्रेसचं सरकार असो. या सरकारांनी केवळ शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या खुजं कसं ठेवता येईल याकडेच लक्ष दिलं. प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या या बारा वर्षाच्या कालखंडात शेतकरी अक्षरश: नागवा झाला. आज तोच
शेतकरी वनवासी
असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. घरात खायला अन्न-धान्य आहे की नाही, मुलाच्या शिक्षणासाठी पैसा आडका आहे की नाही, वृद्ध माता-पित्यांसह अर्धांग्निच्या दुखण्यासाठी, त्यांच्यावरील उपचारासाठी धन आहे की नाही, याचा विचार न करता शेतकरी राबराब राबत आपल्या कर्तव्याला अनन्यसाधारण महत्व देतो. जगद्गुरू संत तुकोबांनी ज्या पद्धतीने या अभंगात म्हटलं….
मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहो ॥1॥
तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥
ओटीच्या परिस मुठीच्या तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥2॥
नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥3॥
तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥4॥
अर्थ
कुणबी लोकांची जात पेरणी विषयी इतकी दक्ष असते कि त्या वेळी घरात कोणी मेलेले असेल, तरी त्याचे मढे झाकून ठेवतात आणि पेरणी करायला धावतात. त्याच्या प्रमाणे मानवाने हा जन्म दुर्लभ आहे असे जाणून, इतर सर्व गोष्टी बाजूला ठेऊन आपले हित ज्यात आहे, असा परमार्थ करण्या विषयी तत्पर असावे. पेरणी करण्या करता ओटीमध्ये बी घेऊन त्यातील मुटभर दाने शेतकरी पाभरीच्या वर ठेवतो. ते जमिनित पडतात तेंव्हा हातील दाण्यांपेक्षा ते अनेक पटीने वाढतात. त्याच प्रमाणे आपले हित वाढेल याचा विचार कर. उशीर करू नको. कारण काळ केंव्हा घाला घालील, याचा नेम नाही. यातून कर्तव्य, निष्ठता सांगितली गेली आणि त्या कर्तव्याचं भान राखत आजही शेतकरी घामाचं रक्त ओकत शेतीमध्ये राबराब राबतो, पैसा खर्च करतो, पिकही आणतो. शेवटी
शेतकर्याच्या हाती काय?
शेतकर्याच्या पिकाला, शेतकर्याच्या धानाला कमी भाव, आयात-निर्यातीचे धोरण, सरशेवटी महागडे बी-बियाणे, मेहनत करून उभ्या केलेल्या पिकातून मुद्दलही हाती येत नाही. त्यात अस्मानी संकट हातेयाचं नव्हतं कून सोडते, अशावेळी हाताश झालेला शेतकरी एकतर शेताच्या माळरानावर गळफास घेतो नाहीतर व्यवस्थेने महाग करून सोडलेल्या विषाच्या बाटलीतल्या औषधाचे दोन घोट घेत आपले जीवन संपवतो. म्हणून आम्ही म्हटलं, आम्ही मढे झाकले, रोज सरणावर झोपले, तीच स्थिती आज आम्हाला शेतकर्यांची म्हणावी लागेल. आम्ही कुठे धन-दांडगे नव्हे, आमचे मायबापही शेतातच राबतात. मात्र आज पाच दशके झाली त्यांच्या घामाची किंमत म्हणून आम्हाला उभा केल्या व्यतिरिक्त त्यांना काहीच उभा करता आलं नाही. ही स्थिती अखंड शेतकर्यांची आहे. आणि अशास्थितीत एकीकडे वेतनावर वेतने वाढवली जात असताना दुसरीकडे शेतीमालाचे भाव वाढले जात नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी ज्या वस्तूंचे भाव होते त्या वस्तूंचे आज 70 ते 300 पट वाढले, शेती मालाचे भाव केवळ 30 ते 50 ते 70 टक्क्यात वाढले. एकीकडे हा भेदभाव असताना दुसरीकडे
मोदी सरकारचं धोरण
पुन्हा एकदा या देशातल्या शेतकर्यांना खड्ड्यात घालणारं ठरणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अच्छे दिन बरोबर अनेक स्वप्नांच्या शेजा सजवतात, प्रत्यक्षात मात्र धनदांडग्यांना फायदा होईल एवढेच पाहतात. अमेरिका-भारत ट्रेड डील हा विषय आज घराघरात पोहचलाय. जेव्हा अमेरिका टेरीफ वाढवत होतं तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत खलनायक म्हणून भारतासमोर प्रतिमा होत होती नव्हे ती आजही आहे, अशा स्थितीत या खलनायकाचा माज उतरवण्यापेक्षा तिथे अॅडजेस्टमेंटचे राजकारण, नांगी टाकण्याचे धोरण भाजप सरकारने आखले. पाकिस्तानचे युद्ध थांबल्याचे ट्रम्पने सांगितले आणि आता भारत आणि अमेरिकेची ट्रेड डील झाल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. मग हा देश ट्रम्प चालवतात की, नरेंद्र मोदी? हा प्रश्न विचारावा लागेल. चार महिने रखडलेला अमेरिकी व्यापार करार अचानकपणे ट्रम्पच्या एका ट्विटने फायनल झाल्याचे सिद्ध होते. अमेरिकेचे कृषीमंत्री हाबूक ठोकून आणि छाती ठोकत हा करार अमेरिकेसाठी किती चांगला आहे हे सांगतात. भाजप सरकारमधला एकही मंत्री डोनाल्ड ट्रम्पने केलेल्या घोषणेबाबत, कराराबाबत चांगला की वाईट हे सांगण्याचे धाडस ठेवत नाहीत. ती ट्रेड डील काय?
गेल्या काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्क्यांपेक्षा अधिक टेरीफ लावले. ते टेरीफ आता उठवण्यात आले आणि भारतावर 18 टक्क्यांचं टेरीफ लावल्याची घोषणा केली. आकड्यामध्ये 50 टक्क्यांचं टेरीफ 18 टक्क्यांवर आल्याचे म्हणत भाजपाच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली. परंतु या नुमाइंद्यांना हे माहित नाही याआधी टेरीफ किती टक्के होते हे माहित आहे का? असो त्याकडे दुर्लक्ष करा, अमेरिका भारतावर 18 टक्के टेरीफ लावतो, मग भारताचं अमेरिकेवर किती टक्के टेरीफ? तुम्हाला आश्चर्य वाटेल, शेतीमालाबाबत भारताचे अमेरिकेवर शुन्य टक्के टेरीफ आहे. भारत यापुढे अमेरिकेकडून 500 कोटी टॉलरची ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादने, कोळसा इत्यादी गोष्टींची खरेदी वाढवणार. त्यामुळे मित्र देशांबरोबरचे भारताचे संबंध जे की व्यापारी कमी होणार. नव्हे नव्हे तर भारतीय बाजारावर यामुळे अमेरिकेचे नियंत्रण राहणार. भारत ज्या रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत होता आता नव्या करारानुसार अमेरिका व अन्य ठिकाणावरून तेल खरेदी करताना तज्ञांच्या मते भारताला 80 हजार कोटींचा फटका बसणार. या करारामध्ये केवळ गुजरातच्या हिरे व्यापार्यांचा फायदा झाला आहे. निर्यात होणार्या कच्च्या हिर्यावर, रंगीत रत्नावर अमेरिका शून्य टक्के कर लावणार. मात्र कामगार, शेतकरी, लहान व्यापारी हे अठरा टक्क्यांच्या ओझ्याखाली असणार. या नव्या ट्रेड डीलमुळे अमेरिकी शेतकर्यांची जी उत्पादने आहेत मग धान्य, डाळ, चीत, तूप, फळ, फुले शुन्य टक्के करामुळे भारतात ती आपोआप कमी दरात विकली जाणार आणि त्याचा
फटका भारतीय शेतकर्यांना
बसणार हे त्रिवार सत्य नाकारता येणार नाही. हे झालं. शेतकरी विरोधी धोरणाचं, सत्ताधिशांचं कट-कारस्थान. एकीकडे आम्ही शेतकर्यांची गर्जमाफी करतो, त्यांना अनुदान देतो, अशा गमज्या मारत रडतात साले, म्हणणार्या भाजपवासियांकडून शेतकर्यांनी आणखी अपेक्षा त्या काय कराव्यात. दुर्दैव याचं वाटतं, भारत सरकार एका हाताने मदत केल्याचं दाखवतं आणि दुसर्या हाताने खत-बी-बियाणांच्या भावात प्रचंड वाढ कून शेतकर्यांचा खिसा कापला जातो. या उलट अमेरिकेमध्ये शेतकर्यांना वार्षिक साठ ते सत्तर हजार डॉलरपर्यंत अनुदान दिलं जातं. त्यामुळे तिथला शेतकरी सातत्याने सुखात असतो आणि इथे आम्ही कृषीप्रधान असताना जगाचे पोशिंदे मानले जात असताना केवळ व्यवस्थेच्या धोरणांमुळे इथला शेतकरी सरणावर जातो.








