बीड (रिपोर्टर) ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने जिल्हाभरातील धरणात पाण्याचा साठा म्हणावा तितका जमा झालेला नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना दिलासा मिळाला असला तरी धरणात अजूनही पाण्याचा साठा वाढलेला नाही. सद्यस्थितीत 126 धरणात 43 टक्के इतकाच पाण्याचा साठा जमा झालेला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाभरातील धरणं पुर्णत: भरत आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिला होता. त्यामुळे शेती पिकांचे काही प्रमाणात नुकसान झालेआहे. सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात झालीय, तीन-चार दिवसांपासून जिल्हाभरात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक नद्या-नाल्यांना पाणी आले आहे. बीड जिल्ह्यातील 126 धरणात 43 टक्केच पाण्याचा साठा जमा झाला आहे. धरणे पुर्ण भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
जिल्ह्यातल्या चार मंडळात झाली अतिवृष्टी
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला. यात चार मंडलात अतिवृष्टी झाली. गेवराई तालुक्यातील रेवकी मंडळात 65.8, तलवाड्यात 90.3, धोंडराईत 79.8, वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे 81.8 टक्के इतका पाऊस झाला.