बीड जिल्ह्यात यावर्षी कापसाचा पेरा वाढल्याने किमान 45 लाख क्विंटल उत्पादन निघेल
बीड (रिपोर्टर)ः-प्रत्येक वर्षी बीड जिल्ह्यात दसर्यापासूनच कापूस खरेदीला सुरूवात होते. यावर्षी मात्र दिवाळी उलटून गेली तरी अपवाद सोडला तर खाजगी जिनींग वाल्यांनी कापूस खरेदी सुरू केलेली नाही. गेल्यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी बीड जिल्हयामध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी केली. अंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे उतरलेले भाव लक्षात घेता खाजगी जिनींग वाल्यांनी कापसाला भाव देण्यास हात आकडता घेतला आहे. एवढ्या कमी भावात कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस विक्री करणार नाही अशी शासनता खाजगी जिनींग वाल्यांना आल्याने अद्याप कापूस खरेदी बीड जिल्ह्यात तुरळक अपवाद सोडता कुठेही सुरू नाही. त्यामुळे ज्यांनी सावकारांकडून किंवा हात उसनवारीवर लोकांकडून पैसे घेवून बी-बीयाणे, खतांची खरेदी केली अशा शेतकर्यांची मात्र मोठ्या प्रमाणात अडचण झालेली आहे.
यावर्षी केंद्र सरकारने कापसाला हमीभाव 6300 रुपये प्रति क्विंटल दिला आहे. शासकीय हमिभावापेक्षा खाजगी व्यापारी, कापूस उत्पादक शेतकर्याला कमी भाव देत असतील तर पणन महासंघ, नाफेड, सिसिआय या तिन शासकीय यंत्रणे मार्फत कापसाची खरेदी केली जाते. गेल्यावर्षी या तिन्ही महासंघाने जिनींग सुरू केल्या नव्हत्या. त्यामुळे एक छटाकभरपण कापूस बीड जिल्ह्यात शासकीय यंत्रणेअंतर्गत जिनींगने खरेदी केला नाही. याही वर्षी कापूस पणन महासंघाने बीड जिल्ह्यातील 29 जिनींग अंतर्गत कापूस खरेदी करण्याची तयारी केली आहे. मात्र या जिनींग सुरू होतील की नाही अशी शंका पणन महासंघाचे बीड जिल्ह्याचे व्यवस्थापक शेख यांनी व्यक्त केली. गेल्यावर्षी अंतरराष्ट्रीय बाजारात तुटवडा होता. आणि केंद्र सरकारने कापसाच्या गाठी आयात करण्यासाठी आयात शुल्क माफ केले नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी खाजगी जिनींगवर कापूस उत्पादक शेतकर्यांना दहा ते बारा हजार रुपय प्रति क्विंटल भाव मिळाला. याही वर्षी कापसाला चांगला भाव मिळेल यामुळे शेतकर्यांनी कापसाची लागवड मोठया प्रमाणात केली. मात्र केंद्र सरकारचा हमी भाव कमी असल्याने आणि खाजगी जिनींगवाले कापसाला भाव देण्यात तयार नसल्याने अद्यापपर्यंत कापूस खरेदी जिनींग सुरू झालेली नाहीत त्यामुळे किरकोळ व्यापारी कमी भावात कापूस उत्पादक शेतकर्यांची लूट करीत आहे. गेल्यावर्षी बीड जिल्ह्यात 34 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले होते. मात्र यावर्षी किमान शेतकर्यांनी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्यामुळे 45 क्विंटल कापूस उत्पादन होईल असा अंदाज कापूस पणन महासंघाने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी 3,49,878 हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता. यावर्षी मात्र वाढ होवून 3,77,868 हेक्टरवर शेतकर्यांनी कापसाचा पेरा केला आहे.